११-१२वीचे विद्यार्थी करतात तरी काय?
महाविद्यालयांना जोडलेल्या अकरावी-बारावीच्या वर्गांत बहुतेक ठिकाणी विद्यार्थी फिरकतसुद्धा नाहीत, असा अनुभव आहे. अनेक महाविद्यालयांचे आणि विनाअनुदानित शाळांचे NEET, JEE, MHT-CET अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून देणाऱ्या शिकवणी केंद्रांबरोबर संधान असते. घटक चाचण्या आणि प्रात्यक्षिके एवढ्यापुरतेच विद्यार्थी वर्गांत येतात; एरव्ही शिकवणी केंद्रांतच असतात. अकरावी-बारावीतील गैरजेरीचे प्रमाण वेगळा विचार करावा लागेल इतके मोठे आहे.
हे गैरहजर विद्यार्थी वर्गाबाहेर करतात तरी काय? अकरावी-बारावीचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी बोलल्यावर पुढे येणारे चित्र खूपच चिंताजनक आहे. विज्ञान शाखेचे अनेक विद्यार्थी वर्गाच्या वेळेतच शिकवणी केंद्रांत जातात. इतर बहुतेक विद्यार्थी महाविद्यालयाच्या परिसरातच कॅंटीनमध्ये किंवा इतर कुठेतरी बसून आपसात गप्पा, मौज-मस्ती, स्मार्टफोनवर सर्फिंग, चॅटिंग, व्हिडिओ पाहणे अशा गोष्टींत वेळ घालवत असतात. प्रवेश एका गावात, तर वास्तव्य दूरवरच्या मुंबई, ठाणे, हैदराबाद, कोटा अशा शहरांत, असेही प्रकार ऐकिवात आहेत. या वयोगटात व्यसनाधीनता, दादागिरी आणि इतर समस्या आहेतच. ज्या वयात विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख व्हायला लागते, ज्या वयात त्यांनी भविष्याची स्वप्ने पाहायची असतात आणि ती साकारण्यासाठी प्रयत्न करायचे असतात, ज्या वयात त्यांची नैतिक मूल्ये पक्की व्हायला लागलेली असतात, त्या वयातच त्यांचे असे भरकटणे खूपच घातक आहे.
विद्यार्थ्यांसमोर योग्य असे आदर्श उभे करण्यात, त्यांचे करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात, ते अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रमावेत असे वातावरण निर्माण करण्यात, त्यांचे शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था अपयशी ठरत आहेत, हाच याचा अर्थ. ही कोलमडलेली व्यवस्था नव्याने उभारायची असेल तर काय करावे लागेल? त्यासाठी शिक्षकांचे सखोल विषयज्ञान, विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळेल असे त्यांच्या सहभागातून आयोजित केलेले उपक्रम आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल वाटणारा जिव्हाळा, शिक्षणव्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व हे सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. अकरावी-बारावीतील शिक्षणप्रक्रिया योग्य मार्गावर आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रामाणिक आणि नियमित तपासणीची पद्धत तातडीने सुरू करायला पाहिजे.
भारतासारख्या परीक्षाभिमुख शिक्षणव्यवस्था असलेल्या देशात अभ्यासक्रमांतील बदलांशी सुसंगत असे परीक्षापद्धतीतील बदल तेवढेच महत्त्वाचे असतात. भारताप्रमाणेच चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर या शेजारच्या प्रगत देशांतही सार्वजनिक परीक्षांना खूपच महत्त्व असते आणि तिथे त्या चांगल्या प्रकारे आयोजित होतात. या देशांकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील अनुपस्थितीचा एसएससी बोर्डाच्या बारावीच्या निकालावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही; उलट त्यात गेल्या बारा वर्षांत १२ टक्क्यांची वाढ होऊन २०२३मध्ये तो ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही समाधानाची नाही, तर चिंतेची बाब आहे. दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षेतसुद्धा अप्रामाणिकपणे केलेले अंतर्गत मूल्यमापन, प्रश्नपत्रिकांचे अतिसुलभीकरण आणि जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे सपाटीकरण हे दोष आहेतच. परीक्षेची विश्वासार्हताच त्यांमुळे धोक्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशांच्या निवड प्रक्रियेसाठी परीक्षेतील गुण उपयोगी वाटत नसल्यामुळे MHT-CET ही चाळणी परीक्षा सुरू केली. आयसीएसई बोर्ड प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारे अहवाल आपल्या संकेतस्थळावर टाकते. या अहवालांत प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या चुका आणि त्यांच्या मनांतील संभ्रम, अशा अंगांनी विश्लेषण असतेच; पण त्याबरोबरच शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे अभिप्रायसुद्धा असतात. त्याआधारे प्रत्येक प्रश्नाशी निगडित संबोध स्पष्ट व्हावेत, यासाठी विद्यार्थ्याना कोणते अध्ययन-अनुभव आणि कृती देण्यात याव्यात, याबद्दल शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या असतात. बारावीच्या परीक्षापद्धतीतील दोष दूर करण्यासाठी एसएससी बोर्डालाही असे काही करता येईल.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, मानसिक, नैतिक असा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर परीक्षापद्धतीसुद्धा विद्यार्थ्यांचे सर्वांगांनी मूल्यमापन करणारी असावी लागेल. २०२३च्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात याबद्दल तपशीलाने मार्गदर्शन केले आहे. हे साध्य करण्यासाठी शिक्षणव्यवस्थेतील निष्क्रियता आणि “शिक्षकांना हे जमेल का?”, “विद्यार्थ्यांना हे झेपेल का?” असा विचार करणारी, विद्यार्थ्यांचा विकास खुरटवणारी पराभूत मनोवृत्ती झटकून बोर्डाच्या परीक्षापद्धतीत बदल करणे, यापेक्षा चांगला आणि प्रभावी मार्ग असू शकत नाही.
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २७ मार्च २०२४)
No comments:
Post a Comment