Saturday, 26 October 2024

एकात्मिक, आंतरविद्याशाखीय शिक्षण

एकात्मिक, आंतरविद्याशाखीय शिक्षण 

मागच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात ‘एकात्मिक’ पाठ्यपुस्तकांचा प्रयोग चालू आहे. वेगवेगळ्या विषयांच्या आधीपासून वापरात असलेल्या पाठ्यपुस्तकांचे चार तुकडे करून, त्यांत कोणताही सहसंबंध न लावता, ते नुसते चार भागांत एकत्र बांधून तयार केलेल्या या पुस्तकांत ‘एकात्मिक’ काय आहे, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. एकात्मिक ही संकल्पना त्याहून खोलात जाणारी आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (2020) आणि शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (2023) शिक्षणातील एकात्मता, आंतरविद्याशाखीय शिक्षण, बहुविद्याशाखीय शिक्षण या बाबींचा वारंवार उल्लेख येतो. त्यामागचा विचारही त्यात सविस्तरपणे दिला आहे. तो समजून घेण्याची गरज आहे. 

शिक्षण देण्याघेण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे मुलांना आपल्या परिसराचे ज्ञान व्हावे, परिसराचा एक सुज्ञ, जबाबदार घटक म्हणून त्यात सहभागी होता यावे. मुलांच्या वयानुसार या परिसराची व्याप्ती स्थानिक – प्रादेशिक – राष्ट्रीय -वैश्विक - अशी वाढत जाते. त्यातील भौतिक, जैविक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या पैलूंचे बारकावे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात. शिकवण्याच्या सोयीसाठी आपण ते भाषा, गणित, भूगोल, विज्ञान अशा विषयांच्या कप्प्यांत विभागले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात आपण एकाच वेळी अनेक विषय हाताळत असतो. साधे भाजी आणण्याचे उदाहरण घेतले, तरी तेव्हा संवाद करताना भाषा, हिशोब करताना गणित, भाज्या निवडताना आणि पिशव्यांत ठेवताना वनस्पतिशास्त्र, भौतिकशास्त्र अशा खूप विषयांचा वापर आपण सहजतेने एकाच वेळी करत असतो. शिकवताना मात्र त्यांपैकी भाषेचे व्याकरण, गणितातील आकडेमोड, वनस्पतींची नावे आणि उपयोग, आकारमान, घनता आणि इतर भौतिक गुणधर्म हे सगळे भाग सुटे करून स्वतंत्रपणाने शिकवले जातात. असे करण्यात त्यांचा संदर्भ हरवतो आणि मग मुलांना शिकण्याचा अनुभव कृत्रिम, नीरस वाटू लागतो. एकात्मिक शिक्षण पद्धतीत प्रत्येक अध्ययन घटक त्याच्या प्रत्यक्षातील संदर्भासह शिकवला जाईल, मुलांना तो जीवनाशी सहजतेने जोडता येईल, अर्थपूर्ण वाटेल असा प्रयत्न केला जातो. हे करण्याचे दोनतीन मार्ग आहेत. एक म्हणजे शालेय विषयांची विज्ञान, भूगोल, इतिहास, भाषा, कला, क्रीडा अशी पारंपरिक विभागणी बाजूला ठेवायची. त्याऐवजी ‘अन्न’, ‘पाणी’, वाहतूक’, ‘व्यवसाय’ अशा काही थीम्स किंवा केंद्रविषय ठरवून घेऊन त्यांच्याच भोवती संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना करायची. सुरवातीच्या टप्प्यावर म्हणजे फार तर चौथीपाचवीपर्यंत हे करणे तुलनेने सोपे जाते. याचे कारण बहुतेक ठिकाणी एकच शिक्षक सर्व विषय हाताळत असतात. अध्ययन घटकही संख्येने कमी, प्राथमिक स्वरूपाचे असतात. त्यांना एकत्र गुंफणे तसे सोपे असते. तरी भाषा, गणित यांतील काही मूलभूत बाबी स्वतंत्रपणेच शिकवाव्या लागतात. उदाहरणार्थ, लेखनाचे नियम किंवा दशमान पद्धतीतील स्थानिक किंमत हा घटक. हे लक्षात घेऊन, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात असे सुचवण्यात आले आहे, की पहिलीदुसरीत दोन भाषा, गणित यांचा पाया पक्का करावा, इतर ‘अभ्यासविषय’ नसावे. तिसरी ते पाचवी या टप्प्यावर दोन भाषा, गणित, कला-हस्तव्यवसाय आणि शारीरिक शिक्षण यांखेरीज फक्त ‘द वर्ल्ड अराऊंड अस’ – ‘आपल्या भोवतीचे जग’ असा एकच एकात्मिक विषय असावा. 

पुढच्या टप्प्यांवर मात्र सगळे अध्ययन घटक काही ठराविक केंद्रविषयांत (थीम्स) बसवणे जिकिरीचे होते. शिवाय हे काहीसे प्रगत शालेय विषय हाताळणारे शिक्षकही वेगवेगळे असतात. म्हणून सहावीपासून पुढे सामाजिक शास्त्रे, विज्ञान अशी विषयांची विभागणी केली जाते. मात्र हे विषय जरी स्वतंत्रपणे शिकवले तरी शिकवताना, आशय निवडताना, त्या विषयांचा इतर विषयांशी असलेला सहसंबंध वेळोवेळी स्पष्ट होईल असा बहुविद्याशाखीय दृष्टिकोण ठेवणे आता अपेक्षित आहे. पुढे नववी-दहावीच्या टप्प्यावर तर ‘आंतरविद्याशाखीय क्षेत्रे’ हा एक विषयच नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. सामाजिक शास्त्रांच्या शिक्षकाने हाताळायचा ‘इंडिव्हिज्युअल इन सोसायटी’ – ‘समाजात (सहभागी) व्यक्ती’ आणि विज्ञान शिक्षकाने हाताळायचा ‘पर्यावरण शिक्षण’ असे दोन भाग त्यामधे असतील. त्यामुळे दोनतीन संबंधित विद्याशाखांचा (उदाहरणार्थ, इतिहास-राज्यशास्त्र-अर्थशास्त्र) एकाच वेळी विचार करणे शक्य होईल.. 

हे सर्व खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवायचे असेल, तर आधी या विचाराचे मर्म समजून घेऊन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, वर्गातील अध्यापन, मूल्यमापन या सगळ्यांची मुळापासून फेरबांधणी करावी लागेल.

- धनवंती हर्डीकर

( पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २५ सप्टेंबर २०२४)

Saturday, 19 October 2024

खुले, बहुपेडी अध्यापन

खुले, बहुपेडी अध्यापन

वर्गातील प्रत्येक मुलाकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षण दिले पाहिजे, ही बाब अधोरेखित करताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात काही पद्धती आणि तंत्रे सुचवली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘डिफरन्शिएटेड’ (विभेदित) अध्यापन. याचा एक अर्थ म्हणजे वेगवेगळ्या मुलांची तोपर्यंतची एकूण तयारी किंवा क्षमता लक्षात घेऊन, त्यांना त्यानुसार कमीजास्त काठिण्यपातळीचा अभ्यास देणे. उदाहरणार्थ, गणित शिकवताना एकाच घटकावर काही मुलांना अवघड, तर ज्यांचे मूलभूत संबोध अजून पक्के नाहीत, त्यांना अगदी सोपी गणिते द्यायची. यामागची कल्पना अशी, की कोणताही घटक शिकताना प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने शिकता यावे, पुढे जाता यावे.

‘डिफरन्शिएटेड’ अध्यापन या कल्पनेची हाताळणी फार संवेदनशीलतेने, सक्षमपणे होणे गरजेचे आहे. एक तर प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा स्तर त्याच्या शिक्षकांना नेमकेपणाने माहीत हवा. त्यात वेळोवेळी काय फरक होतो आहे, याची त्यांनी सतत दखल घ्यायला हवी आणि त्या मुलाला देण्याच्या कामात बदलही करायला हवा. डिजिटल स्वयं-अध्ययन प्रणालीत कदाचित हे करता येईल, पण वर्गातील थेट अध्यापनात हे करणे जिकिरीचे आहे. विशेषतः खूप विद्यार्थी असलेल्या वर्गात तर खूपच अवघड आहे. शिवाय वरील उदाहरणाप्रमाणे फक्त आकलनात्मक भाग विचारात घेतला, तर यामुळे शिक्षक-विद्यार्थी-पालक स्तरावर याबाबत गैरसमज निर्माण होण्याची, मुलांवर ‘प्रगत-अप्रगत’ असे शिक्के बसण्याची, वर्गातील वातावरण बिघडण्याची आणि मागे राहिलेल्या मुलांची शिकण्याची प्रेरणा नष्ट होण्याचीही शक्यता आहे.

‘डिफरन्शिएटेड’ अध्यापनाचा आणखी व्यापक अर्थ असा, की प्रत्येक मुलाची वेगळी आवडनिवड, अभ्यासाची वेगळी पद्धत, त्याला पूर्वी मिळालेल्या, न मिळालेल्या संधींमुळे तयार झालेला त्याच्या शिक्षणाचा बरावाईट आलेख, हे फरक लक्षात घेऊन, शिकण्याचे अनेक पर्याय वर्गात एकाच वेळी उपलब्ध करून देणे. 

दीपाली मॅडमना कविता शिकवायला फार आवडते. कवितेचे मर्म आणि सौंदर्य समजून ती कायम लक्षात राहणे हा मुलांसाठी आयुष्यभराचा ठेवा आहे, तो प्रत्येकाला मिळायला हवा असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी स्वतः कवितेची ओळख करून दिल्यानंतर, त्या अनेकदा वर्गात मुलांचे गट पाडतात. हे गट बदलत राहतात, पण दर वेळी प्रत्येक गटात भिन्न भिन्न आवडीनिवडी आणि वेगवेगळ्या क्षमता असलेली मुले असतील अशी काळजी त्या घेतात. प्रत्येक गटाला कवितेशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कृती त्या देतात – कविता सुंदर अक्षरांत लिहिणे, त्याला चित्रे, नक्षी, वगैरे काढून समर्पक सजावट करणे, सोबत कवितेचा अन्वय लावून तो लिहिणे, त्याला कवितेच्या वैशिष्ट्यांचे टिपण किंवा रसग्रहण जोडणे, त्यावर एक छोटा नाट्यप्रसंग किंवा नृत्यनाट्य लिहून, बसवून तो सादर करणे, कवितेच्या अनुषंगाने स्वतःचे अनुभवकथन करणे, वगैरे. हा गृहपाठ नसतो. मुले वर्गातच ही कामे करतात. कोणते काम कोणी करायचे, हे गटांतील मुले स्वतःच ठरवतात. गटांचे काम पूर्ण झाल्यावर ते वर्गात सर्वांसमोर सादर करतात. मग त्यावर चर्चाही होते. कधी कधी सर्वोत्कृष्ट कामाची निवड होते. यात वेळ खूपच जातो, पण प्रत्येक मूल कवितेशी त्याच्या त्याच्या रुचीनुसार जोडले जाते. शिवाय संघभावना, आपल्यापेक्षा वेगळी मते, क्षमता जवळून पाहण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिळते. गटाच्या एकत्रित कामाची दखल मॅडम आकारिक मूल्यमापनात घेतात.

विज्ञान शिकवणाऱ्या मीनाक्षी मॅडमच्या वर्गातही असेच बहुपेडी अध्यापन चालते. आपण कोणता स्वाध्याय, उपक्रम किंवा प्रकल्प निवडायचा, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मुलांना असते. तसे भरपूर पर्याय त्या देतात – त्या घटकावर आधारित प्रयोग वर्गात सादर करायचे, त्याच्याशी संबंधित बातम्या गोळा करायच्या, त्या घटकाची थोडक्यात माहिती देणारे पोस्टर, टीव्ही-रेडिओ स्क्रिप्ट तयार करायचे, त्याच्याशी संबंधित प्रश्नमंजूषा तयार करायची, इतर इयत्तांमध्ये त्याबद्दल आलेला भाग शोधायचा, तो घटक इतरांना समजावून सांगायचा, वगैरे. हे काम एकट्याने, जोडीत की गटात करायचे, ते बरेचदा मुलेच ठरवतात. या सर्व कामांची तयारी करत असताना त्या घटकाची निरनिराळ्या माध्यमांतून उजळणी होतेच, शिवाय शिकण्याची प्रक्रियाही अधिक अर्थपूर्ण, उत्साहाची होऊ लागते. खुल्या आणि समावेशक अध्यापनाचे मार्ग स्वीकारले, तर कोणत्याही वर्गात असे बहुपेडी, समृद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकेल.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ११ सप्टेंबर २०२४)

Saturday, 12 October 2024

विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेताना

विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेताना 

शालेय शिक्षणाची अंतिम उद्दिष्टे आणि त्यांचे इयत्तावार टप्पे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी समानच असतात. तरीही शिक्षणात समानता दिसत नाही, याचे कारण शेवटचा टप्पा ठरलेला असला, तरी प्रत्येक मुलाची सुरवात वेगळ्या बिंदूपासून होते आणि वाटचालही वेगवेगळ्या प्रकारे होत राहते. हे वेगळेपण लक्षात घेऊन प्रत्येक मुलाला त्याच्या शिक्षणात आवश्यक ती मदत मिळावी, अशी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील महत्त्वाकांक्षी अपेक्षा आहे. शिक्षकांच्या हाताशी असलेल्या अपुऱ्या साधनसुविधा आणि इतर अडचणी लक्षात घेतल्या, तरी त्या दृष्टीने सुरवात तर नक्कीच करायला हवी आहे. आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाच्या स्वतंत्र आरंभबिंदूचा, गरजांचा अभ्यास ही त्यातील पहिली पायरी आहे. 

शिक्षण ही सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे, असे धरले, तर गरजांचा अभ्यासही सर्वांगीण असायला हवा. भौतिक, शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक सर्व प्रकारच्या गरजांचा परिणाम शिकण्यावर होत असतो. भुकेलेले, आजारी, दुःखी, अस्वस्थ, कंटाळलेले, चिडलेले मूल शिकण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, हे उघडच आहे. यावर उपाय करणे बऱ्याचदा शिक्षकांच्या हातात नसते. एखाद्या मुलाच्या बाबत सतत असे काही दिसत असेल, तर त्याची दखल घेऊन समुपदेशन, पालकांशी चर्चा असे काही उपाय शिक्षक करू शकतात, करत असतात. ही टोकाची उदाहरणे झाली. गरजांचा विचार यापेक्षा अधिक व्यापक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया जास्तीत जास्त फलदायी व्हावी, म्हणून प्रत्येक मुलाच्या परिस्थितीचे शिक्षकाने काढलेले मानसचित्र म्हणजे गरजांचा अभ्यास. पारंपरिक स्वरूपाची परीक्षा घेऊन मुलांना अभ्यासातील काय येते, काय येत नाही, हे स्पष्ट होते. त्यापुढे जाऊन, ते का येत नाही, याचा शोध म्हणजे गरजांचा अभ्यास. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि गटवार प्रकल्प, उपक्रम, चर्चा, सर्वेक्षणे, क्षेत्रभेटी, छोटे शोधनिबंध, सादरीकरण असे पारंपरिक अभ्यासापेक्षा निराळे मार्ग हाताळायचे आहेत. ते हाताळताना प्रत्येक मूल कसा प्रतिसाद देते, त्याला कुठे मदतीचा हात हवा आहे, त्याचा अभ्यास म्हणजे गरजांचा अभ्यास. सर्वसाधारण विद्यार्थ्याला तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यालाही आणखी पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे, ते पाहणे म्हणजे गरजांचा अभ्यास.

अंकिताकडे तिला दिलेल्या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे, पण तिला वर्गासमोर उभे राहून बोलण्याची भीती वाटते. तिचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. कोणती कृती करायची, हे तेजसला नीटसे कळलेले नाही, पण ते इतरांना किंवा शिक्षकांना पुन्हा विचारण्यात त्याला कमीपणा वाटतो. त्याला थोडी भावनिक समुपदेशनाची गरज आहे. गटात चर्चा करताना वरद एकटाच जोरात बोलत राहतो, त्याची सामाजिक कौशल्ये सुधारण्याची गरज आहे. अस्मिताने पुस्तकातील गणिते केव्हाच सोडवून टाकली आहेत. बाई वर्गात शिकवत असताना ती टिवल्याबावल्या करत बसते. तिला आव्हानात्मक वाटेल, असे काम देण्याची गरज आहे. आर्यन प्रत्यक्षात प्रयोग नीट करून दाखवतो, पण ते शब्दांत लिहिताना त्याचा गोंधळ होतो. त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी त्याच्या लेखनक्षमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. क्षेत्रभेटीत काय पाहिले, हे सोहम व्यवस्थित लिहितो, पण त्यावरून स्वतःचे निरीक्षण, निष्कर्ष सांगणे त्याला जड जाते. त्याच्या विचारशक्तीला थोडी चालना द्यायला हवी आहे. आशयकेंद्री अध्यापनात अशा बाबींकडे लक्ष दिले जात नसे. पण तो साचा बदलायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या आधाराची गरज आहे, हे पाहून त्यानुसार कृती करण्याचे अवघड काम शिक्षकांना करावे लागेल. हे जर करता आले, तर वर्गातील अध्ययन-अध्यापन मुलांना खरोखरच आपलेसे वाटू लागेल. गरजांचा अभ्यास मुलांची गुणवत्ता कमीजास्त ठरवण्यासाठी नाही, तर सर्वांना आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी करणे महत्त्वाचे. 

प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात ‘अध्ययन निष्पत्ती’ म्हणून मुलांच्या बौद्धिक विकासाचे अपेक्षित टप्पे दिले जातात. त्यासोबत भावनिक, सामाजिक, मनोकारक (सायकोमोटर) विकासाचे अपेक्षित टप्पेही स्वतंत्रपणे नोंदवले, तर शिक्षकांना आपल्या मुलांच्या गरजा ठरवणे सोपे जाईल. वर्गातील अध्ययन-अध्यापनाचा आतापर्यंतची चाकोरी मोडून नवे शैक्षणिक वातावरण तयार करायचे असेल, तर मुलांची प्रगती ठरवण्याचे नवे आयाम लक्षात घ्यावे लागतील.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, ०४ सप्टेंबर २०२४)

Saturday, 5 October 2024

शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन

शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन

व्याख्या, सूत्रे, माहिती आणि अशाच इतर तपशीलांवर प्रश्न काढणे आणि त्यांची उत्तरे बरोबर की चूक हे ठरवणे सोपे असते. पण शिकण्याची क्षमता ही अमूर्त गोष्ट आहे. तिचे मूल्यमापन कसे करणार? ती उपजतच असावी लागते अशीही एक समजूत असते. ती खरी धरल्यास दरवर्षी तिचे मूल्यमापन तरी काय करणार? ज्या गोष्टीचे मूल्यमापन होत नाही, तिला शिक्षणपद्धतीत महत्त्व राहत नाही. या संदर्भात शिक्षक, पालकांपर्यंत काही गोष्टी प्रभावीपणे पोचवण्याची गरज आहे - शिकण्याच्या, शिकत राहण्याच्या क्षमतेचा जाणीवपूर्वक विकास करता येतो, मूल्यमापनही करता येते, मात्र त्यासाठी पारंपरिक प्रश्न आणि परीक्षांपेक्षा वेगळे प्रश्न, वेगळी तंत्रे प्रामाणिकपणे वापरायला हवीत. 

नेहमीच्या परीक्षांमध्ये मुले तोपर्यंत काय शिकली हे तपासले जाते. पण शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करताना पुढील भाग शिकण्याची मुलांची किती तयारी आहे, हे आजमावले जाते. या मूल्यमापनाचा उपयोग मुलांवर शिक्के मारण्यासाठी नाही, तर त्यांना लागणारे पुढील मार्गदर्शन देण्यासाठी होतो. याचा अर्थ त्या त्या विषयातील संबोधांची, आशयाची परीक्षा घ्यायचीच नाही, असा नाही. पण मुलांना त्या संबोधांचा उपयोग करता येणे जास्त महत्त्वाचे. उदाहरणार्थ, इतिहासाच्या परीक्षेत ‘उताऱ्यातील वर्णन वाचून त्याचा काळ निश्चित करा आणि तो कसा निश्चित केला, हेही लिहा’ असे सांगणे. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत लोकजीवनाचे – कपडे, अन्न, राहणी, चालीरीती यांचे - वर्णन देऊन तेथील हवामान, उद्योगधंदे, भौगोलिक वैशिष्ट्ये इत्यादींचा अंदाज बांधायला सांगणे. वैज्ञानिक उताऱ्यातील कोणत्या बाबी पडताळून पाहता येतील आणि कशा, ते विचारणे. अर्थात असे उतारे निवडताना, तयार करताना शिक्षकांचाही कस लागेल. 

प्रश्नपत्रिकेतील असे बदल अगदी सुरवातीच्या इयत्तांपासूनच करणे शक्य आहे. अगदी सोपे उदाहरण घ्यायचे, तर गणितात नुसत्या सुट्या आकृत्या देऊन त्यांची चौकोन, त्रिकोण अशी नावे लिहायला सांगण्यापेक्षा, एखादे नेहमीच्या पाहण्यातील दृश्य देऊन त्यात आढळणारे आकार ओळखायला सांगणे. परिसर अभ्यासात ‘दिलेले वर्णन वाचून सजीव की निर्जीव, प्राणी की वनस्पती ते ओळखा आणि कसे ओळखले ते सांगा’ असा प्रश्न करणे. 

मूल्यमापन फक्त सत्राअखेर किंवा वर्षाअखेर एकदाच न करता, दररोज वर्गात शिकवतानाही एकीकडे मुलांचे मूल्यमापन करत राहायचे ही कल्पना शाळांमध्ये नवीन नाही. शिकण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी हे पद्धतशीरपणे घडणे फार महत्त्वाचे आहे. एक तर मुलांना त्या त्या स्तराला योग्य अशी अभ्यासाची वेगवेगळी तंत्रे शिक्षकांनी जाणीवपूर्वक सांगितली पाहिजेत, त्यावर चर्चा केली पाहिजे आणि स्वतःसाठी सगळ्यात जास्त उपयोगी तंत्रे मुलांना स्वतः निवडू दिली पाहिजेत. मग त्यासाठी छोटी छोटी उद्दिष्टे नेमून देऊन मुले ती पूर्ण करू शकतात की नाही, हे पाहता येईल. गृहपाठ, निबंध एकदाच तपासून न टाकता मुलांनी आपल्या चुका दुरुस्त करून, सुधारणा करून ते पुन्हा लिहावेत अशी संधी देता येईल. आपल्या वर्गातील मुलांच्या अभ्यासाच्या सवयी, त्यातील अडचणी याबाबत प्रश्नावली तयार करून शिक्षक एक छोटे सर्वेक्षण करू शकतात. वर्गातील प्रत्येक मुलाची वर्षातून किमान चार वेळा ‘अभ्यास’ या विषयावर मुलाखत घेऊन, त्याच्या नोंदी ठेवून मुलांच्या सवयींत, वृत्तींत किती, कसा फरक पडला, ते पाहता येईल. त्याचा उपयोग मुख्यतः मुलांना वैयक्तिक गरजेनुसार अभ्यासाचे टप्पे ठरवून देण्यासाठी, समजावून देण्यासाठी करणे महत्त्वाचे. मग हे टप्पे ती गाठू शकतात की नाही, याचे वैयक्तिक मूल्यमापन करता येईल. दिलेल्या भागावर मुलांना स्वतःलाच प्रश्नपत्रिका तयार करायला सांगणे, एखादा भाग इतरांना शिकवण्याची संधी देणे हीदेखील काही सुपरिचित उपयोगी तंत्रे आहेत. 

सार्वजनिक किंवा बोर्डाच्या परीक्षांमध्येही ‘अभ्यासक्रमाच्या बाहेरील’ वाटू शकतील असे, संबोधांच्या खऱ्या आयुष्यातील उपयोजनावर आधारित प्रश्न येऊ शकतील; सविस्तर, चर्चात्मक, रसग्रहणात्मक उत्तरे लिहावी लागतील, यासाठीही शिक्षक, विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल. मुख्य म्हणजे तयार उत्तरे, प्रकल्प वगैरे पुरवणे, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेत अवाजवी भरमसाठ गुण देणे अशा मार्गांनी आपण मुलांच्या शिकण्याच्या क्षमता पोखरून टाकत आहोत यांची प्रखर जाणीव सर्व संबंधितांच्या मनात निर्माण करावी लागेल.

- धनवंती हर्डीकर 

( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २८ ऑगस्ट २०२४ )

Wednesday, 2 October 2024

सफर नवोपक्रमांच्या नवलनगरीची

 सफर नवोपक्रमांच्या नवलनगरीची                                                                ('शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' या उपक्रमांतर्गत डॉ. वसंत काळपांडे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केलेल्या ‘नवोपक्रमांची नवलनगरी’ या पुस्तकाविषयी माहिती देणारा हा लेख) 

कामाच्या निमित्ताने मी माझा मित्र अजित वांडरे याच्या शाळेत गेलो होतो. त्याची शाळा द्विशिक्षकी प्रकारातील वस्ती शाळा होती. भेटीदरम्यान त्याने मला दुसरीच्या वर्गात नेले आणि मुलांना ABCD म्हणण्यास सांगितले. त्याबरोबर ती मुले A for Attitude, B for Business, C for Career असे म्हणत होती. मी अचंबित झालो. 

“अरे हे काय? ही कोणती ABCD”? मी म्हणालो. “A for Ant, B for Ball हे तर सर्वांनाच पाठ असते. हे त्यापेक्षा वेगळे आहे आणि त्यानिमित्ताने नवीन शब्दांची ओळख होते”, अजित म्हणाला. 

“अरे पण एवढे अवघड शब्द ?” मी म्हटलं. 

“ती आपली अडचण असते. मुलांची नाही. आणि आमचा A for Attitude हा काही फिक्स नाही तो नेहमी बदलत राहतो त्यामुळे आमची ABCD सतत नवीन असते", अजितने सांगितले. 

हा अजित असेल किंवा गणितातील केवळ सूत्रे न सांगता त्यामागील गोष्ट सांगणारा एन. डी. पाटील असेल, मला वाटते त्यांचे हे सर्व नवोपक्रमच आहेत. जेंव्हा एखादा शिक्षक त्याला व त्याच्या विद्यार्थ्यास रूचेल अथवा पचेल असे नवीन अध्ययन अनुभव देवून आपले कार्य साधत असतो, तेव्हा तो त्याचा नवोपक्रमच असतो. त्यादृष्टीने मला ‘नवोपक्रमांची नवलनगरी’ पुस्तक महत्त्वाचे वाटते. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या प्रमुख बाबींवर भर दिला आहे, त्यापैकी काही महत्त्वपूर्ण बाबींना समर्पक असे विविध नवोपक्रम या पुस्तकामध्ये आहेत. तसे पाहिले तर स्वयंपाक घर हे प्रत्येकाच्या घरात असतेच, मग ते घर मोठे असो अथवा छोटे. त्याचाच वापर शैक्षणिक साधन म्हणून नवीन अनुभव देण्यासाठी कसा करता येईल याचा वस्तुपाठ वर्षा गायकवाड यांच्या "स्वयंपाकघरातून संशोधनाकडे" या उपक्रमातून दिला आहे. पुस्तकापलीकडचे जग दाखवायचे तर प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत हे सांगताना त्यांनी योजलेले उपक्रम व दिलेल्या भेटी पाहता या उपक्रमाचा त्यांनी कृती, कृतीमागील शास्त्र, त्यांचे आहारमूल्य आणि त्यामागील अर्थशास्त्र इथपर्यंत विस्तार केला आहे. थोडक्यात हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

नवीन शैक्षणिक धोरणात शालेय स्तरावर ग्रंथालये समृद्ध करणे करणे अपेक्षिलेले आहे. त्यासाठी अत्यंत सोप्या, स्वस्त, व सहज उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीतून ग्रंथालय कसे विकसित करता येते हे कृष्णात जाधव यांनी आपल्या “रद्दीतून ग्रंथालय" या उपक्रमातून दाखवून दिले आहे. प्रत्येक शाळेस महागडी पुस्तके विकत घेता येतीलच असे नाही. पण शिक्षक जर कल्पक असेल तर काय अशक्य आहे ? अगदी रोजचे वर्तमानपत्रही चांगले ग्रंथालय ठरू शकते. कसे ते कृष्णात जाधव यांचा नवोपक्रम वाचला की लक्षात येते. 

गजानन निवळे यांनी ओरिगामीचा वापर दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कसा करता येईल याचे प्रात्यक्षिकच आपल्या उपक्रमातून सादर केले आहे. बौद्धिकदृष्ट्या सौम्य आणि मध्यम दिव्यांग मुलांमध्ये कारक कौशल्यांच्या विकासासाठी हात व डोळा यांचा समन्वय का आवश्यक आहे हे विविध उदाहरणांद्वारे समजावून दिले आहे. ओरिगामीद्वारे दिव्यांग मुलांच्या जीवनात नवी दृष्टी निर्माण करता येते हे आपणांस या नवोपक्रमातून लक्षात येईल. 

आपल्या आंतरिक तळमळीने स्थलांतराचा प्रश्न सोडणारा जगदीश कुडे असो किंवा मुलांच्या शालेय अभ्यासात पालकांना सामावून घेणारे रामकृष्ण वाटेकर असोत, या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांचे उपक्रम आपल्याला नवी दृष्टी देतात. इतिहासाचा अभ्यास शाळेत बसून करण्याऐवजी जर प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारा केला तर काय परिणाम साधता येतो हे डॉ. शिवानी लिमये यांनी त्यांच्या उपक्रमात सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. 

संगीत व कला यांचे स्वतंत्र महत्त्व आपण जाणतो. मात्र यांचा  वापर अध्यापनामध्ये केला तर मुलांच्या अभिव्यक्तीमध्ये किती लक्षणीय बदल घडून येतात, मुलांच्या कला कशा फुलून येतात व त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनाबाबत गोडी वाढून त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, हे सोमनाथ वाळके यांनी आपल्या उपक्रमातून सिद्ध केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सर्जनशील विचारांना खूपच महत्त्व दिले आहे. त्यादृष्टीने राजकिरण चव्हाण यांनी आपल्या Iconic Club या सर्जनशील उपक्रमाने चकित केले आहे. आदर्शांचे केवळ अनुकरण न करता ते आदर्श का आहेत? आपण त्यांचे का अनुकरण करायचे? याची माहिती विद्यार्थीदशेतच जर विद्यार्थ्याना मिळाली तर भविष्यात उत्तम नागरिक निर्माण होण्यास कसा फायदा होईल हे त्यांच्या नवोपक्रमातून शिकायला मिळते. तर मुलांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या विकासास कशी चालना द्यावी हे राम जाधव यांच्या उपक्रमातून पाहाण्यास मिळते. 

शाळेत शिकण्याची प्रमाण भाषा मराठी असली तरी जवळपास बावन्न ते पंचावन्न बोली भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात. बहुसांस्कृतिकत्व व बहुभाषिकत्त्व हे सूत्र पकडून उमेश खोसे यांनी पालावरच्या मुलांसाठी मराठीबरोबरच त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत शब्दकोश तयार केला आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. स्थानिक मुलांना शिकण्याची गोडी लावणारा हा उपक्रम हा महत्वाचा वाटतो.

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर व आपला विद्यार्थी उद्याचा केवळ भारताचा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा नागरिक बनणार आहे. त्या दृष्टीने इंग्रजीचे वाढते महत्त्व लक्षात घेवून किशोर भागवत व मंगेश कडलग यांनी ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजीचे ज्ञान वाढावे व इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठीचे उपक्रम आपणास या पुस्तकात वाचायला मिळतात. 

कृतीतून विज्ञान व जलसाक्षरता हे विषय मांडणारे प्रवीण शिंदे व डॉ. नंदकिशोर बोकाडे तर खूप काही शिकायचे तर काही विसरायलाही हवे व पुन्हा शिकायला हवे, याबद्दल बोलतात. लर्निंग टू अनलर्न अँड रीलर्न ही आधुनिक संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवता येईल हे मांडणाऱ्या शिल्पा पाटील यांचा उपक्रम आपणास खूप काही शिकवून जातो.

‘मेंदूचा पासवर्ड’ या पुस्तकाद्वारे सर्वदूर परिचित असणाऱ्या या पुस्तकाच्या संपादक डॉ. श्रुती पानसे यांनी उद्या चांगले हवे असेल तर, आज सकस द्यावे लागेल हे आपल्या नवोपक्रमाचे योगदान यात अगदी मुद्देसूद व तार्किकपणे मांडले आहे. त्यांचा लेख हा या पुस्तकास वैचारिक अधिष्ठान मिळवून देतो. 

एकूणच सर्व शिक्षकांनी केलेले नवोपक्रम केवळ काहीतरी वेगळे व नवीन करायचे म्हणून केलेले नाहीत तर उपक्रमाच्या नाविन्याबरोबरंच त्याची उपयुक्तताही लक्षात घेतली आहे. हे सर्व नवोपक्रम म्हणजे केवळ आकडेवारीचा मारा न होता प्रत्येक उपक्रम हा सहज, सुलभपणे आकलन होईल असे याचे स्वरूप ठेवले आहे. वाचणाऱ्या प्रत्येकास हे उपक्रम वाचावेत, कृतीत आणावेत अशी रचना करण्यात डॉ. वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकाचे संपादक महेंद्र गणपुले व डॉ. श्रुती पानसे आणि नवोपक्रमशील शिक्षक यशस्वी झाले आहेत. 

आजपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरने दरवर्षी शिक्षण विकास मंच, मुंबई यांच्यामार्फत होणाऱ्या ‘शिक्षण कट्टा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करून त्यांचे प्रकाशन केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपक्रम वेचक वेधक, कट्टा शिक्षणाचा, शिक्षणव्रती डॉ. कुमुद बन्सल, WhatsApp चर्चा - शिक्षण विकासाच्या, सेमी इंग्रजी का व कसे? ही काही निवडक पुस्तके सांगता येतील. गतवर्षी प्रसिद्ध केलेले ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे पुस्तक अल्पावधीत लोकप्रिय झाले असून चौथ्या आवृत्तीच्या मार्गावर आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकजण या नवलनगरीची सफर करेलच, पण सर्वसामान्य वाचक सुध्दा या नवलनगरीत रमतील असा विश्वास वाटतो.  

पुस्तकाचे नाव – नवोपक्रमांची नवलनगरी

प्रकाशक – सतीश पवार 

(डिजिटल वर्क्स एलएलपी, पुणे)

संपर्क - ७२१८७७७७२१ 

पृष्ठे - ११६ किंमत – ₹३५० /-   


- अजय महादेव काळे

(लेखक परिचय: जिल्हा परिषद शाळा, सिद्धेवाडी, ता. तासगाव जि. सांगली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून ‘QR code चा अध्ययन-अध्यापनात उपयोग’ या नवोपक्रमास NCERT, नवी दिल्लीने सन २०१९ चा ‘नॅशनल अवार्ड फॉर इनोव्हेशन – २०१९’ हा राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला आहे. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, साधना, लोकप्रभा, शिक्षणगाथा आदी मासिकांत त्यांचे जवळपास चाळीसच्यावर लेख प्रकाशित झाले आहेत.)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन प्रस्तावना : मूल्यांकनाच्या क्रांतीची हाक "मी आज काय शिकलो?...