शाळास्तरावर मराठी विषय सक्तीचा करण्यात आला. यानिमित्ताने नुकतेच ९० व्या वर्षात पदार्पण केलेले एक व्यासंगी आणि कुशल भाषा शिक्षक, मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या भाषिक व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख.
भाषेची शिस्त अन् अंतर्मनातील सहृदयता
अमानवी बुद्धिमत्तेने शब्दांच्या, तंत्र- भाषेच्या जोरावर मराठीचा पारंपरिक चेहरा कितीही बदलण्याचा प्रयत्न केला, भविष्यात मराठीचे कितीही परिणामकारक रूप आपल्याला वाचायला मिळाले, मोडतोड केली आणि जगासमोर मराठीचे नवे स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला तरीही विलक्षण भाषिक बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रदीर्घ वाचनातून, मननातून, चिंतनातून एक पक्व भाषिक समज असलेल्या-सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांकडून मराठी भाषेबद्दलचे विवेचन, चिंतन ऐकणे ही गोडी सदैव अवीट आणि आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे.
रसाळसरांना ऐकताना, त्यांचा सहवास आणि परिचय लाभलेल्या तसंच लाभत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची हीच अनुभूती असणार आहे. वाचन-लेखन यांच्याबाबतीतली कठोर आणि अव्याहत शिस्त; मात्र व्यक्तिमत्त्वात कमालीची सहृदयता आहे. लेखन आणि वाचनात मग्न असताना कोणी भेटायला आलेल्या व्यक्तीशी तितक्याच आपुलकीने ते मनःपूर्वक संवाद साधतात.
भाषेचा विलक्षण समतोल, चित्तवेधक परंतु तितकाच संयत वापर, तर्कशुद्ध मांडणी, विवेचनाचा स्वाभाविक ओघ, मुद्देसूद, अत्यंत सूत्रबद्ध, पद्धतशीर आणि सुसंगत मांडणी, गरजेनुरूप विचारांमधील तितकीच तटस्थता, माणुसकी जपण्यातली तसंच स्वभावातली तितकीच सहृदयता, मनाचा निर्मळपणा,आणि स्नेह जपण्यातली बांधिलकी, हे सगळं एका लेखकाला सांभाळता येतं. याचा मानदंड रसाळ सर निर्माण करतात. ज्या विषयांवर सरांना बोलायचं आहे, लिहायचं आहे, त्या संकल्पनेचा नीटपणाने केलेले, जाणिवेत भर घालणारे आकलन, त्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू, त्या विषयाची पूर्वपरंपरा, पूर्वसूरींचे योगदान, एखाद्या लेखकाची नेमकी स्थान निश्चिती,वाङमयीन जगताचे सजग भान या साऱ्या गोष्टींची जाणीव सरांना ऐकताना आणि त्यांच्याशी बोलताना, लेखन वाचताना होत राहते. मराठीचा शिक्षक-प्राध्यापक कसा असावा? तर डॉ. रसाळ सरांसारखा आणि पुस्तकासारखंच माणसांवर विलक्षण प्रेम करणारा असा असावा.
वाढत्या वयाच्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन अनेक लेखक लेखनिकांची मदत घेतात. राम शेवाळकर, रणजित देसाई, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, रा. रं. बोराडे सर आणि आत्ता नुकतंच निधन झालेले प्रभाकर मांडे सर अशा सर्वांनी वेळोवेळी लेखनिकांची मदत घेतलेली आहे. रसाळ सरांचं वयोमान ९२ वर्षं आहे. डोळ्यांची नैसर्गिक क्षमता कमकुवत होत चाललेली आहे. तरीसुद्धा लेखनाचे-वाचनाचे व्रत अखंड सुरू आहे. डोळ्यांच्या मर्यादेमुळे भिंगाच्या साह्याने ते वाचन करतात. स्मरणाचं कौशल्यही तितकंच नीटनेटके आहे. रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाला असे बहुविध पैलू आहेत. उदयोन्मुख आणि समकालीन लेखकांना आपुलकीने समजून घेत त्यांना लेखनाची दिशा देत, त्यांची दखल घेणारे आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे, ऋजूता जपणारे अनेकांचे चाहते, साहित्यात अत्यंत आदराचे, आदबीचे आणि अतिशय सौजन्यशील स्थान निर्माण करणारे आणि ते कसोशीने जपणारे ज्ञानधर्मी भाषाशिक्षक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना लिहित्या हातांना बळ देतात. त्यातून नवी उमेद उजागर होते. सरांच्या भेटीत उथळ गप्पांना वाव नसतो, ना कुणाविषयी कटुता असते. त्यांना भेटणाऱ्यांसाठी त्यांचं एक कुतूहल कायम राहिलेलं आहे ते म्हणजे-सध्या काय वाचत आहात? असा प्रश्न विचारण्यामागे त्यांचा हेतू वाचतं करणं-वाचनातलं सातत्य जपणं हा असतो. साहित्य आणि भाषा ही दोन टोकं नसतात तर ती परस्परपूरकच असतात, हेही जाणवत राहतं. बाळकृष्ण कवठेकर, ल.का. मोहरीर, डॉ.दासू वैद्य, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, यशवंत मनोहर या आणि अशा विविध साहित्यिकांच्या विद्यार्थी जीवनात सरांनी संस्कार केलेत. अनेक नव्या लिहित्या व्यक्तींना सरांचं सानिध्य अतिशय उमेद देणारे व प्रेरक ठरत आलेले आहे. प्रसिद्धीपासून कमालीचं अंतर बाळगणारे, वाड्.मयाची सखोल समीक्षा लिहिली जावी अशी वेळोवेळी अपेक्षा व्यक्त करणारे डॉ. रसाळ सर माणूसपण जपणारे एक थोर लेखक, एक श्रेष्ठ समीक्षक आणि एक थोर भाषा शिक्षक आहेत.
-डॉ.नागेश अंकुश
खुप छान मार्मिक व न्यायी लेखन अंकुश सर
ReplyDeleteवाह.. उत्तम लेख 👌🏽🙏🏽
ReplyDeleteअप्रतिम लेखन व मांडणी
ReplyDeleteछान लेख.
ReplyDeleteउत्तम... सहजता, आशय.
ReplyDelete