शिक्षक - सर्जनाचा धागा
संस्कृतच्या वर्गामध्ये शिक्षिका मुलांना उपपद तत्पुरुष समास समजावून सांगत होत्या, जसे गायक - गायन करीसी, नर्तक- नृत्य करीसी, वादक - वादन करीसी मग शिक्षक म्हणजे काय? त्यावर एका विद्यार्थिनीने उत्तर दिले, शिक्षक- शिक्षा करीसी, उत्तर ऐकून हसावे की रडावे अशी अवस्था झाली. शिक्षक म्हणजे जो माहिती देतो, विद्यार्थ्यांना जे माहिती नाही ते त्यांना सांगतो, थोडक्यात माहितीचा स्रोत उपलब्ध करून देणारा तो शिक्षक. आपण जरी शिक्षक, आचार्य, गुरु हे शब्द एकाच अर्थाने वापरत असलो, तरी त्या प्रत्येकाचा अर्थ हा वेगवेगळा आहे.
शिक्षकांच्या पुढचा टप्पा आहे, ‘गातुवित’ म्हणजे जाणणारा, एखाद्या संभाव्य किंवा ठराविक ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग ज्याला कळतो, तो गातुवित. त्यानंतरचा पुढील टप्पा येतो, तो म्हणजे ‘मार्गदर्शक’ आपल्यासमोर हजारो विद्यार्थी येतात. प्रत्येक जण वेगळा असतो त्यातील योग्य क्षमता, कलागुण ओळखून त्यांना वेगवेगळ्या वाटा सांगणारा तो मार्गदर्शक. उदाहरणच द्यायचे झाले तर बालगंधर्वांचे घेवू - भास्करबुवा बखले हे बालगंधर्व ( नारायण श्रीपाद राजहंस ) व मास्टर कृष्णराव यांचे गुरु होत. एकदा भास्कर बुवांनी कृष्णरावांना गायनातील एक चीज शिकविली, आणि ते जाण्यास निघाले, तेवढ्यात तिथे बालगंधर्व आले, त्यांनी आपल्या गुरूंना प्रणाम केला, त्यांची विचारपूस केली, आणि त्यांचे मित्र मास्टर कृष्णरावांकडे गेले. कृष्णराव व नारायण यांचे मध्ये संवाद झाला, तुला काय शिकविले? वगैरे,वगैरे आणि बालगंधर्व कृष्णरावांना शिकवलेले गीत गायला लागले, ते ऐकून भास्कर बुवा लगेचच वर आले, आणि म्हणाले, “नारायण ही चीज तुझ्यासाठी नाही तुझ्या गळ्यात नाट्यसंगीत आणि कृष्णाच्या गळ्यात शास्त्रीय संगीत शोभून दिसते”, ज्याला जो दागिना चांगला दिसतो त्याने तोच परिधान करावा.गुरु एकच पण वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या वाटा दाखवितो म्हणजेच आजच्या भाषेत मार्गदर्शन करतो.
त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ‘आचार्य’- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जो बोलतो, त्याचप्रमाणे आचरण करतो, तो आचार्य होय. आणि शेवटचा टप्पा म्हणजे ‘गुरू’ जो आपल्या शिष्याला जाणीव करून देतो, याच्याही पलीकडे अजून काहीतरी आहे, नेणिवा समृद्ध करतो तो गुरु होय. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्या हाताला धरून गुरूकडे घेऊन जातो तो ‘सद्गुरु’ होय.
आजच्या प्रत्येक शिक्षकाने, वरील टप्प्यांचे चिंतन करून, आपण नेमके कोणत्या टप्प्यावर आहोत, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. जुन्या मळलेल्या वाटा सोडून नवीन शिखरे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणामागे विज्ञान असते आणि शिकविणे ही एक कला. दोन्हीही क्षेत्रात अनिश्चितता आणि सर्जनशीलता ठासून भरलेली असते. जसे की पुढचा शोध कोणता लागेल, हे विज्ञानाला माहीत नसते आणि प्रतिभा संपन्न साहित्यिकाच्या हातून पुढील कोणती ओळ लिहिली जाईल हे त्यांनाही माहित नसते. याउलट तंत्रज्ञानामध्ये तोचपणा, साचेबद्धपणा असतो. जसे की एका विशिष्ट आकाराचा साबण तयार करण्यासाठी, ठरविलेल्या कृतीप्रमाणे हजारो लाखो सारखेच साबण यंत्राद्वारे निर्माण होतात. पण शिक्षकाचा संबंध येतो तो साजीवंत चैतन्याशी, शिकवितांना तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा, पण त्यामुळे यंत्राप्रमाणे काम न करता, प्राप्त परिस्थितीशी समन्वय साधून स्वतःची अध्यापनाची वेगळी प्रतिमा आणि प्रतिभा शिक्षकाला तयार करता यायला हवी. फिनलंडमध्ये ज्याप्रमाणे शिक्षक हा संशोधक वृत्तीचा असावा लागतो. तशी संशोधकता स्वतःमध्ये कायम जिवंत ठेवणारा शिक्षक असावा. त्याचे निरीक्षण हे देशाचे भावी शास्त्रज्ञ घडविणारे असले पाहिजे- जसे की ढगांचे निरीक्षण पुढील मुद्द्यांच्या आधारे करा त्यांचा आकार मग तो लाटांप्रमाणे, पुजक्यासारखा, थरांप्रमाणे किंवा धाग्यांसारखा असेल, ढगांचा रंग- शुभ्र, काळा, फिकट काळा, किंवा पांढरा, वाहणारा वारा कसा वाहतो- हलका, जोराचा किंवा एकदम शांत. तापमान मग ते थंड, गरम, उबदार किंवा खूप थंड. ढगांची घनता- म्हणजेच जाडी अति दाट, विरळ किंवा पसरलेले ढग, आणि मुलांना या प्रकारे पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदी करायला लावून 22 सप्टेंबर ज्यादिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासाचीच रात्र असते किंवा मकर संक्रांतीला किंवा ऋतू बदलताना, त्यांना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे ढगांच्या प्रकाराविषयी माहिती सांगितली, त्याचप्रमाणे ढगांचे वेगवेगळे प्रकार, फोटो, शाळेच्या काच फलकामध्ये लावले तर, न जाणो यातूनच एखादा विद्यार्थी हा हवामानाशास्त्रज्ञ किंवा हवामान विश्लेषक होईल.
त्याचप्रमाणे पूर्ण दिवस किंवा चार तास, दोन तास मुलांना डोळे बंद करून वावरायला लावले, त्यांच्यासोबत काय काय घडलं, याची निरीक्षण नोंदवायला लावली, आणि मग त्यावर साधक बाधक चर्चा केली तर, विज्ञानातील एक साधा संशोधनाचा नियम सहज त्यांच्या लक्षात येईल की एखाद्या घटकाच्या अनुपस्थितीमुळे नेमके काय घडते हे त्यावेळी ते सांगू शकतील किंवा मग त्याची त्यांना नंतरही प्रत्यक्ष प्रचिती येऊ शकते.
विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फुले कधी उमलतात, किती काळ टिकतात, झाडावरून कधी गळून पडतात, त्या फुलांना किती पाकळ्या असतात, त्यांचा सुवास कसा असतो, त्यांचा उमलण्याचा कालावधी कोणता, ते कोणत्या हंगामात येतात असे निरीक्षण सहज जाता येता करायला लावले तर, त्यातून खूप माहिती विद्यार्थ्यांना मिळते. त्याला फक्त योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करायचे आहे.
फिनलंड देशामध्ये पारंपारिक सण उत्सव एवढ्या छान प्रकारे शिक्षण प्रणालीमध्ये गुंफले आहेत की मुलांना तो सण व उत्सव का साजरा करायचा? कशासाठी करायचा? आणि कशाप्रकारे करायचा? याची माहिती आपोआप कळते नवीन ज्ञानाची रचना म्हणजेच Learn, Unlearn आणि Relearn हे अतिशय सुंदर पद्धतीने फिनलंड होते. फिनलंड मध्ये ईस्टर या सणाच्या निमित्ताने तेथील विद्यार्थी शाळेमध्ये गवत वर्गीय वनस्पतींची लागवड करतात त्यामुळे ऋतुचक्रातील बदल आणि त्याचा लागवडीवर होणारा परिणाम हे विद्यार्थी एकाच वेळी शिकतात. आपल्याला सुद्धा परसबागेच्या निमित्ताने असा उपक्रम शाळेमध्ये सहज राबविणे शक्य आहे. गणित विषय खेळातून शिकविला, त्यासाठी वेगवेगळ्या शारीरिक क्रिया किंवा निसर्गातील घटना आपण वापरू शकतो, वर्गात गणिताची भीती घट्ट धरून बसलेला मुलगा मैदानावर खेळताना मात्र पायांचा व हातांचा योग्य कोन साधून दिलेल्या लक्ष्यावर योग्य प्रकारे योग्य अंशात भाला फेकतो, किंवा बॉलवर कोणत्या कोनातून मारले म्हणजे तो कोणत्या दिशेला जातो हे प्रात्यक्षिकातून शिकतो. 100 मीटर धावताना किती वेळ लागेल याचे गणित तो स्वतःच करतो. आपण फक्त वर्गात याची उजळणी करून घ्यायची.
उत्तमता जन्मजात नसली तरी ती प्रयत्नपूर्वक रुजविता येते. हे एक शिक्षक चांगल्या प्रकारे जाणतो. असो उपक्रम अनेक आहेत, असतात आणि भविष्यातही येतील. आपले काम सर्जनाचा धागा हाती धरून उत्तमाची नक्षी मातीवर उमटविण्याचे. कविवर्य ना धो महानोर यांनी म्हटल्याप्रमाणे, एका शिक्षकाने पुढील प्रमाणे कार्य करीत राहावे-
'सूर्यनारायण नित नेमान उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा.'
-निता निवृती शेटे
( DEd, BEd ,MEd, DSM )
उपशिक्षिका, न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, वडगाव मावळ, पुणे.
Mail ID: neetakhodade@gmail.com
परिचय
Study of Status of Women in Mythological Novels of Amish Tripathi या विषयात Ph.D. अंतिम टप्यात ( पुणे विद्यापीठ )
राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रसिद्ध ( इंग्रजी साहित्य )
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (२०२४ ) साठी निवड.
संदर्भ ग्रंथ सूची
१. डॉ. चित्रा सोहनी ( २००८ ), सर्जनशीलतेचा विकास, नित्य नूतन प्रकाशन, पुणे.
२. जगताप ह. ना. (संपादक) (२००७), "शैक्षणिक मानसशास्त्र"; तिसरी आवृत्ती, नरेंद्र प्रकाशन, पुणे.
३.. कुंडले म. बा. (१९९१) "सर्जनशीलता" नूतन प्रकाशन, पुणे.
४. पानसे रमेश, क्षीरसागर राज्यश्री, देशमुख-बेल्हेकर अनिता (२००६), "कर्ता-करविता, आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन", भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी, पुणे.
५. निरफराके अशोक (१९९५), "कल्पक बनूया', ज्ञानप्रबोधिनी, पुणे.
६. शिरीन कुलकर्णी , हेरंब कुलकर्णी ( २०२१ ), “ शिक्षणगंगा फिनलंड मधून आपल्या दारी”,
खूपच छान लेखन केले आहे. भाषाशैली अतिशय सुंदर आहे.शाळेमध्ये कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकतो हे अतिशय मार्मिक शब्दांत आपण सांगितले आहे. शिक्षकाची विविध रूपे आपण स्पष्ट करून दाखविली. मला हा लेख खूपच आवडला.
ReplyDelete