शिकत राहण्याचे शिक्षण
निव्वळ माहिती संपादन करण्याऐवजी मुलांच्या क्षमता विकसनावर भर, स्वयं-अध्ययनावर भर, शिक्षकाची भूमिका ‘शिकवण्याची’ नसून मुख्यतः शिक्षण सोपे करण्याची असावी, यांसारखी नवीन शैक्षणिक धोरणात स्वीकारलेली तत्त्वे विचारी व्यक्तींना लगेच पटतील अशीच आहेत. पण ती हाताळायला सोपी मात्र नाहीत. यापुढे शिक्षक फक्त फॅसिलिटेटर (सुलभक) असतील, म्हणजे त्यांचे काम कमीच होईल, अशी एक गैरसमजूत अनेकांच्या मनात आहे. खरे तर प्रत्यक्षात यामुळे शिक्षकांचे काम, जबाबदारी आणि मुख्य म्हणजे त्यांच्याच स्वतःच्या क्षमता वरच्या दर्जाच्या असण्याची गरज खूप वाढणार आहे. शिक्षण जितके साचेबद्ध, माहितीवर आधारित असेल, तितके ते शिक्षक, परीक्षक, आणि एकूणच व्यवस्थेला हाताळणे सोपे असते. यापुढील काळात मात्र शिक्षणप्रक्रियेला आपण पारंपरिक शिक्षणापेक्षा निराळे, काहीसे गुंतागुंतीचे असले तरी अधिक संवेदनशील, लवचीक स्वरूप देऊ शकतो की नाही, ही बाब निर्णायक ठरणार आहे.
विद्यार्थी शाळेत गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, क्रीडा, व्यवसाय अशी कोणतीही गोष्ट शिकत असताना यापुढे त्यात एक समान धागा असणे अपेक्षित आहे, तो म्हणजे ‘शिकावे कसे’ हेही शिकणे. म्हणजे फक्त नव्या गोष्टी, नवी कौशल्ये आत्मसात करता येणे एव्हढेच नाही, तर आधी शिकलेल्या, माहीत असलेल्या बाबी नवीन संदर्भात पडताळून पाहता येणे, त्यातील कालबाह्य किंवा अनिष्ट वाटणाऱ्या गोष्टी सोडून देता येणे आणि आपले ज्ञान किंवा कौशल्य वेगळ्या, अपरिचित संदर्भातही उपयोगात आणता येणे. या प्रकारचे शिक्षण यापूर्वी शिक्षकांनी आणि पालकांनीही ते स्वतः शाळेत असताना घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा नवा दृष्टिकोन आणि त्यानुसार अध्ययन-अध्यापनात आवश्यक असलेले बदल पोचवणे फार महत्त्वाचे आहे.
शिकण्याची क्षमता विकसित करताना अभ्यासाची वेगवेगळी तंत्रे माहीत हवीत - संदर्भ पाहणे, जास्तीची माहिती घेणे, वाचलेल्या-ऐकलेल्या-पाहिलेल्या भागाच्या स्वतःच्या उपयोगासाठी नोट्स काढणे, त्यांत आकृत्या, तक्ते इत्यादींचा वापर करणे, वगैरे. शिक्षकांनी दिलेली प्रश्नोत्तरे सरावाने लक्षात ठेवण्यापेक्षा हा अभ्यास निराळा आहे, कारण यात विद्यार्थी स्वतः पुढाकार घेतो आहे. आपल्याला काय येते, काय अजून नीटसे येत नाही, याचा अंदाज घ्यायला, त्यावर काम करायला शिकतो आहे. अभ्यासविषयाचा विचार, त्यावर चिंतन करायला शिकतो आहे. आणि नेमकी हीच सवय त्याला नवीन विषयाला सामोरे जाताना उपयोगी पडणार आहे. यात वेळेचे नियोजन, कधी न रुचणाऱ्या बाबींचा चिकाटीने केलेला अभ्यास, सराव असा थोडा स्वयंशिस्तीचा भाग असेल, तर कधी आवडणाऱ्या बाबींचा वर्गाच्या पुष्कळ पुढे जाऊन केलेला अभ्यास असा आनंदाचा भागही असेल. स्वतःच्या आणि इतरांच्या मतांचे आधार तपासून त्याबद्दल विवेकाने भूमिका घेता येणे हासुद्धा स्वयं-शिक्षणाचाच भाग आहे.
या सर्व गोष्टी घडवून आणणे सोपे नाही. त्यासाठी शिक्षकांना आजवर फारशा न वापरलेल्या पद्धती वर्गात वापराव्या लागतील. ही तंत्रे आधी स्वतः आत्मसात करावी लागतील. विद्यार्थी नेमलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारतील, ते प्रामाणिकपणे हाताळण्याची तयारी ठेवावी लागेल. मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचा विकास काही त्यावर व्याख्यान देऊन होणार नाही. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने याच पद्धतीने अध्ययन करून घ्यावे लागेल. हा अनुभव वर्गातील फक्त निवडक मुलांनाच नाही, तर प्रत्येक मुलाला मिळतो आहे याची खात्री करून घ्यावी लागेल. वर्गातील चर्चा, प्रयोग, प्रकल्प इत्यादींत प्रत्येकाला भरपूर सहभागाची संधी तर हवीच, पण प्रत्येकाला चुका करण्याची, चुकांमधून शिकण्याची मोकळीक पण हवी. ‘मला प्रयत्नाने हे शिकता येईल’, अशी उमेद, आत्मविश्वास हा शिकण्याच्या क्षमतेचा पाया आहे. जो काही वेळ, जागा, साधनसुविधा हाताशी असतील, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून मुलांमध्ये ही प्रवृत्ती विकसित करणे, हे शिक्षकांपुढचे खरे आव्हान आहे.
पुढील आयुष्यात, नवनव्या उद्योगव्यवसायांत यशस्वी होण्यासाठी सातत्याने शिकत राहण्याची क्षमता मुलांना वैयक्तिक स्तरावर आवश्यक आहे, तशीच ती एक समाज म्हणूनही आपली गरज आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे लोप पावणारे आणि नव्याने तयार होणारे उद्योगव्यवसाय, त्यातून निर्माण होणारी आव्हाने हे संपूर्ण समाजापुढचे प्रश्न आहेत. त्यासाठी उद्याच्या नागरिकांना आत्तापासूनच सक्षम बनवायला हवे.
- धनवंती हर्डीकर
(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २१ ऑगस्ट २०२४)