Saturday, 30 November 2024

भारतकेंद्री शिक्षणासाठी काय हवे?

भारतकेंद्री शिक्षणासाठी काय हवे?

भारतातील मुलांना द्यावयाचे शिक्षण भारतकेंद्री हवे याबद्दल दुमत असायचे कारण नाही. तरीही ‘भारतकेंद्री’ या शब्दाभोवती चर्चा, वादविवाद, अस्मिता, अभिनिवेश, शंका, काळजी अशा अनेक गोष्टींचे वलय आहे. याचे कारण ‘भारतकेंद्री’ या शब्दाचे लावले जाणारे वेगवेगळे अर्थ. आजची शालेय शिक्षणाची व्यवस्था ब्रिटिश काळात जन्माला आली आणि रूजली. ती ब्रिटिश राज्यकर्त्यांना धार्जिणी होती, त्यामुळे औपचारिक शालेय शिक्षणातून भारतीय ज्ञानपरंपरा पुसल्या गेल्या आणि त्यांची जागा पाश्चात्त्य ज्ञानशाखांनी आपल्या संपूर्ण पाश्चात्त्य संदर्भासह घेतली. भारताला तत्त्वज्ञान, गणित, स्थापत्य, रसायनशास्त्र, धातुशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, अर्थशास्त्र, नौकाबांधणी आणि नौकानयन, खगोलविज्ञान, भाषाविज्ञान अशा कितीतरी ज्ञानशाखांमध्ये अतिशय समृद्ध वारसा आहे. पण या सर्व ज्ञानपरंपरांचा परिचय निदान महाराष्ट्रातील मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमातून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या प्राचीन ठेव्याबद्दल दोन टोकाच्या भूमिका दिसतात. एक ‘आमच्याकडे सर्व होते,’ असा दुरभिमान किंवा मग दुर्लक्ष, उपहासाची भावना. त्यात धार्मिक, सामाजिक पैलू मिसळले की या ज्ञानपरंपरांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आणखीच अवघड होते. या परिस्थितीत शाळेच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांत हा भाग शक्य तितक्या कमी शब्दांत आणि संदिग्ध स्वरूपातच आला, तर नवल नाही. अभ्यासक्रमात हे विषय योग्य पद्धतीने आणायचे असतील, तर आधी त्यांची चिकित्सक, विवेकी, साधकबाधक चर्चा घडणे, त्यांना समाजमान्यता मिळणे फार महत्त्वाचे आहे. ‘भारतकेंद्री’ शिक्षण देण्यासाठी, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील भारतीय परंपरा, त्यांच्यावरचे प्राचीन आणि मध्ययुगीन प्रभाव आणि आज भारतात शिकवले जाणारे पाश्चात्त्य विज्ञान या सगळ्याचा एकत्र, सलग विचार करून भारतातील ज्ञानशाखांच्या जडणघडणीची, त्यातील चढउतारांसह वस्तुनिष्ठपणे मांडणी करावी लागेल. मात्र हे काम त्या त्या विषयांतील अभ्यासकांचे, तज्ज्ञांचे आहे. त्यांच्या अभ्यासातून तयार झालेल्या अधिकृत संदर्भांवरून मुलांसाठी पाठ्यपुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य तयार करणे ही नंतरची पायरी आहे.  

‘भारतकेंद्री’ शिक्षणात उलटा प्रवास करून आधुनिक शिक्षणाची जागा पुन्हा जुन्या ज्ञानपरांपरांना द्यायची असा अर्थ काढणे मात्र नक्कीच अपेक्षित नाही, आणि हिताचेही नाही. आधुनिक शिक्षणपद्धतीमुळेच सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळाला, आणि जगातील अद्ययावत ज्ञानाशी आपला देश जोडला गेला, कोणत्याही जागतिक स्पर्धेत उतरण्याइतका सक्षम झाला, हे कधीही विसरता येणार नाही. ‘भारतकेंद्री’ या शब्दातील भारत हा आजचा, वर्तमान भारत देश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तो केंद्रस्थानी आहे याचा अर्थ त्याची स्वतःची ओळख ही प्राथमिकता असली, तरी तो भोवतालच्या विश्वाचा भाग आहे, हे भानही महत्त्वाचे आहे.  

- आज आपल्या देशात वेगवेगळ्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या, तसेच शिक्षणाच्या अभावी चांगल्या जीवनापासून दूर राहिलेल्या मुलांच्या गरजांचा सविस्तर अभ्यास करून, त्या गरजा केंद्रस्थानी ठेवून वेळोवेळी योग्य त्या तरतुदी आणि बदल करणे, हे ‘भारतकेंद्री’ शिक्षणच आहे. 

- एक प्रगत देश म्हणून जगात स्थान मिळवण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रांची पायाभरणी शालेय शिक्षणात कशा प्रकारे करावी लागेल हा विचारही ‘भारतकेंद्री’च आहे. 

- भारतीय मुले पुढे उद्योगव्यवसायासाठी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात गेली, तरी ती स्वतःची आणि देशाची प्रतिमा उज्ज्वल ठेवतील अशा सवयी आणि वृत्ती शाळेपासून जोपासणे ही दक्षता ‘भारतकेंद्रीच’ आहे.

- आज वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न, अडचणी, गरजांचा अभ्यास करून त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करून देण्याचे प्रयत्नही ‘भारतकेंद्री’च ठरतील. 

- आजच्या डिजिटल युगात भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा होणारा यशस्वी वापर आणि भारतीयांच्या त्यातील कामगिरीची अद्ययावत माहिती शाळेपासूनच मुलांपर्यंत पोचवून त्यांना प्रेरित करणे, हेदेखील ‘भारतकेंद्री’ शिक्षणच आहे. अंतराळ विज्ञान, जैवतंत्रज्ञान, अशा अनेक विषयांबद्दलही हेच म्हणता येईल. 

- भारताच्या कानाकोपऱ्यातील नृत्य, नाट्य, चित्र, हस्तकला, वस्त्रनिर्मिती, भरतकाम, अशा अनेक अभिजात ते आदिवासी समृद्ध परंपरांचे शिक्षण घेण्याची उत्तम सोय शाळेपासूनच करणे हादेखील ‘भारतकेंद्री’ शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. नंतर मुलांनी त्याचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी केला किंवा व्यवसायासाठी केला, तरी त्यातून भारतीयत्वाच्या जाणिवा बहरतील, हे नक्की.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २३ ऑक्टोबर २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...