Saturday, 30 March 2024

दहावीच्या परीक्षेचे मूल्यमापन

 दहावीच्या परीक्षेचे मूल्यमापन

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय आयुष्यातली पहिलीच सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे तिचे त्यांच्या, शिक्षकांच्या, त्यांच्या आई-वडिलांच्या, अशा सर्वांच्याच दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. मोठ्या प्रमाणावर गाजावाजा होणाऱ्या या परीक्षेचा निकालही असाच बंपर लागतो. पण एवढा निकाल लागूनही शिक्षणाचा स्तर उंचावला आहे, असे शिक्षकसुद्धा म्हणत नाहीत. २००७पासून दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात २० टक्के अंतर्गत गुण द्यायला सुरुवात झाली. निकाल आणि गुण यांच्यातील फुगवट्याचे कारण अंतर्गत गुण हेच आहे, असा सर्वसाधारण समज आहे आणि त्यात बरेचसे तथ्यही आहे. बहुतेक शाळांत योग्य रीतीने मूल्यमापन न करताच विद्यार्थ्यांना सरसकट १८ ते २० अंतर्गत गुण दिले जातात. यामुळे लेखी परीक्षेत नापास होऊ शकतील असे अनेक विद्यार्थीसुद्धा दहावी पास होतात. २०११मध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ७६ टक्के होता. २०२३मध्ये तो ९३ टक्क्यांवर गेला. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दीडपटीने वाढून ती पाचच्या जवळपास गेली. गेल्या चारपाच वर्षांतच हा फुगवटा वाढलेला दिसतो. सध्याच्या या वाढलेल्या फुगवट्यामागचे प्रमुख कारण प्रश्नपत्रिकांचे अतिसुलभीकरण हेच आहे.

२०१८पासून एसएससी बोर्डाने ‘कृतिपत्रिका’ या स्वरूपांत प्रश्नपत्रिका तयार करायला सुरुवात केली. या पद्धतीमुळे नेमका कोणता फरक झाला, कृती आणि प्रश्न यांत नेमका काय फरक आहे, यांबद्दल तज्ज्ञांच्या मनांतच स्पष्टता नाही. चौकटी, तक्ते, आकृत्या अशा विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टी म्हणजे कृती असाच प्रामुख्याने भाषांच्या कृतिपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांचा समज झालेला दिसतो. विद्यार्थी सहावी-सातवीत आले, तरी त्यांना गोट्या, काड्या, रेघा यांचा उपयोग करून बेरजा, वजाबाक्या करायला सांगावे; तसाच हा प्रकार आहे. दहावीच्या मराठीच्या आणि इंग्रजीच्या कृतिपत्रिकांतील तीन प्रश्न पुढे दिले आहेत. (१) “ ‘रखवालदार’ या शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (उत्तर: वाल, खल, दार, वार, खवा, इ.)”, (२) “विरामचिन्हे ओळखा. (, - उत्तर: स्वल्पविराम) आणि (“ ” – उत्तर: दुहेरी अवतरण चिन्ह)” आणि (३) “रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून pe_ple, mat_h, hou_e, ad_lt हे शब्द पूर्ण करा.” बहुतेक सर्वच प्रश्न थोड्याफार फरकाने असेच अतिसोपे आणि सुमार पातळीचे असतात. गणिताच्या कृतिपत्रिकेत एखादे उदाहरण पूर्ण सोडवायला सांगण्याऐवजी त्याच्या सर्वच पायऱ्या कृतिपत्रिकेत दिलेल्या असतात आणि प्रत्येक पायरीत एक जागा रिकामी ठेवलेली असते. विद्यार्थ्यांनी या रिकाम्या जागा भरणे एवढेच अपेक्षित असते; बहुतेकजण त्या अंदाजानेसुद्धा भरू शकतात.

प्रश्नपत्रिकांमधील २० टक्के प्रश्न कठीण असावेत, अशी अपेक्षा असते; पण कृतिपत्रिकांत कठीण प्रश्न अजिबातच नसतात. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच सार्वजनिक परीक्षा नियमितपणे अभ्यास करणारे विद्यार्थी सहजपणे पास होऊ शकतील, इतकी सोपी नक्कीच असावी. पण त्याचवेळी ती ज्यांना विषयाची विशेष आवड आहे, त्यात विशेष गती आहे, अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांची वरच्या दर्जाची कौशल्ये तपासता येतील, त्यांना चिकित्सक विचार करावा लागेल, त्यांना आव्हानात्मक वाटेल, अशीसुद्धा असली पाहिजे. पण कृतिपत्रिकांत आव्हानात्मक प्रश्नच नसतात. त्यामुळे बुद्धिमान आणि सर्वसाधारण असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांच्या पातळीवर येतात. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाची काठिण्यपातळी आणि भेदभाव-क्षमता यांचे दरवर्षी पद्धतशीर विश्लेषण करून हे दोन्ही निकष योग्य प्रमाणात पाळले जातील, अशा रीतीने बदल करून हे सपाटीकरण थांबवायला हवे. प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमातील अपेक्षित अध्ययन-निष्पत्ती तपासतात की नाही, या दृष्टीने त्यांची नियमितपणे चिकित्सा झाली पाहिजे. अंतर्गत गुणांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने अंतर्गत गुणदान-पद्धतीचा फेरविचार करायला पाहिजे. अप्रामाणिकपणे अंतर्गत मूल्यमापन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला पाहिजे.

दहावीची सध्याची परीक्षापद्धती विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांत अपेक्षित असलेल्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, हे तपासण्याच्या दृष्टीने अयशस्वी ठरत आहे. या संदर्भात शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात केलेल्या शिफारशींनुसार सुधारणा करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलायला हवीत.


- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, दिनांक २० मार्च २०२४)

Wednesday, 27 March 2024

जिभेची वळकटी

 जिभेची वळकटी

चुलबुल एक छोटीशी खार होती, आज मात्र चुलबुल थोडीशी आजारी होती. त्यामुळे शाळेत जाऊ शकली नाही. तिला तिच्या आईने बोंबो डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी सर्वप्रथम चुलबुलची 'आ' करून तिची जीभ तपासली. चुलबुलला थोडेसे आश्चर्य वाटले. घरी आल्यावर थोडे बरे वाटल्यावर तिने तिच्या मैत्रिणीला शाळेतल्या अभ्यासाविषयी फोन केला तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली," आज शाळेत खूप मज्जा आली. आज वर्गशिक्षकांनी जिभेची वळकटी हा खेळ घेतला". चुलबुलला काही समजले नाही.ती म्हणाली," जीभेची वळकटी म्हणजे काय?" मैत्रीण म्हणाली," जिभेची वळकटी म्हणजे टंग ट्विस्टर गेम. हा गेम खेळता खेळता आमची हसून 

पुरेवाट झाली".

चुलबुल मात्र संभ्रमात पडली तिने फोन ठेवून आईला या संदर्भात विचारले. आई म्हणाली , "जिभेची वळकटी यासारख्या खेळामुळे जीभ कठीण शब्द उच्चारण्यास तरबेज होते आणि मुलांना गंमतही वाटते म्हणून घेतला असेल शिक्षकांनी हा खेळ."

   आई म्हणाली," तुझी जीभ पकड बघू आणि बघ तुला बोलता येते का ?" पण चुलबुलला जीभ पकडून काही बोलता आले नाही. 

   आईने चुलबुलला जवळ घेतले आणि जिभेविषयी माहिती सांगू लागली-

   जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. जीभ ही ५ ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे आवाज (ध्वनी) काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात. मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडू, २ आंबट, ३ खारट, ४ गोड. जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूंना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते. 

   माणसाची जीभ त्याचे आरोग्य कसे आहे याचे संकेत देत असते. त्यामुळेच डॉक्टर माणसाच्या जिभेची तपासणी करीत असतात. जर शरीरात कसली कमतरता असेल तर त्याची तपासणी जिभेवरून होत असते. विटामिन बी – १२ जर शरीरात कमी असेल तर जिभेच्या रंगावर होऊ शकतो परीणाम. जिभेचा उपयोग अन्न गिळण्यापासून ते मेंदूत चाललेले विचार व्यक्त करण्याचे कामही जीभ करते. जिभेचा पोत वा रंगात होणारा कोणताही बदल म्हणजे आजार होण्याचा संकेत असतो. अन्य सस्तन प्राण्यांपैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामुळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात.

      

    कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते.. म्हणून तू बऱ्याचदा पाहिलेली असशील कुत्रे बऱ्याचदा जीभ बाहेर काढून श्वास घेत असतात. 

     मांजरींना दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जेव्हा त्यांना पाणी पिण्याची इच्छा असते, तेव्हा ते जीभ अवतल आकारात ठेवतात, एक "चमचा" तयार करतात जे पाणी तोंडाच्या पोकळीपर्यंत घेऊन जाते. मांजरीच्या जिभेवर काटे असतात. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मांजरी जीभ, घसा आणि तोंडाच्या श्लेष्मल त्वचेत निर्माण होणाऱ्या आर्द्रतेने उष्णता बाहेर काढतात. या कारणास्तव, आपण कधीकधी मांजरीचे तोंड उघडे पहातो.



      तू ५० सेंटीमीटर लांब जीभेची कल्पना करू शकतेस? अर्धा मीटर! तो त्याच्या कानापर्यंत जीभ नेऊ शकतो !!! काय? तो आहे जिराफ . याची जीभ सर्व प्राण्यांमध्ये सर्वात लांब आणि प्रगत जीभआहे. शिवाय जिराफाची जीभ गडद असते त्यामुळे आफ्रिकेतील सूर्याच्या भाजून काढणाऱ्या उन्हापासून जिराफाचे संरक्षण होण्यास मदत होते.



साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. साप आपल्या जीभेच्या मदतीनेच वातावरणात होत असलेले बदल टिपतो. यात प्रामुख्याने तापमान आणि इतर बदलांचा समावेश आहे. साप सारखा आपली जीभ बाहेर काढून परिसरातील संकटाचा अंदाज घेत असतो.सापाच्या जीभेचे टोकाला दोन भाग झालेले असतात. त्यामुळेच त्यांना आपल्या चहुबाजूंच्या परिस्थितीचा अंदाज लावतो येतो. याशिवाय सापाला पाहण्याची क्षमता कमी असते. म्हणूनच ते आपल्या बचावासाठी जीभेचा उपयोग करतात. गायींची जीभ खूप लांब, रुंद आणि त्याच वेळी खडबडीत असते. लांबीमध्ये, ते ४५ सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते! गायीच्या जातीवर जीभ अवलंबून असते. लांब जिभेमुळे, गायी सहजपणे वनस्पतींचे अन्न ग्रहण करू शकतात.

  रुईला अस्वलाची निळी जीभ असते. सूर्याची उष्णता त्या जिभेमुळे शोषली जाते आणि त्याचे शरीर उबदार ठेवण्यास मदत होते.



खवले मांजराचे प्रमुख खाद्य म्हणजे मुंग्या, वाळवी, आणि लहान किडे. त्याला दात नसतात, पण लांबट तोंड आणि खूप चिकट अशी जीभ असते. वारूळाच्या बिळामध्ये जीभ आत घालून ते मुंग्यांना खाते.  



सुतारपक्षी मुंग्या आणि वाळवी खाऊ शकतात आणि हिवाळ्यात ते झाडाच्या बिया खाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुतारपक्षाची जीभ एका विशेष टेपच्या मदतीने बाहेर ढकलली जाते जी कवटीच्या आतील पोकळीभोवती जाते आणि पक्ष्याच्या नाकपुडीला जोडलेली असते.या पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो.     



  हंसाची जीभ काटेरी असते तो त्याच्या जिभेने गवत सोलून खातो आणि नंतर गवत चघळतो.



 फ्लेमिंगो पक्षाची जीभ केसाळ असते त्यामुळे तो शेवाळ कोलंबी साफसूफ करून खाऊ शकतो.

           


  गिरगीट भक्ष पकडण्यासाठी शरीराच्या लांबीच्या २.५ पट जीभ लांब करू शकतात. ते त्यांची जीभ वास घेण्यासाठी देखील वापरतात, गिरगिटांची जीभ कोणत्याही सरड्यापेक्षा लांब असते. जीभ फुलातून अमृत काढण्यासाठी एक "पंप" असू शकते, जसे की हमिंगबर्ड, हनीसकर याची जीभ.



 फुलपाखरांना जीभ नसते, त्यांच्याकडे एक प्रोबोस्किस असते. बरेच लोक त्याला जीभ समजतात परंतु ते आपले तोंड लांब नळीमध्ये वाढवण्यासारखे आहे. त्यांच्या प्रोबोस्किसवर काही चव कळ्या असतात आणि काही त्यांच्या अँटेनावर देखील असतात, परंतु बहुतेक चव कळ्या त्यांच्या पायावर केंद्रीत असतात. मधमाशांची जीभ लांब, पातळ, केसाळ जीभ संरक्षक आवरणाने वेढलेली असते. जेव्हा मधमाशी फुलावर येते, तेव्हा हे आवरण उघडते आणि जिभेच्या केसांमधील उभ्या फाट्यांमध्ये अडकलेले अमृत गोळा करण्यासाठी आत बाहेर फिरते. 



   'ब्ल्यू व्हेल' या माशाची जीभ जड असते त्याचे आवडते मासे जिभेखाली ठेवून तो सावकाश चघळत बसतो. शार्कला जीभ असते आणि तिला जीभ न म्हणता "बसिह्यल" असे संबोधले जाते. 



शार्कची जीभ मानवी जीभेसारखी हलू शकत नाही कारण ती स्नायू नाही. शार्कच्या तोंडाच्या तळाशी कूर्चाचा हा छोटासा जाड भाग असतो आणि त्यात चव कळ्या नसतात किंवा कोणतेही कार्य करत नाहीत. म्हणून, जेव्हा शार्क तोंड उघडतात, तेव्हा आपल्या लक्षात येते ते त्यांचे भयानक दात.

          

इतक्यात चुलबुलचे बाबा घरी आले ते म्हणाले, वा..! आज भाजी खूपच छान झाली होती. भाजीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. चुलबुल म्हणाली, म्हणजे काय बाबा? बाबा म्हणाले ,"आजची भाजी फारच छान झाली होती. आज काय दोघी मायलेकींच्या गप्पा चालल्या आहेत." चुलबुल म्हणाली ,"काही नाही हो जिभेवर". बाबा म्हणाले, "सगळे शरीराचे अवयव थकतात पण हा अवयव असा आहे की जो कधी थकतच नाही. पण हो जिभेवर मात्र नियंत्रण ठेवता आले पाहिजे." चुलबुल म्हणाली म्हणजे काय? म्हणजे अरबट चरबट जर जिभेला खायची सवय लागली तर त्याचे नुकसान शरीराला फार होते. शिवाय काही समजपूर्वक न बोलता बडबड करत राहिलो तरीही जिभेमुळे इतरांची मने दुखावली जाऊ शकतात. म्हणूनच आई म्हणते,"उचलली जीभ आणि लावली टाळ्याला." ती एक म्हण आहे ग आपली. जीभ नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते म्हणून ती नेहमी आपल्या टाळ्याला चिकटून असते म्हणूनच त्याच्यावरून म्हण पडली आहे. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' याचा अर्थ विचार करूनच बोलले पाहिजे वाटेल ते बोलू नये. आईने स्पष्टीकरण केले. आणि कधी कधी मी तुला उलटे-सुल्टे खूप बोलल्यावर तू मला म्हणतेस, "तुझ्या जिभेला काही हाड आहे का?" म्हणजे काय ग? अगं याचा अर्थही असाच होतो "विचारपूर्वक बोलावे", आई म्हणाली.

आज चुलबुलला 'टंग ट्विस्टर गेम' जिभेच्या म्हणी आणि विविध प्राण्यांच्या जिभेची वैशिष्ट्ये समजली होती.


-सायली घाग.

(पूर्वप्रसिद्धी : विज्ञानधारा मासिक ऑगस्ट २०२३)

Saturday, 23 March 2024

दहावी-बारावीच्या परीक्षांचे होणार तरी काय?

 

दहावी-बारावीच्या परीक्षांचे होणार तरी काय?

महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डाने १९६६पासून अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या पद्धती विकसित करणे, शिक्षक प्रशिक्षण अशा शैक्षणिक जबाबदाऱ्यांबरोबरच दरवर्षी दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे ही कामे अतिशय सुरळीतपणे पार पाडली आहेत. परीक्षांच्या कामाचे संगणकीकरण, बारकोडचा वापर, परीक्षेतील, तसेच परीक्षापूर्व आणि परीक्षोत्तर कामांतील गैरप्रकार रोखण्यासाठी केलेले कायदे आणि इतर उपाययोजना या महाराष्ट्राच्या बोर्डाच्या जमेच्या आणखी काही बाजू आहेत. या उपाययोजनांचे इतर राज्यांच्या मंडळांनीही अनुसरण केले आहे. असे असूनही महाराष्ट्र शासनाने आठ वर्षांपूर्वी एका शासन निर्णयाने एसएससी बोर्डाची अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, मूल्यमापन आणि शिक्षक प्रशिक्षण ही शैक्षणिक कामे 'एससीईआरटी'कडे वर्ग केली आणि बोर्डाकडे फक्त दहावी-बारावीच्या परीक्षांचे आयोजन एवढेच काम ठेवले. एसएसएसी बोर्ड ही महाराष्ट्र शासनाने कायद्याने स्थापन केलेली संस्था आहे. तिची कार्ये आणि जबाबदाऱ्या यांत कोणतेही बदल विधिमंडळाच्या मान्यतेनेच करता येतात. शासन निर्णयाने केलेला हा बदल म्हणजे प्रशासनात घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन कसे होऊ शकते, याचा वस्तुपाठच आहे. बदल करायचाच होता तर तो योग्य कार्यपद्धती पाळून करायला हवा होता.

आज २०२०च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्या मनांत सर्वाधिक प्रश्न आहेत, ते दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत. उदाहरणार्थ, यापुढे दहावीच्या परीक्षा होतील का? राज्यांची शिक्षण मंडळे बंद होऊन देशभर फक्त सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होईल का? दहावी-बारावीच्या परीक्षांचे स्वरूप कसे राहील? आणि आणखी अनेक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील माध्यमिक शिक्षणाच्या नववी ते बारावी अशा प्रस्तावित संरचनेमुळे हे प्रश्न लोकांच्या मनांत येत असावेत. यापूर्वी २०१० ते २०१२ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपिल सिबल यांनी ‘एक देश - एक बोर्ड’, ‘एक देश – एक अभ्यासक्रम’, दहावीची परीक्षा रद्द करणे अशा घोषणा वेळोवेळी केल्या होत्या. परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी केली नसल्याने त्या हवेतच विरल्या.

आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने वर उल्लेख केलेले प्रश्न बारा वर्षांनी पुन्हा चर्चेत यायला लागले आहेत. यावेळी मात्र या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०, सार्थक (धोरणाच्या अंमलबजावणीचा कृतिकार्यक्रम) आणि शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या दस्तऐवजांत दिलेली आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरही देशाच्या आणि राज्यांच्या स्तरावर कार्यरत असलेली सर्व मंडळे यापुढेही कार्यरत राहतील आणि दहावी-बारावीच्या परीक्षा आयोजित करतील. त्यासुद्धा वर्षातून दोनदा. नवीन शैक्षणिक धोरणात पुरवणी परीक्षेचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना संपादणूक पातळीत सुधारणा करण्याची संधी मिळावी, हा आहे. महाराष्ट्राचे एसएससी बोर्ड नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दरवर्षी जुलैमध्येच दहावी आणि बारावीच्या पुनर्परीक्षा आयोजित करते. या दोन्ही उद्दिष्टांची सांगड घालून महाराष्ट्रातील पुरवणी परीक्षा आयोजित कराव्या लागतील. दहावी आणि बारावीच्या पुढील इयत्तांतील प्रवेशांबाबतच्या नियमांत काही ठिकाणी गरजेनुसार बदल करावे लागतील. देशातील काही मंडळे दहावी-बारावीच्या परीक्षा वर्षातून एकदाच घेतात; त्यांचे काम वाढेल.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राज्यांच्या माध्यमिक शिक्षण मंडळांकडील शैक्षणिक कामे त्या त्या राज्यांच्या एससीईआरटींकडे वर्ग करून त्यांचे स्वरूप स्वरूप केवळ ‘परीक्षा मंडळे’ असे ठेवले आहे. सीबीएसई या देशपातळीवर काम करणाऱ्या मंडळाच्या कामांच्या स्वरूपात मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. अभ्यासक्रम-निर्मिती, पाठ्यपुस्तकांना मान्यता देणे, मूल्यमापन ही शैक्षणिक कामे सीबीएसईकडे असणारच आहेत. भविष्यात होऊ पाहणाऱ्या आणखी काही निर्णयांची ही नांदी असेल का?

परीक्षांच्या आयोजनातील व्यवस्थापकीय बदलांपेक्षा शैक्षणिक स्वरूपातील बदल खूपच आव्हानात्मक असतात. घोकंपट्टी आणि कोचिंग क्लासेस या शिक्षणविघातक गोष्टी शिक्षणक्षेत्रातून हद्दपार व्हाव्यात, परीक्षेत विद्यार्थ्यांच्या अध्ययननिष्पत्तींचे यथायोग्य मूल्यमापन व्हावे, परीक्षांच्या आयोजनाच्या नावीन्यपूर्ण तंत्रांचा अवलंब करावा, या दृष्टीने नवीन धोरणात अनेक शिफारशी केल्या आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मपरीक्षण करून पावले उचलावी लागतील.


- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १३ मार्च २०२४)

Wednesday, 20 March 2024

कोचिंग क्लासेस - चिंतन आणि चिंता

 कोचिंग क्लासेस - चिंतन आणि चिंता

मागील महिन्यात केंद्र शासनाने कोचिंग क्लासेस व्यवसायासाठी नियमावली बनवण्यासंदर्भामध्ये काही मार्गदर्शक सूचना राज्यांना केलेल्या आहेत. त्यामध्ये सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस असू नये अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्र शासनाने राज्यांना केलेली आहे. मुळात कोट्यावधी रुपयाचे बजेट असलेली शासनाची शिक्षण व्यवस्था अस्तित्वात असताना कोचिंग क्लासेसची गरजच का पडावी याचा विचार सर्वप्रथम करणे गरजेचे आहे. याला सर्वप्रथम कारणीभूत आहे शासनाची शैक्षणिक व्यवस्था, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे व पालकांचे समाधान होत नाही, तर दुसरीकडे वाढलेली जिवघेणी शैक्षणिक स्पर्धा व पालकांच्या अति महत्त्वाकांक्षा. 

तीस- चाळीस वर्षांपूर्वी अभ्यासामध्ये कमकुवत असलेले दहा टक्के विद्यार्थी कोचिंग क्लास लावायचे. आता शासनाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 90% विद्यार्थी कमकुवत असतात आणि म्हणून ते कोचिंग क्लासला जातात. कोचिंग क्लासेस चालवणारे शिक्षक सुशिक्षित आहेत ,परंतु देशात त्यांच्या हाताला द्यायला काम नसल्यामुळे ते बेरोजगार आहेत ,त्यामुळे ते इमानी इतबारे सकाळी सहा वाजता पासून व्यावसायिक भूमिकेतून कोचिंग क्लासेस चालवतात. खाजगी व्यवसाय असल्यामुळे व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच जो तो आपल्या कुवतीप्रमाणे जाहिरात तंत्राचा वापर करून आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतो. पालक स्वेच्छेने खाजगी कोचिंग क्लासेस संचालकाच्या शिकवण्याच्या सचोटीमुळे, त्याच्या कौशल्यामुळे, त्याच्या गुडविल मुळे त्याच्याकडे आकृष्ट होतात व आपल्या पाल्यासाठी खर्च करतात. सुरुवातीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून एक शिक्षकी कोचिंग क्लास सुरू होतो. पुढे त्या क्लास चा नावलौकिक होतो व विद्यार्थी संख्या वाढते. अनेक शिक्षकांना यातून रोजगार मिळतो. अनेक गृहिणी आपल्या कुटुंबाला आधार सुद्धा शिकवणी व्यवसायातून आज लावत असल्याचे आपण बघतोय. शासन एकीकडे स्वावलंबनाचा डांगोरा पिटते आणि दुसरीकडे कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वतःच्या भरोशावर नावरूपास आणलेला व्यवसाय बंद करण्याचा विचार करते हा कुठला न्याय.? शासन स्तरावर कोचिंग क्लासेसची सकारात्मक बाजू केव्हा लक्षात घेतली जाईल.? विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळा सांभाळून सकाळी ६ पासून कोचिंग क्लासेसचा संचालक अभ्यासक्रम, चाचणीच्या वेळा, टेस्ट पेपर, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे , पालक सभा आयोजित करणे यासारख्या शाळेला समांतर असलेल्या अनेक गोष्टी तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. अनेक आव्हानांना तोंड देत कोचिंग क्लासेस संचालक आपल्या व्यवसायाचा दर्जा उत्तम टिकवण्यासाठी प्रयत्न करतो, जर त्यांनी नावलौकिक मिळवला नाही तर त्याच्याकडे कुठलाही पालक आपल्या पाल्याला पाठवणार नाही ही वस्तुस्थिती आहे. 'हाडाच्या शिक्षकाची' संकल्पना नेमकी कशी असते ती आपल्याला कोचिंग क्लासेसमध्ये पाहायला मिळेल. पण नेमके शासनाचे या सर्व सकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष होते व ज्या काही नकारात्मक बाबी आहे तेच शासनाच्या व समाजाच्या लक्षात राहते हे दुर्दैव आहे.देशामध्ये नवनवीन कंपन्यांच्या स्टार्टअप साठी शासन प्रोत्साहन देते व कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाला स्टार्टअपची प्रतिष्ठा केव्हा मिळेल किंवा ती प्रतिष्ठा का मिळू नये ? याचाही विचार व्हायला पाहिजे. शाळेतील शिक्षकांना निवडणुकीची कामे ,अनेक प्रकारचे सर्वे, खिचडी शिजवणे अशी अनेक कामे करावी लागतात, परंतु कोचिंग क्लासेसचा शिक्षक केवळ शिकवण्याच्याच कामावर लक्ष केंद्रित करतो. शाळेतील एक तासिका ३० मिनिटांची असते. कोचिंग क्लासेसचा एक तासिका घड्याळी एक तासाची असते. कोचिंग क्लासेसचे शिक्षक सुद्धा शाळेमध्ये आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ग्रहण करून तीस-पस्तीस वर्षापासून कोचिंग क्लासेस व्यवसायात असतानाही त्यांच्या नशिबात कोणताही आदर्श शिक्षक पुरस्कार येत नाही ही खंत आहे. अनेक कोचिंग क्लासेस संचालकांची पात्रता व अनुभव अभ्यास मंडळावर काम करण्याच्या लायकीचा असतो ,परंतु तो शासनाचा सावत्र पुत्र असल्यामुळे त्याला कधीही विचारले जात नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये शिक्षक मतदार संघामध्ये त्याचे जर मतदान असेल तर कोचिंग क्लासेस व्यवसायिकाचा निवडणूक प्रक्रियेमध्ये दबाव गट तयार होईल, परंतु त्याला मतदार म्हणून सुद्धा हक्क दिला जात नाही. शासनाने एकीकडे कोचिंग क्लासेसला एम. एस. एम. इ. मध्ये समाविष्ट करून लघु उद्योगाचा दर्जा दिला आहे व त्याला 18% हा वरचा जीएसटीचा स्लॅब लावलेला आहे तर दुसरीकडे शासन कोचिंग क्लासेसची तुलना चॅरिटी तर्फे चालवल्या जाणाऱ्या व त्या सर्व सवलती घेणाऱ्या शाळेबरोबर केली जाते हा कोणता न्याय आहे? 

इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच जर कोचिंग क्लासेस व्यवसायात काही अनिष्ट, चुकीच्या गोष्टी घडत असेल तर त्यावर नियमनाचा विचार करून नियंत्रण आणणे अशक्य नाही. गोवा सारख्या लहानशा राज्याने 25 वर्षांपूर्वीच 2001 ला कोचिंग क्लासेस व्यवसायिकांसाठी नियमावली आणली, त्यानंतर युपी, कर्नाटक, बिहार, मणिपुर व अलीकडे राजस्थानने सुद्धा कोचिंग क्लासेस व्यवसायिकांसाठी नियमावली आणली. जाचक अटी वगळून लाखो सुशिक्षित लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसायच बंद करणे हा काही उपाय होऊ शकत नाही. आम्ही पायाला जखम झाल्यानंतर पाय तोडून फेकत नाही तर जखमेवर उपचार करतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कोचिंग क्लासेस लावणे ही काही आज फक्त कोचिंग क्लासेस व्यवसायिकांचीच नव्हे तर ती विद्यार्थ्यांची व पालकांची गरज बनलेली आहे. नेमका सोळाव्या वर्षापर्यंतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम शाळेबरोबरच कोचिंग क्लासेससुद्धा करित आहे. आणि याच वयात कोचिंग व्यवस्थेला जर शासन बंदी आणत असेल तर पुढील पिढीची शैक्षणिक गुणवत्ता काय असेल व समाजाचे किती मोठे नुकसान यामुळे होणार याचा विचार नक्कीच शासनकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेसच्या व्यवसायिकांबरोबरच विद्यार्थी व पालकांसाठी केंद्र व राज्य शासनाने पालकत्वाच्या भूमिकेतून वागण्याची आज गरज आहे एवढेच सुचवावेसे वाटते.


-बंडोपंत भुयार

(पूर्वप्रसिद्धी: दिनांक ८ फेब्रुवारी २०२४, दैनिक जनमानस, वर्धा) 

Saturday, 16 March 2024

'उच्च’ माध्यमिकचे मृगजळ

 'उच्च’ माध्यमिकचे मृगजळ   

महाराष्ट्रातील उच्च माध्यमिक स्तरावरील बिकट समस्यांवरचा प्रभावी उपाय म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन टप्पे न ठेवता कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीनुसार नववी ते बारावीपर्यंतचे सलग चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण ही व्यवस्था लागू करणे. केंद्रीय विद्यालयांत, सीबीएसई आणि आयसीएसई शाळांत, आणि बहुसंख्य राज्यांत हीच व्यवस्था आहे. तिथे या स्तरावरील प्रश्न खूपच कमी आहेत. नववी-दहावी आणि अकरावी-बारावी या दोन्ही स्तरांवर शिकणाऱ्या पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक गरजा सारख्याच असतात. पौगंडावस्थेत आई-वडिलांचा प्रभाव कमी होऊन समवयस्कांचा प्रभाव वाढलेला असतो. बंडखोर वृत्ती, आदर्शवाद आणि व्यक्तिपूजा, भविष्याची स्वप्ने पाहणे हे पौगंडावस्थेतील महत्त्वाचे बदल असतात. या वयात विचारांची नैतिक चिकित्सा करण्याची क्षमता आणि सामाजिक जाणिवा विकसित होऊ लागल्या असतात. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या बदलांना योग्य दिशा मिळावी, यासाठी पोषक वातावरण माध्यमिक शाळांत असते. आजही चांगल्या शाळा अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा, गटकार्य, विविध विषयांची मंडळे, सहशालेय उपक्रम, व्यवसाय मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल्स, सायबर सेफ्टी, समुपदेशन, पुढील अभ्यासक्रमांसाठी स्पर्धात्मक परीक्षांची माहिती आणि नाममात्र शुल्क आकारून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असे उपक्रम आयोजित करत असतातच.

महाविद्यालयांना जोडलेल्या अकरावी-बारावीच्या वर्गांना महाविद्यालयातल्या शिक्षकांचे ज्ञान, तिथले ग्रंथालय आणि इतर साधनसुविधा, वरच्या वर्गांतील विद्यार्थ्यांचा आदर्श, तिथे आयोजित होणारे बहुविध उपक्रम, अशा अनेक गोष्टींचा फायदा मिळू शकत असल्यामुळे ते गुणवत्तेच्या बाबतीत सरस असतात, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र अकरावी-बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांशी बोलल्यावर प्रत्यक्ष चित्र वेगळेच असल्याचे दिसते. प्रशासकीय आणि शैक्षणिक अशा दोन्ही बाबतींत अकरावी-बारावीचे वर्ग आणि महाविद्यालय यांच्यात एक अभेद्य भिंत असते. अकरावी-बारावीच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या जवळपास कोणत्याच उपक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. काही टोकाची उदाहरणेसुद्धा पाहायला मिळतात. नॅकचे पथक महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी येते, त्यावेळी अनेक ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाचा बोर्ड हटवून हे वर्ग त्या काळात बंद ठेवले जातात! आपण महाविद्यालयाचा भाग नाही, हा अनुभव अकरावी-बारावीच्या शिक्षकांना नेहमीच मिळत असतो. बहुतेक विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांतील अकरावी-बारावीत प्रवेश घेण्याचा प्रमुख हेतू बोर्डाची बारावीची परीक्षा देता यावी, हाच असतो. बहुतेक महाविद्यालयांत आपण कितीही दिवस गैरहजर राहिलो तरी आपले परीक्षा फॉर्म बोर्डाकडे जातीलच आणि आपल्याला परीक्षेला बसता येईल याची विद्यार्थ्यांना खात्री असते. वर्गाच्या वेळेत बहुतेक विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये किंवा इतरत्र असतात. महाविद्यालयांच्या अकरावी-बारावीत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, यावर त्यांचा विश्वास नसल्याचे हे लक्षण आहे. बहुतेक ठिकाणी असलेल्या या गंभीर परिस्थितीबद्दलची खंत ना संस्थेला असते, ना शिक्षण विभागाला. माध्यमिक शाळांत सर्व आलबेल आहे असे नाही. पण बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थी रोज हजर तरी असतात; त्यांना वेळापत्रकाप्रमाणे शिकवले जाते; किमान शिस्त राखली जाते.    

महाराष्ट्रात अकरावी-बारावीचे वर्ग महाविद्यालये आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून काढून घेऊन फक्त माध्यमिक शाळांना जोडले आणि नववी ते बारावीपर्यंत सलग माध्यमिक शिक्षण अशी व्यवस्था स्वीकारली, तर काही प्रशासकीय प्रश्न निर्माण होतील. अतिरिक्त शिक्षक आणि काही ठिकाणी अतिरिक्त झालेल्या, तर काही ठिकाणी नव्याने लागणाऱ्या साधन-सुविधा असे प्रश्न सोडवावे लागतील. नववी ते बारावीसाठी रिकाम्या जागी प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षकांच्या नेमणुका कराव्या लागतील. सध्या पदव्युत्तर नसलेल्या माध्यमिक शिक्षकांनी शैक्षणिक अर्हता वाढवणे किंवा ती शिथिल करणे यांबाबत निर्णय घ्यावे लागतील. केंद्रीय विद्यालयांत अकरावी-बारावीच्या एका तुकडीत ४० विद्यार्थी असतात, तर महाराष्ट्रात ८० विद्यार्थी असतात. आपल्याकडे अकरावी-बारावीच्या वर्गांतील विद्यार्थिसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे सर्व करताना मराष्ट्र शासनाचे सध्याचे कायदे आणि नियम यांत आवश्यकतेनुसार बदल करावे लागतील. विविध घटकांबरोबर संवाद, योग्य नियोजन आणि जादा आर्थिक तरतूद यांतून मार्ग काढता येईल. आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या ही हलवाहलव कठीण आहे; पण सुरुवात करायला हवीच. आणखी उशीर करून विद्यार्थ्यांचे किती नुकसान होऊ द्यायचे?


- डॉ. वसंत काळपांडे  

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ६ मार्च २०२४)

Wednesday, 13 March 2024

वाचन वेग वाढवण्यासाठी

वाचन वेग वाढवण्यासाठी

One minute reading activity 

🌹उपक्रमाची उद्दिष्टे

  • वाचन कौशल्य विकसित करणे.
  • वाचनातील आत्मविश्वास वाढविणे.
  • वाचनाचा वेग वाढविणे.
  • समजपूर्वक मूक वाचन करणे.
  • चिकित्सक मूक वाचन करणे.
  • समजपूर्वक ,योग्य उच्चारांसह प्रकट वाचन करणे.
  • सेमी इंग्रजीच्या वर्गातील गणित व विज्ञान विषय समजण्यासाठी वाचन कौशल्य विकसित करणे.
  • अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे.

उपक्रमाची पार्श्वभूमी

करोनानंतरच्या काळात विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येऊ लागले तेव्हा विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्य कमी झाल्याचे दिसून आले.

वाचन हे अतिशय महत्त्वाचे भाषा कौशल्य आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना सर्वच विषयांच्या आकलनामध्ये अडथळे येतात. त्यामुळे त्यांचा शिकण्यातील वेगही कमी झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मला जाणवले. विद्यार्थ्यांचा वाचनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी वर्गामध्ये इंग्लिश विषयासाठी वन मिनिट रीडिंग ऍक्टिव्हिटी सुरू केली.

उपक्रमाची कार्यवाही

 शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांची प्रकट वाचनाची चाचणी घेतात. जे विद्यार्थी अडखळत वाचत आहेत, कमी वेगात वाचत आहेत त्या विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शक सूचना दिल्या. तुम्हाला वाचायला शिकायचे आहे ना असे आवाहन केले आणि मग उपक्रमाबद्दल माहिती दिली.वन मिनिट रीडींग ऍक्टिव्हिटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एक सोपा पाठ्यघटक त्यांच्याच आवडीचा निवडायला सांगितला. त्यानंतर वन मिनिट रीडिंग ऍक्टिव्हिटी कशी करायची याबद्दल सूचना दिल्या. एकूण या उपक्रमाला पाच मिनिटे वेळ लागेल हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात आणि आवाहन करतात की द्याल ना तुम्ही वाचनासाठी पाच मिनिट वेळ!

शिक्षकाने एक मिनिट वेळ लावून एका मिनिटात जेवढे समजून घेऊन विद्यार्थी शब्द वाचतील तेवढे शब्द मोजून तो आकडा वहीमध्ये तक्ता तयार करून तारीख टाकून त्यासमोर प्रामाणिकपणे लिहायला सांगितले. असे सलग २१ दिवस रोज नियमितपणे हा उपक्रम शाळेत आणि घरी पालकांच्या मदतीने कसा करायचा अशा सूचना विद्यार्थी व पालक दोघांनाही दिल्या. शिक्षकांनी एक मिनिट वेळ लावल्यानंतर विद्यार्थी अतिशय आनंदाने वाचायला आपापल्या गतीने सुरुवात करतात. जेवढे शब्द वाचले तेवढे प्रामाणिकपणे शिक्षकांना अतिशय उत्साहात सांगतात. व वहीमध्ये तारखेनुसार नोंद करतात. पालकांना उपक्रमाबद्दलच्या सूचना व्हाट्सअप समूहावर शिक्षकांनी दिलेल्या असतात. घरी गेल्यानंतर विद्यार्थी पालकांना उपक्रमाबद्दल माहिती देतात व पालकांसमवेत पुन्हा एकदा stop watch वर एक मिनिट वेळ लावून तोच पाठ्य घटक पुन्हा वाचतात व पुन्हा त्याची नोंद करतात. पुन्हा वाचल्यानंतर शब्द संख्येमध्ये वाढ होते व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढू लागतो. समजून घेऊन वाचणे महत्त्वाचे आहे हे शिक्षकांनी सांगणे आवश्यक आहे त्याचबरोबर या उपक्रमाद्वारे स्पर्धेचे वातावरण तयार झाल्यामुळे वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण होते परंतु ही स्पर्धा स्वतःशीच आहे हे शिक्षकांनी सांगणे आवश्यक आहे. रोज स्वतःच्या वाचनाच्या शब्द संख्येमध्ये वाढ होणार म्हणजे स्वतःची वाचनातील प्रगती होणार हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. हा वाचन वेगाचा चढता आलेख विद्यार्थी स्वतः अनुभवतात. त्यांना या उपक्रमांमधून आनंदही भरपूर मिळतो. पाठ्य घटकांसोबतच त्या त्या वयोगटाच्या आवडीनुसार विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तक पेटी आणून त्यामधील पुस्तके वन मिनिट रीडींग ऍक्टिव्हिटीसाठी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होते.

उपक्रमाची फलनिष्पत्ती

२१ दिवस सलग हा उपक्रम केल्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा मूक वाचनाचा व प्रकट वाचनाचा वेग वाढला.आकलनासह वाचन केल्यामुळे पाठ्य घटक समजतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाचनातीलच नाही तर शिकण्यातील आनंदही वाढतो. 

वाचन वेग वाढवण्याच्या या उपक्रमासाठी केवळ पाच मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. एक मिनिटामध्ये वाचन, त्यानंतर वाचन केलेल्या शब्दांची संख्या मोजून लिहिणे. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. तसे वातावरण राहण्यासाठी शिक्षकांनी तशा प्रकारचा संवाद विद्यार्थ्यांशी करणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचे वाचन विकसित झाल्यामुळे सेमी इंग्रजी वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय समजण्यासाठी फायदेशीर ठरतो.

विद्यार्थ्यांची स्वतःची पुस्तकांची लायब्ररी तयार करण्यासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. वाढदिवसाला वाढदिवसानिमित्त एकमेकांना पुस्तके भेट देण्याच्या उपक्रमाची सुरूवात केली. पालकांकडूनही वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यायचे असे सुचविले. पुस्तक प्रदर्शनाला भेटी देणे, पुस्तकांच्या दुकानांची नावे सांगून विद्यार्थ्यांच्या वयोगटाची कोणकोणती पुस्तके वाचनीय आहेत ते त्यांना सांगितले. उदाहरणार्थ पाचवीच्या वर्गासाठी पंचतंत्राच्या गोष्टी, सहावीसाठी बिरबलाच्या गोष्टी, सातवीसाठी फेरी टेल्स, आठवीसाठी साहस कथा, नववीसाठी थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, दहावीसाठी प्रेरणादायी पुस्तके. याशिवाय एक मिनिटाची गोष्ट सांगण्याचाही उपक्रम सुरू केला. आकलनासह वाचन करून पुस्तक परीक्षण करण्याचा उपक्रमही राबविला.या सर्वांमधून एक प्रकारची वाचनाची चळवळच निर्माण झाली. वर्गामध्ये एका कोपऱ्यामध्ये पुस्तकाचे स्टॅन्ड ठेवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची पुस्तके आणून ठेवू लागले व रिकाम्या तासाला त्यातील आवडीचे पुस्तक घेऊन वाचू लागले त्यामुळे त्या तासिकेच्या वेळाचा सदुपयोग होऊ लागला. सहलीसाठी पालकांबरोबर भिलार या पुस्तकाच्या गावाला भेट देण्यासाठी ही प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर पुण्यातील विविध शासकीय वाचनालयांची माहिती दिली व त्यांना भेटी देण्यासाठी सांगितले . पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात नुकत्याच झालेल्या 'पुणेकर वाचत आहेत' या पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नेले. पालकांसोबत पुन्हा भेट देण्यासाठी सांगितले. तेथील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व पुस्तके खरेदी केली. स्वतःच्या वाढदिवसाला पुस्तक खरेदी करून 'सेल्फी विथ बुक' काढून पाठवण्याचे सुचविले. पालकांनी रोज स्वतः पंधरा मिनिटे तरी झोपण्यापूर्वी वाचायचे. त्यांचे पाहून मुलेही वाचतील असे आवाहन पालकांना केले. विद्यार्थी व पालक या दोघांमध्येही वाचनाविषयी जागृती होत आहे! चला तर मग वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवूयात!!


-सौ हर्षा बाळकृष्ण पिसाळ (निगडे)

आपटे प्रशाला पुणे

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका

Saturday, 9 March 2024

अकरावीच्या प्रवेशनाट्याचे धडे

 अकरावीच्या प्रवेशनाट्याचे धडे

देशातील इतर कोणत्याही राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही दहावीनंतर अकरावीतले प्रवेश काही मोठी शहरे वगळता इतर ठिकाणी कोणताही गाजावाजा न होता पार पडतात. राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्याच शाळेच्या अकरावीत विनासायास प्रवेश मिळू शकतो. राज्य मंडळाच्या शाळांबाबत मात्र मोठ्या शहरांत वेगळी परिस्थिती असते. तिथे बहुसंख्य विद्यार्थ्यांना काही ठरावीक कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश हवा असतो. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण होऊन प्रवेशाचा प्रश्न बिकट होतो. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर, पारदर्शकपणे आणि सुकरतेने व्हावेत, या चांगल्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने २००९पासून मुंबईत आणि पुण्यात राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू केले. सध्या मुंबई महानगर क्षेत्र (बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महानगरपालिका), पुणे परिसर (पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), तसेच नाशिक, नागपूर आणि अमरावती या तीन महानगरपालिका अशा पाच नागरी क्षेत्रांत ही योजना सुरू आहे.

केवळ महाराष्ट्रातच अनुभवाला येणारे अकरावीचे प्रवेशनाट्य रंगते ते याच भौगोलिक क्षेत्रांत; विशेषत: मुंबई आणि पुणे या दोन शहरांत. महाराष्ट्रात एसएससीचे निकाल जाहीर झाले की पुढचे चार-पाच महिने मुंबई आणि पुण्याची वृत्तपत्रे आणि मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे विविध कनिष्ठ महाविद्यालयांचे शाखानिहाय कटऑफ गुण, रिकाम्या जागा, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, राज्य मंडळाच्या शाळा आणि सीबीएसई, आयसीएसई शाळा यांच्यातील स्पर्धा, अशा विषयांवरील बातम्या, लेख, अग्रलेख यांनी रंगलेली असतात. ‘पर्सेंटाईल’ पद्धती आणि ‘सर्वोत्तम पाच’ या कल्पना आणि त्यांमुळे उद्भवलेल्या न्यायालयीन लढाया याच योजनेचा परिपाक होत्या. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झालेली अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबरअखेरपर्यंत सात फेऱ्यांनंतर पूर्ण होते. तोपर्यंत पहिले शैक्षणिक सत्र संपत आलेले असते.

ऑनलाइन प्रक्रिया म्हणजे पारदर्शकता, सुकरता आणि वेग हे समीकरणच पडून गेले आहे. त्यामुळे शासन ऑनलाइन प्रक्रियेचा वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखा अनेकदा वापर करत असते. पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक सत्र वाया घालवणारी ही प्रक्रिया वेगवान आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही. या प्रक्रियेत तर्काला पटणार नाहीत, अशा अनेक गोष्टी घडत असतात. दहावीत कितीही कमी गुण मिळाले तरी जिथे सहज प्रवेश मिळू शकतो, अशा कनिष्ठ महाविद्यालयांची निवड ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनीही निवड केली असते. पहिल्या फेरीनंतरच्या प्रत्येक फेरीत नावाजलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘कट ऑफ गुण’ कमी व्हायला पाहिजेत; पण बऱ्याचदा तसे होताना दिसत नाही. ऑनलाइन प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रवेशक्षमतेच्या सुमारे ३० टक्के जागा रिकाम्या राहतात. काही मोजकी कनिष्ठ महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी रिकाम्या जागांचे प्रमाण कितीतरी जास्त असते. प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ, पैसा आणि वेळ खर्च करून, एक शैक्षणिक सत्र वाया घालवून केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना काय मिळालेले असते? प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत ते प्रत्यक्ष शिकतात का? त्यांना शिकवले जाते का? या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळणे कठीणच आहे. या संपूर्ण ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा, तिच्या औचित्याचा, उपयोगितेचा, या प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांवर काय काय घडते याचा नव्याने, चाकोरीबाहेर जाऊन विचार आणि कृती व्हायला पाहिजेत. नव्या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या प्रवेशांसाठी आतापासूनच याची सुरुवात करायला हरकत नाही.

एवढ्या सर्व अनर्थांचे मूळ आपल्या राज्यातल्या उच्च माध्यमिक शिक्षणाच्या ना धड शाळेत, ना धड महाविद्यालयात, अशा अधांतरी स्थितीत आहे. उच्च माध्यमिक स्तर हा शालेय शिक्षणाचाच भाग आहे, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पुन्हा अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा या शालान्त काळात आवश्यक असणारे वातावरण शाळेतच मिळू शकते. विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंतचे सलग चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण शाळेतच देण्याची व्यवस्था करण्यासाठी ही योग्य संधी आहे. पन्नास वर्षांपासून सुरू असलेली व्यवस्था बदलणे नक्कीच कठीण आहे; पण विद्यार्थिहितासाठी हा बदल केलाच पाहिजे.


- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २८ फेब्रुवारी २०२४)

Wednesday, 6 March 2024

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन- गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे लक्षण

 अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन- गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे लक्षण

 जेव्हा जेव्हा राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षणे प्रकाशित केली जातात. तेव्हा प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे मुलांचा भाषा गणितामधील शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक जाणवत नसल्याचे आढळून येते. दरवर्षी विविध प्रकारची प्रशिक्षणे किंवा विविध साधनांची उपलब्धता शासन स्तरावरून शाळांना पुरविण्यात येते. तरीही गुणवत्ता उंचावत नसल्याचे जाणवते. यामागील कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न लेखातून करू या-

 'जीव तोडून शिकवण्यापेक्षा जीव जोडून शिकवा.' असे या ठिकाणी मी प्रकर्षाने म्हणेल- कारण जीव तोडून शिकवणे आणि जीव जोडून शिकवणे यात खूप मोठे अंतर आहे. जीव तोडून शिकवणे म्हणजे केवळ शिक्षकाने आपले श्रम व्यर्थ वाया घालवणे होय. 'जीव जोडून शिकवणे म्हणजे श्रम निमपट, यश दुप्पट आणि आनंद तिप्पट' या गोष्टीचे गमक म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन होय. कोणत्याही गोष्टीचे यश हे व्यवस्थापन, नियोजन व नेतृत्वावर अवलंबून असते .


'एखादे मूल सात वर्षे माझ्याकडे सोपवा, त्यानंतर ते मूल परमेश्वर अथवा सैतान कोणीही न्यावे. ते त्या मुलाला बदलू शकत नाहीत.' पेस्टालॉजी या ग्रीक शिक्षकाचे हे उद्गार डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 'अगम्य जिद्द' या पुस्तकात उद्धृत केले आहेत. यावरून प्राथमिक शिक्षणातील वर्षे किती महत्त्वाची आहेत हे या विधानावरून लक्षात येईल. या काळातील शिक्षणाचा ठसा आयुष्यभर कायम राहतो. त्याला कशासाठी शिकायचे याचे रहस्य उलगडते. त्याला कसे शिकायचे याचे मार्ग आपोआप सापडतात. एखाद्या वर्गात तीस ते चाळीस विद्यार्थी शिकत असले तरी वर्गअध्ययनाचे व्यवस्थापन जमले तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण नाही आणि त्यातून साध्य होणारी उद्दिष्टे भविष्याचा वेध घेणारी असतील यात मात्र शंका नाही .

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांना देणे सुरू आहे आणि मला खात्री आहे या प्रशिक्षणानंतर अध्ययन प्रक्रियेत मुळापासून बदल होतील आणि शंभर टक्के शिक्षक ते बदल स्वीकारतील. हे बदल या प्रकारचे असतील. 

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे-

 मूल लहान असताना सायकल शिकते व खूप साऱ्या बाबी मित्रांच्या मदतीने शिकते. या गोष्टी शिकण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे कोचिंग लावण्याची गरज नसते. तर या ठिकाणी आपण ती बाब शिकावी याकरता तो धडपड करत असतो या धडपडीत तो मार्गदर्शकाच्या शोधात असतो आणि त्याच्या मनातील शिकण्याची ज्वलंत इच्छा त्याला शिकण्यासाठी प्रेरित करीत असते आणि या इच्छेतून तो खूप साऱ्या गोष्टी मित्रांकडून शिकतो. हाच धागा पकडून मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे हे शिक्षकापुढील मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान जे शिक्षक पूर्ण क्षमतेने पेलतात त्यांची मुले खूप प्रगती करतात.

 मुलांना शिकण्यास आव्हान देणे-

 भुंगा हा भौतिकशास्त्राच्या नियमानुसार उडू शकत नाही कारण त्याच्या शरीराचे वजन हे खूप जास्त आहे त्या तुलनेत पंख फार छोटे,पातळ. परंतु, भुंग्याला भौतिकशास्त्राचे नियम कुठे माहीत असतात? त्याला एवढेच माहीत असते की मला पंख आहेत ते उडण्यासाठीच आणि त्याच इच्छेने तो उडू शकतो. १९९५ साली क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आला आणि पाचव्या वर्गापर्यंत ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ टक्के क्षमता प्राप्त कराव्या ही किमान अपेक्षा होती. ८५ टक्केच विद्यार्थी ८५ टक्के क्षमता प्राप्त करु शकतात हा विचार शिक्षकांनी मनामध्ये पक्का रुजवला.अशा प्रकारे हे शक्य नाही, ते शक्य नाही हे मुलांना कुठे माहीत असते. त्यांच्या मनावर ते विविध माध्यमातून बिंबवले जाते. मग भुंग्यासारखे निर्मळ मन असणाऱ्या मुलांना त्यांच्यातील सुप्त क्षमतेची जाणीव करून देणे हेच शिक्षकाची खरे कर्तव्य आहेत आणि जो शिक्षक हे कार्य करतो त्याची विद्यार्थी कुठलेही आव्हान स्वीकारतात व पूर्ण करतात. मी सांगतो तेच करा,तसंच करा ही पद्धती आता बंद झालेली आहे. मुलांजवळच निसर्गाने खूप क्षमता दिलेल्या आहेत त्या क्षमतांची उकल जरी शिक्षकाने करून दिली तरी पुरेसे आहे. तुम्ही आजपर्यंत जे करत होतात तेच करत राहिला तर तेच मिळेल जे आजपर्यंत तुम्हांला मिळत होते. नवीन काहीतरी मिळवण्यासाठी नवीन काहीतरी करावे लागते हे मात्र खरे आहे.

अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात ड्रिप एज्युकेशन ही संकल्पना फार महत्वाची आहे.ज्याप्रमाणे कमी कालावधीत, कमी पाण्यात, कमी श्रमात ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) साध्य केल्या जाऊ शकते. त्याचप्रमाणे कमी साधनात, कमी कालावधीत, कमी श्रमात ड्रिप एज्युकेशनच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य केल्या जाऊ शकते.प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो. त्यासाठी जीव तोडून नाही तर जीव जोडून शिकवणे महत्वाचे आहे.कारण जी कोणती अडचण विद्यार्थ्यांना येत आहे ती का येत आहे याचा सर्वार्थाने विचार आपण करणार नाही तोपर्यंत आपण त्या समस्येच्या मुळाशी जाऊ शकणार नाही.त्यासाठी आपण बालक होऊन मी जर त्याठिकाणी असतो तर माझी काय घालमेल झाली असती हा विचार जर शिक्षकाने स्वतःला विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ठेवून केला तर त्याचे उत्तर मिळणे कठीण नाही.

आपण सद्यस्थितीत स्वीकारलेली आकारिक मूल्यमापन पद्धती ही १९८० मध्ये फिनलंड या देशाने टोयोटा या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीतून विकसित केलेली पद्धती आहे. संपूर्ण गाडी तयार झाल्यानंतर तिच्या निर्मितीत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे हे किती डोकेदुखी आहे.ल, हे कंपनीच्या मालकालाच माहीत. म्हणून गाडी तयार करतानाच प्रत्येक टप्प्यावर राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे किती सोपे व फायदेशीर आहे याचा विचार करून प्रत्येक टप्प्यावर मूल शिकत असताना त्यात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे फिनलंडला सोपे वाटले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आकारिक मूल्यमापन पद्धतीला सुरुवात केली. अशाचप्रकारे गुणवत्ता हवी असेल तर प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक शिक्षकाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन साधले तर गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणे अशक्य नाही.आपल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी शिकू शकतात हा सकारात्मक विचार सर्वप्रथम शिक्षकाजवळ असला पाहिजे. या विचारातून विद्यार्थी शिकत नसेल तर का शिकत नसेल याचे चिंतन, मनन करुन विद्यार्थी स्वतः शिकण्यास प्रेरित कसा होईल या दिशेने वाटचाल करुन प्रत्येक टप्प्यावर चिंतन करुन शिकण्यासाठी बाधा येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर गतिमान करण्यासाठी आपण सकारात्मक विचार केल्यास निश्चितच यशस्विता मिळते. मीच शिकवू शकतो हा दृष्टिकोन बाजूला ठेवून विद्यार्थी-विद्यार्थी जोड्या लावून विद्यार्थी कसा शिकतो याचे नियोजन करुन विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करणे हाच टप्पा महत्त्वाचा आहे.कारण शिक्षकांच्या शिकवण्याने विद्यार्थी शिकले असते तर शंभर टक्के विद्यार्थी का शिकत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित का राहावा?

 -राजेश वासुदेव कोगदे

yashkogade@gmail.com

 जि.प. म. उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.-खामगाव जि. -बुलढाणा.


(पूर्व प्रसिद्धी: दैनिक  देशोन्नती ११ जानेवारी २०२४)

Saturday, 2 March 2024

उच्च माध्यमिक शिक्षणाची त्रिशंकू अवस्था

 उच्च माध्यमिक शिक्षणाची त्रिशंकू अवस्था

कस्तुरीरंगन समितीने सुचवलेल्या आकृतिबंधातील शेवटचा स्तर म्हणजे नववी ते बारावीपर्यंतचे सलग चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये या संकल्पना रद्द करण्याची शिफारसही समितीने केली होती आणि या शिफारशीमुळे विशेषत: महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याचे कारण बहुतेक राज्यांत अकरावी-बारावीचे वर्ग माध्यमिक शाळांना जोडलेले आहेत, पण महाराष्ट्रात मात्र हे वर्ग माध्यमिक शाळांत, महाविद्यालयांत आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्वरूपात, असे तीन ठिकाणी विखुरलेले आहेत.


 अकरावी-बारावीचे वर्ग सरसकट माध्यमिक शाळांत स्थलांतरित करायचे झाले तर महाविद्यालयांत आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे काय होईल? या संस्थांत जादा होणाऱ्या आणि माध्यमिक शाळांत नव्याने निर्माण कराव्या लागणाऱ्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचे काय करणार? यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचे काय? दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कशा होतील? असे प्रश्न शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना पडले होते. मात्र नवीन आकृतिबंध अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीपुरताच असून वर्गांची प्रत्यक्ष हलवाहलव करावी लागणार नाही; तसेच +४ स्तराचे पूर्वीप्रमाणेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे उपस्तर असतील, असे अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्पष्ट करण्यात आल्यामुळे शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता हे प्रश्न नसले, तरी अजूनही सोडवणूक न झालेले पूर्वीचे काही प्रश्न आहेत. त्यांचा अडसर दूर केल्याशिवाय धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी प्रभावी रीतीने करता येणार नाही.

महाविद्यालये आणि माध्यमिक शाळा अशा दोन्ही ठिकाणी उच्च माध्यमिक स्तराला दुजाभावाची वागणूक मिळते. दोन्ही ठिकाणी अकरावी-बारावीच्या वर्गांचे विलगत्व प्रकर्षाने जाणवत असते. महाविद्यालयीन शिक्षकांना श्रेष्ठत्व गंडामुळे अकरावी-बारावीचे जग आपले वाटत नाही. अकरावी-बारावीचे शिक्षक आणि विद्यार्थी यांना महाविद्यालयाच्या उपक्रमांत क्वचितच सहभागी करून घेतली जाते. माध्यमिक शाळांमध्येसुद्धा वेगळ्या कारणांनी का असेना, पण अकरावी-बारावीचा स्तर असाच बाजूला पडलेला दिसतो. इथे उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांमध्ये श्रेष्ठत्व गंडाची भावना असते. माध्यमिक शाळांतील दहावीत चांगले गुण मिळालेले बहुतेक विद्यार्थी दहावीनंतर महाविद्यालयांत प्रवेश घेतात; इथल्या अकरावीत प्रामुख्याने बाहेरून आलेले विद्यार्थी असतात. काही अपवाद वगळता माध्यमिक शाळांना त्यांच्याबद्दल फारसा आपलेपणा वाटत नाही.

ज्यांच्या प्रवेशाच्या ‘कट ऑफ’ पॉइंटच्या बातम्या दररोज प्रसारमाध्यमांत येत असतात, अशा नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांतसुद्धा विज्ञान शाखेचे आणि बऱ्याच प्रमाणात वाणिज्य शाखेचे वर्ग ऑक्टोबरनंतर रिकामे दिसतात. हे विद्यार्थी शाळेच्या वेळेतच कोणत्या ना कोणत्या, बहुधा त्यांच्या संस्थेची भागीदारी असलेल्या, कोचिंग सेंटर्समध्ये जात असतात. गैरहजर असूनही त्यांची हजेरी लावली जाते. बारावी पास होण्यासाठी कोणत्याही महाविद्यालयात किंवा शाळेत गेले नाही तरी चालू शकते; अशी आजची परिस्थिती आहे. कोचिंग क्लासेसच्या या देशव्यापी समस्येवर उपाय म्हणून केंद्र शासनाने कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत इतर अटींबरोबरच विद्यार्थ्यांशी संबंधित महत्त्वाच्या अटी आहेत. वयाची सोळा वर्षे पूर्ण केलेल्या किंवा एसएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच कोचिंग केंद्रांत प्रवेश देता येईल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी खूप आधीपासूनच अनेक कोचिंग केंद्रांत तयारी सुरू होते, त्याला आता आळा बसू शकेल. विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळेत कोचिंग देता येणार नाही, ही आणखी एक महत्त्वाची अट आहे. मानसशास्त्रीय समुपदेशन आणि अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमपूरक कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा कोचिंग केंद्रांत अपेक्षित आहे. ही तत्त्वे कितपत प्रभावी ठरतील, हे कळेलच. पण त्यांमुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी अंतर्मुख होण्याची गरज अधोरेखित झाली आहे, हेसुद्धा कमी महत्त्वाचे नाही.

प्रशासकीय प्रश्नांपुढे शैक्षणिक प्रश्न झाकोळून जातात. कनिष्ठ महाविद्यालयांच्या बाबतीत असेच झाले. प्रशासकीय प्रश्न सुटलेच पाहिजेत; कारण त्यांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेमुळे शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष होते. पण प्रशासकीय प्रश्न सुटले की आपोआप शैक्षणिक प्रश्नांवरील विचार सुरू होत नाही; त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे लागते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतिम मसुद्यात केलेल्या प्रशासकीय तडजोडीमुळे कस्तुरीरंगन समितीला अपेक्षित असणारी शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होतील का?


 - डॉ. वसंत काळपांडे 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २१ फेब्रुवारी २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...