मूल्यशिक्षणाचे मृगजळ
शाळेत आणि घरीदेखील मुले फक्त नेमून दिलेले पाठ्यघटक शिकत असतात असे नाही. स्वतःच्या निरीक्षणातून आणि अनुभवातून ती इतरही पुष्कळ गोष्टी शिकत असतात. याविषयी एक गंमतीदार उदाहरण नेहमी दिले जाते. लहान मूल बोलायला शिकते, तेव्हा कोणी त्याला भाषेचे नियम ऐकवत नाही, ‘खरे सांग, खोटे बोलू नको,’ असे वर्तनाचे नियम मात्र सतत ऐकवतात. प्रत्यक्षात घडते असे, की मुले भाषेचे नियम आत्मसात करतात, पण खरे बोलतातच असे नाही! त्याबाबत त्यांचा स्वतःचा अनुभव, निरीक्षण वेगळे असते.
शाळेत गेल्यावर मुलांचे ‘मूल्यशिक्षण’ घडावे, यासाठीचे प्रयत्न मुख्यतः भाषा आणि सामाजिक शास्त्रांच्या माध्यमांतून केले जातात. प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या सुरवातीला ‘प्रतिज्ञा’, संविधानाची ‘उद्देशिका’ यांचा समावेश केला जातो. यापूर्वीच्या अभ्यासक्रमांत ‘गाभा घटकांवर’ आणि ‘जीवन कौशल्यांवर’ दिला जाणारा भर हे मूल्यशिक्षणासाठीचेच प्रयत्न होते. तरी अजूनही मूल्यशिक्षणाच्या बाबतीत बराच पल्ला बाकी आहे.
लहान वयात मुलांना चांगल्या वर्तनाचे साधेसोपे नियम सांगून, ते न ऐकल्यास समज देऊन, थोडीफार शिक्षा करून त्या नियमांचे वळण लावणे निदान शाळेच्या आवारात, काही प्रमाणात तरी साध्य होऊ शकते. उदाहरणार्थ, कचरा इकडेतिकडे फेकू नये; पाण्याची, अन्नाची नासाडी करू नये; शाळेच्या फर्निचरचे, बागेचे नुकसान करू नये; इतर मुलांना त्रास देऊ नये; इत्यादी. पण आठवी-नववीपासून पुढे मुलांमधे रुजवण्याच्या मूल्यांचे स्वरूप अधिक अमूर्त, गुंतागुंतीचे होऊ लागते. घरातून, परिसरातून मुलांची स्वतःची एक मूल्यव्यवस्था आधीच त्यांच्या मनात आकार घेत असते. वयाच्या या टप्प्यावर आता ‘असे का करायचे किंवा करायचे नाही’ याची उत्तरे मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटू लागते. एकाच वेळी बंडखोरी आणि मनातल्या आदर्शांची पूजा अशा म्हटले तर परस्परविरोधी बाबींचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि वर्तनावरही वाढू लागतो. स्वतःचे विचार आणि वागणे तपासण्यासाठी, आवश्यक तर बदलण्यासाठी इष्ट त्या मूल्यांची चौकट किंवा तत्त्वांचा आधार मुलांना याच वेळी मिळणे महत्त्वाचे असते. तसे घडते का?
मूल्यांची चर्चा, चिकित्सा हा भाग परंपरेने मुख्यतः सामाजिक शास्त्रे, भाषा या विषयांच्या अंतर्गत हाताळला जातो. पण माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर आज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आधी विज्ञान, मग वाणिज्य, मग त्यानंतर भाषा आणि सामाजिक शास्त्रे अशी विषयांची उतरती भाजणी लागते. विज्ञान-गणितातील सिद्धांत, प्रात्यक्षिके, स्वाध्याय यांना जास्तीत जास्त वेळ आणि महत्त्व मिळू लागते. सामाजिक शास्त्रे, भाषा या विषयांतील तात्त्विक बैठक मुलांपर्यंत व्यवस्थित पोचावी, यासाठी कोणी क्लास लावल्याचे ऐकिवात नाही. मुलांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची, चर्चेची कितीही गरज असली, तरी आज तो शाळेच्या अभ्यासाचा गांभीर्याने घ्यायचा भाग असल्याचे दिसत नाही.
नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हणूनच या संदर्भाने काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्या म्हणजे, आपल्यापुढील प्रश्न सोडवताना मुलांना इष्ट त्या मूल्यांची एक तार्किक बैठक मिळावी, यासाठी इयत्ता नववीमधे ‘मॉरल अँड एथिकल रीझनिंग – नीतिविषयक कारणमीमांसा, तर्कशास्त्र’ असा एक स्वतंत्र विषय सुरू करावा. त्यामधे वैयक्तिक चारित्र्य (सचोटी इत्यादी मूल्ये), समता इत्यादी लोकशाही व्यवस्थेतील मूल्ये आणि चिकित्सक, तर्काधिष्ठित विचार इत्यादी ज्ञानविषयक मूल्ये अशा विविध पैलूंचा समावेश असावा. शाळेत शिकवली जाणारी मूल्ये आणि घर-परिसरातील मूल्ये यांत तफावत असू शकते. अशा वेळी या विषयाच्या माध्यमातून त्या तफावतीकडे अधिक लक्ष द्यावे. शांततेने, सर्वांचा आदर राखून चर्चा करायला, आपल्या मतांना विरोध झाला, तरी धीर न सोडता अभ्यासपूर्वक आपली बाजू मांडायला मुलांना शिकवावे. या विषयात मुलांचे मूल्यमापन होणेही अपेक्षित आहे, पण ते धडे आणि प्रश्नोत्तरे स्वरूपात नाही, तर मुलांच्या वागण्याबोलण्याची सकारात्मक दृष्टीने नोंद घेऊन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या मूल्यांचे कोरडे शिक्षण देणे अपेक्षित नाही. शिक्षकांच्या, शाळेच्या, शिक्षणव्यवस्थेच्या सर्व व्यवहारांत मुलांना सातत्याने या नैतिक मूल्यांचा अनुभव मिळणे अपेक्षित आहे. ग्यानबाची खरी मेख तिथेच आहे. अभ्यासक्रम कितीही उत्तम आखला, तरी मुले आपल्याकडून कोणती मूल्ये शिकतात, ते शेवटी आपल्यावरच अवलंबून आहे.
- धनवंती हर्डीकर
( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ९ ऑक्टोबर २०२४)
No comments:
Post a Comment