तरुणाई आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी भाषा
भाषा केवळ गुणांसाठी शिकायची नसते. एक अनिवार्य अथवा ऐच्छिक विषय म्हणून किंवा एक माध्यम म्हणून तर नाहीच. मग भाषा आपण कशासाठी शिकतो? भाषेतूनच तर आपलं व्यक्तिमत्त्व घडतं. भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर म्हणत ‘भाषाच आपल्याला विचारांची शिस्त शिकवत राहते.’ तर भाषेमुळेच आपल्या आकलनाची, विचार करण्याची, मनातल्या विविध भावना समर्थपणाने कागदावर मांडताना भाषेवरची पकड आवश्यक असते. भाषेतील मूलभूत, पायाभूत गोष्टींकडे मात्र तरुणाई कमालीचे दुर्लक्ष करते आहे. परिणामकारक संवादासाठी आणि सर्जनशील, वैशिष्ट्यपूर्ण लिखाणासाठी भाषेचे अध्ययन अधिक उपयुक्त आणि गरजेचे आहे. प्रवेशासाठी लिहिलेल्या साध्या अर्जातून आपले भाषा कौशल्य आणि क्षमतांची पारख होते. ज्यांच्याकडे उत्तम भाषिक कौशल्ये असतात ना त्यांचा साधा प्रवेश अर्ज, त्यांची उत्तर पत्रिका, त्यांचं साधं लेखनही वाचनीय होतं. खरं म्हणजे आपण सर्व जण जन्मापासूनच भाषा शिकण्याची, बोलण्याची, लिहिण्याची अंत: प्रेरणा घेऊन येतो.
मनातील विविध छटा कागदांवर उतरवण्यासाठी गरजेची असते ती भाषाच! महाविद्यालयीन तरुण म्हणून आपण मराठी बोलण्यासाठी संकोच करतो, इंग्रजी बोलण्यासाठी न्यूनगंड बाळगतो, हिंदी सरमिसळ करत बोलतो आणि संस्कृतपासून दूर राहतो. धरसोडवृत्तीमुळे कोणत्याही एका भाषेवर आपली पकड राहत नाही. म्हणूनच भाषा अभ्यासाची खरीखुरी सुरुवात उजळणीतल्या मूळाक्षरांपासूनच करायला हवी. आपण सर्वजण वेगवेगळ्या भाषांमधून शिकतो; मात्र भाषा शिकण्यासाठी खरोखर, मनापासून आसूसलेलो असतो का आपण? डॉ. केळकर म्हणत, 'बारावीनंतर कोणत्याच विद्यार्थ्याला भाषा शिकवण्याची गरज पडू नये'. भाषेतून शिकावे; पण तसं होत नाही आपल्याकडे. भाषा शिकण्यासाठी तरुणाईकडे अधिक गांभीर्य असण्याची गरज आहे. रविवारच्या साहित्यिक पुरवण्यांमधून आलेले लेख तर आवर्जून वाचले पाहिजेत. अशा भाषाविषयक उणिवा दूर करण्यासाठी अनेक भाषाविषयक उपक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंतर्भूत आहेत. मातृभाषेतून शिकण्यासाठी हे धोरण अधिक प्रोत्साहित करते.
तरुणाईवर समाज माध्यमांच्या भाषांचा अधिक पगडा असल्याचे जाणवते. व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यांतल्या भाषा मनोरंजन करू शकतील, पण भाषिक कौशल्ये, प्रभुत्व कितपत रुजवू शकतील, याबद्दल शंका आहे. या माध्यमांनी काही छोटे-मोठे लघु अभ्यासक्रमाही कोरोना काळात सुरू केले, त्यावेळी देखील अशा विविध भाषांकडे आकृष्ट झाले. स्वप्नजा वालवडकर ही विद्यार्थिनी सांगते की तिला संस्कृतमधून यूपीएससी करायचे आहे. मुलं आता पारंपरिक साच्यांमध्ये अडकत नाही तर स्वतःची स्वतंत्र पायवाट निर्माण करण्यासाठी धडपड करतात हेही खरंय.
कानात हेडफोन, डोळ्यांपुढे सतत स्क्रीन, आपण समाज माध्यमांवर आपली चुणूक दाखवली नाही तर आपण स्पर्धेच्या जगात मागे पडतो की काय असा भ्रम आणि भास तरुणाईला होत राहतो, असं व्हायला नको; पण होतंय खरं! आपलं काही चुकतंय हेच लक्षात येत नाही.. तरुणांच्या. उत्कर्षाच्या काळातला बराचसा वेळ यात घालवतात. समाज माध्यमं गरजेपुरती वापरली तर ठीकच. पण फावला वेळ घालवताना त्याचं रूपांतर व्यसनात होत चाललंय.
परिणामकारक अभिवाचन करणारी यशश्री मुळे लिहिते अभिवाचनासाठी भाषेतील चढउतारांबरोबरच वाचन कौशल्यदेखील अवगत असावं लागतं. प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत तोंडी परीक्षेचे चार निकष असतात: वाचन, लेखन, संभाषण आणि भाषण.... ही कौशल्ये स्थूल मानाने प्राथमिक जरी वाटत असली तरी यात पारंगत होण्यासाठी अभ्यासच लागतो. अनेकदा असं होतं की विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिकतानादेखील अचूक असं वाचन कौशल्य रुजलेलं नसतं, गंमत म्हणजे मराठीमध्ये उत्तम गुण मिळवलेले असतात. मात्र भाषिक कौशल्यांबाबत कमालीची उदासीनता! हीच गोष्ट लेखन कौशल्यांच्या बाबतीत.. लेखन कौशल्यांमध्ये गती मिळवण्यासाठी गरज असते ती अचूक विराम चिन्ह वापरण्याची, प्रमाण लेखन नियमांच्या ओळखीची, अचूक हस्तक्षराची, परिणामकारक लेखनाची. विद्यार्थ्यांनी ही सुरुवात अगदी आपल्या आवेदन पत्रापासून, प्रवेशासाठीच्या अर्जापासून करायला हवी.
विद्यार्थी बरेचदा अनौपचारिक संवाद सादर करतात, पण औपचारिक संवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांच्याकडे कमी असतात, याचे एकमेव कारण म्हणजे सरावाचा अभाव. लिखाणाचा कंटाळा, म्हणून भाषेतून विविध विषय शिकण्यासाठी प्राथमिक अभ्यास असणे गरजेचे आहे. अनेकदा असं होतं की शालेय स्तरावर पत्र लेखन झालेलं असतं. वाक्यांचे प्रकार शिकवलेले असतात. विरामचिन्हांची ओळख झालेली असते, या चारही कौशल्यांची ओळख झालेली असते; परंतु लेखन उत्तम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे ... प्रत्येक विद्यार्थी त्याची स्वतःची एक बोली घेऊन आलेला असतो, हे काही गैर नाही; पण ही बोली मर्यादित परिसरात वापरली जाते, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक सभांमधून बोलण्यासाठीची कौशल्ये प्राप्त करावी लागतात. डॉ.मिलिंद जोशींनी लिहिलेलं ‘कथा वक्तृत्वाची ‘हे अलीकडे आलेलं पुस्तक आवर्जून वाचायला हवं. प्राचार्य हे पुस्तकही जरूर पहावं. प्रबोधनकारांचं वक्तृत्व शास्त्रावरचं पुस्तक तर अतिशय मार्गदर्शक! अभिव्यक्ती कौशल्य अतिशय सैल रीतीने वापरल्या जाणाऱ्या आजच्या काळात अभिरुचीसंपन्न, शैलीदार, नीटनेटक्या आणि पद्धतशीर वक्तृत्वाची निकड अधिक जाणवते आहे. यासाठी महाविद्यालयांमधून होणाऱ्या वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, कविता वाचन, परिसंवाद, साहित्यविषयक संमेलनं व इतर उपक्रम हे पूरक उपक्रम आपल्या कौशल्यांना अधिक परिणत करत राहतात. आपल्या ग्रंथालयांतील मराठीची नियतकालिके, दिवाळी अंक, विशेष अंक, साहित्यिक पुरवण्या, आवर्जून चाळायला हवीत.
खरं म्हणजे अलीकडे युट्युबवर अनेक चांगल्या वक्त्यांची भाषण आहेत. ती नियमितपणे विद्यार्थ्यांनी ऐकायला हवीत. मला आठवतं आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या कॅसेट घेऊन त्या टेप रेकॉर्डमध्ये ऐकलेल्या आहेत. त्या तुलनेने आता विद्यार्थ्यांना त्यांची अनेक भाषणे युट्यूबवर सहज उपलब्ध आहेत.
भाषा कुठलीही असो भाषाभ्यास हा गरजेचाच असतो. मराठी ही इतर भाषांच्या तुलनेत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे ( उदाहरणार्थ, 'कर' या शब्दाचे एकापेक्षा अनेक अर्थ.) असे मला वाटते. कारण एखादे वाक्य लिहिण्यात वा बोलण्यात एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी पूर्ण वाक्याचा अर्थच बदलतो. स्पर्धा परीक्षा यूपीएससीचा अभ्यास करणारी अकरावीची स्वराली जोशी लिहिते,भाषाभ्यासामुळे माणसाच्या भाषाज्ञानात भर पडते. भाषा अधिक प्रगल्भ होते. आपले भाषाज्ञान किती आहे हे आपल्याला समजावे असे वाटत असेल तर शब्दकोडे सोडवताना आपले भाषा ज्ञान उघडे पडते'. कोणतीही शाखा अभ्यासा, शास्त्रांचा अभ्यास करा; मात्र भाषेवरच्या प्रभुत्वासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. एवढं नक्की!
डॉ. नागेश अंकुश,(भाषाअभ्यासक)
Nageshankush12@gmail.com
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय ,औरंगाबाद.
.jpg)
