फक्त भार, की वर्षभराचा साथीदार?
मुलांच्या दप्तराचे ओझे हा एक सतत चर्चेत असणारा विषय आहे. ते साहजिकच आहे. कोवळ्या वयातील मुलांना पेलवणार नाही असे वजन त्यांनी रोज वाहून नेणे कोणाला आवडेल? प्रा. यश पाल समितीच्या ‘लर्निंग विदाऊट बर्डन’ (ओझ्याविना शिक्षण) या 1993 साली प्रकाशित झालेल्या अहवालानंतर हा विषय देशभर खूप गाजला आणि अजूनही कालबाह्य झालेला नाही. पण या समस्येच्या मुळाशी आपण आज तरी खरेच पोचलो आहोत का? या अहवालात वर्गातील हवा, उजेड, विद्यार्थिसंख्या, ग्रंथालये आणि प्रयोगशाळांचा अभाव इथपासून ते परीक्षाकेंद्री अध्यापन, अभ्यासक्रम रचना, शिक्षक प्रशिक्षण अशा शिक्षणाच्या सगळ्याच पैलूंचा विचार करण्यात आला होता. पण त्या सर्व घटकांपेक्षा अधिक प्रकाशझोतात आला तो ‘पाठ्यपुस्तके’ हा सर्वांना सहज दिसणारा, हाताशी असणारा घटक. दप्तराच्या प्रत्यक्ष वजनापेक्षा शिकवलेले ‘कळत नाही’ हे मुलांच्या मनावरचे ओझे कितीतरी जास्त नुकसानकारक, ‘क्रूर’ आहे हे स्वतः प्रा. यश पाल यांनी नमूद केले आहे. तरी ओझ्याची चर्चा मात्र अजूनही पाठ्यपुस्तकांच्या वजनाभोवतीच फिरताना दिसते. सध्या महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांचे जे चार-चार तुकडे करून जोडले आहेत, त्यासाठी देखील दप्तराचे ओझे हे एक मुख्य कारण देण्यात आले आहे.
हे खरे आहे की यश पाल समितीच्या अहवालात मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा स्पष्ट उल्लेख होता आणि त्या अनुषंगाने पुस्तके शाळेतच ठेवावी, लागतील तशी आलटून पालटून घरी द्यावी अशी शिफारसही होती. नंतरच्या तीसेक वर्षांत दप्तराचे वजन या विषयावर आणखीही भरपूर चर्चा, सर्वेक्षणे, इतकेच काय याचिकादेखील झाल्या. निर्धारित पाठ्यपुस्तकांचा आकार कमी करावा, पाने कमी करावी, धडे कमी करावे, अभ्यासक्रम कमी करावा, अशा मागण्यांचा जोर वाढला. त्या तुलनेत, तेव्हढाच आकार, वजन असलेली खासगी गाईड्स, वर्कबुक्स - नेमलेली नसली तरी - मुले रोज दप्तरातून नेतात, त्यांवर कोणतेच नियंत्रण, बंदी नाही, याकडे मात्र कोणी फारसे लक्ष दिले नाही. आता तर पैसे भरल्यास कोणतेही गुणवत्ता परीक्षण न होता अशा खासगी प्रकाशनांना सरळ परवानाच दिला जातो. इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये त्या त्या संस्थेच्या मर्जीनुसार पाठ्यपुस्तकांचे निर्धारित आणि खासगी असे दोन संच वापरले जातात. वह्यांची संख्याही भरपूर असते. पण ‘ओझ्याचा’ प्रश्न आला की मात्र शासनाने नेमलेल्या पाठ्यपुस्तकांकडेच सगळा रोख वळतो!
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, रोज सर्व विषयांची वह्यापुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक आखणे, काही वह्या किंवा पुस्तकेही शाळेत ठेवायची सोय करणे असे सोपे आणि चांगले उपाय काही शाळा करतात. पण मुळात गरज आहे, ती पाठ्यपुस्तके म्हणजे ‘ओझे’ हा दृष्टिकोन बदलण्याची. खरे तर आपल्यासारख्या विकासाच्या वाटेवर असलेल्या देशात पाठ्यपुस्तक हे मुले, शिक्षक आणि पालकांच्या हातातील एक खात्रीशीर शैक्षणिक साधन आहे. मुलांच्या वयोगटाला अनुरूप असा त्या त्या विषयातील प्रमाणित आशय आणि संपूर्ण वर्षांचा कार्यक्रम सर्व संबंधितांपर्यंत नेमकेपणाने पोचवण्याचे काम पाठ्यपुस्तक करत असते. शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या कितीतरी मुलांसाठी तर त्या त्या विषयाशी दुवा जोडणारे त्यांच्या हक्काचे, त्यांचे स्वतःचे असे ते एकमेव साधन असते. भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषयाची वेगळी गरज लक्षात घेऊन केलेली पाठांची किंवा पाठयघटकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, आकर्षक चित्रे, आकृत्या, तक्ते, उपक्रम यांतून मुलांना अभ्यासाच्या विषयांचे अंतरंग उलगडत जाते. सत्र परीक्षा संपल्या, तरी पाठ्यपुस्तक वर्षभर मुलांच्या हाताशी राहते, कायमस्वरूपी अध्ययनात त्यांना मदत करते.
पाठ्यपुस्तकांत त्रुटी असतील, मुलांच्या अभ्यासात अडथळेच येतील, अशा बाबी असतील, तर त्यावर नक्कीच टीका, चर्चा घडवल्या पाहिजेत. बोजड क्लिष्ट भाषा, पाठ्यघटकांची विस्कळित, सहज सुसंगत क्रम नसलेली मांडणी, लेखनातील विसंगती, मुलांना आपलीशी वाटणार नाहीत अशी चित्रे आणि उदाहरणे, अशा बाबी मुले आणि शिक्षक दोघांच्याही कामाचा भार वाढवतात. मुलांना शिकताना येणारे दडपण खरोखर दूर करायचे असेल, तर पाठ्यपुस्तकांवर नुसतीच कात्री चालवण्यापेक्षा अशा बाबी दूर करण्यासाठी काम केले पाहिजे.
- धनवंती हर्डीकर
(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ०७ ऑगस्ट २०२४)
No comments:
Post a Comment