आदर्शांकडील वाटचालीची दिशा
भारत जागतिक ज्ञानसत्ता बनावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे कस्तुरीरंगन समितीने शिक्षणव्यवस्थेला दिलेले एक सुंदर स्वप्न आहे. परंतु चार वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात या धोरणाच्या अंमलबजावणीची गती खूपच मंद आहे. धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या संस्थांच्या आणि अधिकाऱ्यांच्या क्षमतांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहता एकूण चित्र खूपच निराशाजनक आहे.
स्वायत्त शिक्षण संस्थांमुळे तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कल्पनांचा शिक्षणक्षेत्राच्या विकासासाठी लाभ करून घेता येतो. या संस्थांच्या कार्यपद्धतींत सातत्य आणि शिस्त ठेवता येत असल्यामुळे लहरी निर्णयांवर अंकुश ठेवण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हीच स्वायत्तता व्यक्तिगत पातळीवरसुद्धा जपण्याची गरज असते. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक आणि धोरणविषयक बाबींवर सल्ला द्यायचा असतो; सनदी अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ या पातळ्यांवरील बाबी, शासन निर्णय आणि अधिनियम यांच्या अंमलबजावणीशी सबंधित बाबी सांभाळायच्या असतात, तर मंत्र्यांनी लोकभावना, आपल्या राजकीय पक्षाचा निवडणूक जाहीरनामा आणि धोरणे विचारात घेऊन संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घ्यायचे असतात. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात या सुव्यवस्थेची जागा अव्यवस्था घेत असल्याचे दिसते. १७ ऑक्टोबर २०१६च्या एका शासन निर्णयाने एसएससी बोर्डाची अभ्यासक्रम, पाठयपुस्तके, शिक्षक प्रशिक्षण ही शैक्षणिक कामे एससीईआरटीकडे वर्ग केली. बोर्डाच्या कायद्यात कोणताही बदल न करता घेतलेला हा निर्णय मनमानीपणाचा कळसच म्हणावा लागेल. ‘तुकड्यांत विभागलेली आणि मध्येमध्ये कोरी पाने घातलेली पाठ्यपुस्तके’ या माजी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अशैक्षणिक कल्पनेने पाठ्यपुस्तकांचे पुस्तकपणच हिरावून घेतले आहे. पाठ्यपुस्तके तुकड्यांत विभागलेली, तर अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन या बाबी मात्र विषयवार, यामुळे शिक्षकांना शिकवताना आणि विद्यार्थ्यांना शिकताना अनेक अडचणी येत आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद एससीईआरटीचे संचालक किंवा एखाद्या नामांकित तज्ज्ञाकडे सोपवण्याऐवजी माजी शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्वत:कडे घेतले. राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार झाल्यानंतर जो गोंधळ झाला त्याला एससीईआरटीच्या अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आणि दुर्लक्ष जेवढे कारणीभूत होते, तेवढाच समितीचे अध्यक्ष या नात्याने माजी शिक्षणमंत्र्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावसुद्धा कारणीभूत होता. मंत्र्यांकडून आलेल्या सूचना योग्य वाटल्या नाहीत तर आपली वेगळी मते मांडण्याचे धाडस आणि स्वातंत्र्य राज्यस्तरीय संस्था आणि अधिकारी यांच्याकडे असले पाहिजे आणि ती स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा मंत्र्यांकडे असायला पाहिजे.
शालेय शिक्षण विभागाच्या सर्व संस्थांत आणि कार्यालयांत अधिकाऱ्यांच्या निम्म्यापेक्षाही जास्त जागा रिकाम्या आहेत. मात्र त्याचवेळी गेल्या काही वर्षांत शालेय शिक्षण विभागातील आयएएस अधिकाऱ्यांची संख्या एकवरून चारावर पोचली आहे आणि त्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत. याशिवाय शिक्षणेतर संवर्गांतील काही अधिकाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. थोडक्यात, धोरणात्मक विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जी फळी असते, त्यांच्या शैक्षणिक अनुभवाला महत्त्व राहिले नाही. शासनाला धोरणविषयक सल्ला देणे ही शिक्षण विभागाच्या संचालकांची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी असते. पण सध्यातरी ते शासनाकडून येणाऱ्या सूचनांची यांत्रिक पद्धतीने अंमलबजावणी करण्यापलीकडे फारसे काही करताना दिसत नाहीत. शाळांच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करणारे अनावश्यक आदेश शिक्षणक्षेत्रात आता नेहमीचेच झाले आहेत. शाळांकडून वारंवार माहिती गोळा केली जाते, पण तिचा पुरेपूर उपयोग कसा केला जातो याची माहिती ना शिक्षकांना असते, ना अधिकाऱ्यांना. अशा हेतुशून्य कार्यपद्धतीमुळे निष्पन्न होतो तो केवळ मनुष्यबळ, वेळ, आणि पैसा यांचा अपव्यय. हे घडता कामा नये. यासाठी सर्वंकष आढावा घेण्याची गरज आहे.
गोगलगाईच्या गतीने होणाऱ्या या दिशाहीन प्रवासाला वेग आणि दिशा देण्याचे मोठेच आव्हान नवीन शिक्षणमंत्र्यांपुढे असणार आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गरज आहे ती तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्था यांची स्वायत्तता, त्यांच्यातील उत्कृष्ट समन्वय आणि संवेदनशीलता यांची. असे घडले तरच निकोप वातावरण निर्माण होऊन शिक्षणक्षेत्राची गुणवत्तेकडे वेगाने वाटचाल होऊ शकेल.
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २५ डिसेंबर २०२४)