Saturday, 23 September 2023

डोळे हे जुलमी गडे!

 डोळे हे जुलमी गडे!

       चुलबुल, एक मस्तीखोर खार. तिच्या गावात आज एका पंडित मांजराचे आगमन झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी सर्व प्राण्यांनी गावात गर्दी केली होती. चुलबुलचे आई वडील आणि चुलबुलही पंडित मांजरांना भेटण्यासाठी त्यांच्या प्रवचनाला रात्री गेले. प्रवचनकारी पंडित मांजराचे भेदक आणि गोटीसारखे डोळे पाहून चुलबुल खार थोडी घाबरली. आईच्या कुशीतच शिरली. प्रवचन संपेपर्यंत ती आईच्या कुशीतून बाहेरच आली नाही. आईच्या लक्षात आले. आईने चुलबुलला उचलून घेतले आणि आई चुलबुलला म्हणाली,

"रात्रीच्या वेळी मांजरीचे चमकणारे डोळे कधीकधी भीतीदायक वाटतात. मांजरीचे डोळे चमकतात कारण ते इतर अनेक निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांसारखेच प्रकाश प्रतिबिंबित करतात. सर्व डोळे प्रकाश परावर्तित करतात, परंतु काही डोळ्यांमध्ये एक विशेष परावर्तित रचना असते .ज्याला टॅपेटम ल्युसिडम म्हणतात जे रात्रीच्या वेळी चमकते. टॅपेटम ल्युसिडम (चमकणारा थर) हा मूलत: अनेक प्रकारच्या निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांच्या पाठीमागे एक लहान आरसा आहे. हे मुळात या प्राण्यांना रात्री अधिक चांगल्या रितीने पाहण्यास मदत करतात. मांजरीप्रमाणेच वाघ, चित्ता, बिबट्या या प्राण्यांचे डोळे रात्री चमकताना दिसतात. याशिवाय अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या प्राण्यांचे डोळे रात्री चमकतात त्या सर्वांच्या डोळ्यांची चमक एकसारखी नसते. ज्या प्राण्यांच्या डोळ्यात रक्तातील नसांची संख्या जास्त असते त्यांची चमक लाल असते. ज्या प्राण्यांच्या डोळ्यातील नसांची संख्या कमी असते त्यांचे डोळे पिवळे किंवा पांढरे चमकताना दिसतात. 



     जलचरांचा विचार केल्यास ‘तारा माशा’च्या प्रत्येक भुजेच्या टोकाला लहान डोळे असतात. जरी त्यांना खूप डोळे असले तरीही ते चांगल्या प्रकारे पाहू शकत नाहीत. डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा फक्त एक डोळा बंद करतात. जेव्हा मेंदूचा उजवा अर्धा भाग झोपतो तेव्हा डावा डोळा बंद होतो. याउलट मेंदूचा जेव्हा मेंदूचा डावा अर्धा भाग झोपतो तेव्हा उजवा डोळा बंद होतो. या झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' (Unihemispheric sleep) असे म्हणतात. झोपेत असताना श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी, अनेक जलचर सस्तन प्राणी युनिहेमिस्फेरिक स्लीपचा वापर करतात.



     सुमारे 99% कोळ्यांना आठ डोळे असतात. काहींना सहा, चार किंवा दोन असतात. काही प्रजातींना एकही डोळा नसतो.

कोळ्यांचे डोळे दोन प्रकारचे असतात. प्राथमिक डोळ्यांची मोठी जोडी प्रतिमा बनवते. दुय्यम डोळे कोळ्याच्या हालचाली आणि अंतर मोजण्यात मदत करतात. कोळ्याच्या डोळ्यांची संख्या आणि मांडणी अर्कनोलॉजिस्टला कोळ्याच्या प्रजाती ओळखण्यास मदत करते. कोळ्याला खूप डोळ्यांची आवश्यकता असते कारण तो पाहण्यासाठी त्याचे डोके फिरवू शकत नाही. उलट, डोळे जागी स्थिर असतात. भक्ष्य मिळविण्यासाठी आणि भक्षकांपासून दूर राहण्यासाठी, कोळी त्यांच्या सभोवतालच्या हालचाली जाणवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. मोठा डोळा असलेला दृष्टिहीन लांडगा स्पायडर गुहांमधील भेगा आणि खड्ड्यांमधून हळू हळू रेंगाळतो, स्पर्श, वास आणि चव या संवेदनांमधून आपली शिकार शोधतो. याला मोठ्या फॅन्ग (दात)असतात ज्याने त्याच्या शिकारला त्याच्या विषाने (विष) टोचतात आणि प्राण्यांना वश करतात.



        सरडे पहिल्या दृष्टिक्षेपात आळशी वाटू शकतात आणि फार हुशार नसतात, कारण त्यांचे डोळे जवळजवळ नेहमीच बंद असतात. ते एका डोळ्याने एका बाजूने आणि दुसर्‍या डोळ्याने वेगळ्या प्रकारे पाहू शकतात. करेलिया नावाचा सरडा हा एकाच वेळी वेग वेगळ्या दिशेने पाहू शकतो. तिसरा डोळा सामान्यतः पॅरिएटल डोळा म्हणून ओळखला जातो, हा एक दृश्य नसलेला, प्रकाशसंवेदनशील पॅरापाइनल अवयव आहे जो बहुतेक सरडे , बेडूक, तुतारा आणि माशांच्या काही प्रजातींमध्ये आढळतो. विशेष म्हणजे, पॅरिएटल डोळा देखील अनेक सरड्यांसाठी एक प्रकारचा कंपास म्हणून काम करतो ! तो प्रकाश जाणू शकतो म्हणून, तिसरा डोळा सरड्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास आणि निवारा, अन्न आणि त्यांच्या वातावरणातील परिचित क्षेत्र शोधण्यात मदत करतो. सरड्यांचे डोळे माणूस पाहू शकत नाही असे रंग पाहू शकतात आणि ते जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर सहजतेने लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांना ‘तिसरा डोळा’ देखील असतो, जो सामान्यतः डोक्याच्या वर असतो, जो प्रकाश आणि अंधारातील बदल जाणण्यास मदत करतो. विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सरड्यांना एकंदरीत सर्वोत्तम दृष्टी असते. त्यांच्या डोळ्यांमध्ये अद्वितीय फोटोरिसेप्टर्स आहेत जे त्यांना माणसापेक्षा अधिक विस्तृत रंग पाहण्यास मदत करतात. यामध्ये स्पेक्ट्रमच्या अतिनील श्रेणीतील रंगांचा समावेश होतो.



        शिकारी पक्ष्यांना उत्कृष्ट दृष्टी असते, गरुडाचे मोठे डोळे, जवळजवळ मानवी डोळ्यांइतके मोठे असतात, म्हणूनच हे पक्षी उत्कृष्ट शिकारी असतात. फोव्हिया डोळ्यातील 2 बिंदू आहेत, ज्यामुळे गरुडांना एकाच वेळी समोर आणि बाजूंना पाहता येते. त्यांचे दृष्टीचे क्षेत्र 340º आहे, आणि त्यांची रात्रीची दृष्टी देखील मानवांपेक्षा चांगली आहे. शहामृगाचा डोळा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो ज्याचा आकार पाच सेंटीमीटर असतो.     



    बेडकाला अन्न गिळण्यासाठी त्याचेच डोळे मदत करतात. बेडकाने तोंडात भक्ष्य पकडल्यानंतर डोळ्यांचे गोळे डोक्यात मागे सरकतात. अन्न खाली ढकलून बेडूक अन्न गिळतो. बेडकाला दात आणि माणसासारखी जीभ असली तरी ते दातांचा वापर अन्नाला तोंडात ठेवण्यासाठी करतात चघळण्यासाठी नाही. बेडकाची जीभ तोंडाच्या पुढच्या बाजूला जोडलेली असते म्हणूनच बेडकाला डोळ्यांच्या मदतीशिवाय गिळणे शक्य होत नाही. या व्यतिरिक्त, झोपलेला बेडूक त्याच्या पापण्या बंद करतो आणि तो विश्रांती घेत असताना स्वतःचे संरक्षण करतो. बेडकांना तीन पापण्या असतात. खालची पापणी स्थिर असते, तर वरची पापणी अधूनमधून लुकलुकते आणि बेडकाच्या डोळ्याला ओलसर ठेवण्यास मदत करते. मगरीचे डोळे तीक्ष्ण असतात. रात्री त्यांची दृष्टी दिवसापेक्षा चांगली असते. रात्रीच्या वेळी मगरीचे डोळे चमकलेले दिसतात. हे त्यात असलेल्या चमकदार पदार्थामुळे त्यांचे डोळे रात्री चमकतात. रात्री मगरी पाण्याखाली दिसतात तेव्हा त्यांचे डोळे लाल ठिपक्या सारखे दिसतात. मगर जेव्हा एखादे भक्ष्य खाते किंवा गिळते तेव्हा ती रडते. कारण मगरी प्राणी खाताना भरपूर हवा गिळतात आणि जेव्हा ही हवा अश्रू निर्माण करणाऱ्या अश्रू ग्रंथींच्या संपर्कात येते तेव्हा अश्रू निर्माण होतात. म्हणून बऱ्याचदा मगर रडताना दिसतो.

    मानवी डोळे एका मिनिटात जवळपास सतरा वेळा उघडझाप करतात. डोळे मिचकाण्याची दोन कारणे आहेत. डोळ्यांत आर्द्रता राखण्यासाठी आणि बाहेरील कणांपासून डोळे सुरक्षित राहण्यासाठी. निळे डोळे असणारे लोक जास्त सूर्य प्रकाश सहन करू शकत नाहीत. ज्यावेळेस माणूस रडतो तेव्हा त्याच्या नाकातून पाणी येते कारण त्याचे अश्रू हे नाकावाटे निघत असतात. माणसे एखाद्याशी बोलतात तेव्हा,त्यांच्या पापण्या अधिक उघडझाप करतात, परंतु जेव्हा माणूस एखाद्या संगणकाच्या पडद्यावर किंवा कागदावर काही वाचत असतो, तेव्हा पापण्यांची कमी उघडझाप करतात, म्हणून माणसाला अधिक थकल्यासारखे वाटते. 

    नुकत्याच जन्मलेल्या मानवी बाळाचा चार ते तेरा आठवड्यांपर्यंत रडण्याचा आवाज येतो पण त्यांच्या डोळ्या मधून अश्रू येत नाहीत. पाच महिन्यानंतर माणसाला पापण्या नवीन येतात पण माणसाच्या डोक्याचे केस येण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतात.  

    कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगाचा फरक कळत नाही. 

           कीटकांचे वैशिष्टे म्हणजे कीटक त्यांच्या उजव्या आणि डाव्या डोळ्याचा वापर करून त्यांचे भक्ष्य नक्की किती अंतरावर आहे याचा अंदाज बांधू शकतात आणि त्याचा अचूक वेध घेवू शकतात. म्हणजे भक्ष्याची अचूकता कीटकांमध्ये इतर कोणत्याही सजीवापेक्षा जास्त असते. कीटक हवेत उडतात त्यावेळी त्यांचे संयुक्त डोळे आणि त्या मधील फोटोरीसेप्टर हे अचूकपणे भक्ष्याचा वेध घेवू शकतात. त्याच बरोबर कीटकांमध्ये काही प्रमाणात रंग ओळखण्याचीसुद्धा क्षमता दिसून आली आहे. तसेच अचूकता हेसुद्धा कीटकांमध्ये दिसून येते म्हणजे प्रकाश कोणत्या बाजूला आहे तसेच पाणी कोणत्या बाजूला आहे हेसुद्धा कीटकांना समजू शकते.

          ओसिली किंवा आपण त्याला साधे डोळे म्हणू. हे कीटकांमध्ये तीन असतात. कीटकांच्या दोन्ही संयुक्त डोळ्यांच्या मध्ये आणि मस्तकावर तीन लहान ठिपके दिसून येतात ते ओसिली होय. ओसिली हे मात्र एकच नेत्रभिंग असलेले साधे डोळे असतात. त्याचा वापर कीटक प्रकाश टिपण्यात करतात. म्हणून ओसिली डोळ्यांना फोटो रिसेप्टर असेही संबोधले जाते. संयुक्त डोळ्याप्रमाणे ओसिली डोळे जरी जटील प्रतिमा चा अर्थबोध करीत नसली तरी आजूबाजूच्या लहान सहान हालचाली टिपण्यात ओसिली डोळे मदत करतात. तसेच उड्डाण क्षितिज ठरवणे आणि उड्डाण नियंत्रण यात ओसिली महत्वाची भूमिका पार पाडतात. तसेच कीटकांच्या संयुक्त डोळ्यांच्या बाजूला एक आयलेट्स म्हणजे सूक्ष्म छिद्र डोळे असते ते सुद्धा कीटकांचे डोळे म्हणून आणि संयुक्त डोळ्यांना पूरक म्हणून कामकाज करत असतात. मात्र आयलेट्स प्रत्येक कीटकांमध्ये विकसित झालेली असेलच नाही.

       माणसाच्या डोळ्यासारखी अत्यंत स्पष्ट आकृती जरी कीटकांच्या डोळ्याला दिसत नसली तरी दिसणाऱ्या अस्पष्ट आकृतीचे विश्लेषण तो जलद गतीने करू शकतो आणि निर्णय घेवू शकतो त्यामुळे कीटकांच्या हालचाली आपल्याला जलद गतीने पहावयास मिळतात. साहजिकच मानवी उत्क्रांती होत असतांना कीटकांच्या विविध प्रजातीमध्येही काही उत्क्रांती झालेली पाहायला मिळते. त्यामुळे दोन संयुक्त डोळे, तीन साधे डोळे आणि दोन सूक्ष्म छिद्र डोळे या आधारे कीटकांच्या पूर्ण विकसित प्रजाती आपला जीवनक्रम आत्मविश्वासाने पूर्ण करतात. 

        ही सर्व चर्चा चालू असतानाच चुलबुल खारीच्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या आणि चुलबुलला म्हणाल्या,"चल ग चुलबुल आपण आंधळी कोशिंबीर नाहीतर गाढवाला शेपूट काढणे हे खेळ खेळूया." चुलबुलला हे सर्व खेळ नवीन होते. ती म्हणाली," हे खेळ कसे खेळायचे?" तिची मैत्रीण म्हणाली," अगं सोप्पं आहे. डोळे मिटायचे आणि गाढवाचे चित्र असते त्या चित्राला डोळे मिटून अंदाजाने शेपूट काढायची. बरोबर गाढवाला शेपूट काढले तो जिंकला. चुलबुल म्हणाली," डोळे मिटून हे कसे काय शक्य आहे?" यावर चुलबुलची आई म्हणाली," का नाही? काही काही माणसे अंध असतात त्यांना जन्मताच दिसत नाही पण अंदाज घेत ते आयुष्यभर काम करतात जसे की मानवी अंध त्यांना लिहिता वाचण्यासाठी येण्याकरिता ब्रेल लिपी तयार केली गेली आहे. शिवाय लिफ्ट मध्ये सुद्धा ब्रेल लिपी त्याच्यासाठी असते. चुलबुल मानवा व्यतिरिक्त काही समुद्रातील प्राणी आहेत ज्यांना डोळे नसताात. 



अट्रेटोचोआना हा प्राणी अलीकडेच ॲमेझॉन नदीत सापडला आहे. तो सापासारखा दिसतो.  तो सापासारखा सरकतो आणि पाण्याखाली श्वासही घेऊ शकतो. सभोवतालचे वातावरण पाहण्यासाठी त्याला डोळे नसतात परंतु त्वचेचा वापर करून तो आजूबाजूची परिस्थिती जाणून घेऊ शकतो. 



हायड्रास हे तंबू असलेल्या जेलीफिशचे नातेवाईक आहेत. त्यांनाही डोळे नसतात, पण प्रकाशाला प्रतिसाद देण्याची क्षमता असते.

          इतक्यात शाळेत गेलेली चुलबुलची मोठी ताई घरी आली ती आज एकदम खुश होती .ताई आईला म्हणाली,"आई आज आमच्या शाळेत डोळ्यांचे डॉक्टर आले होते. त्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी त्याचे आम्हाला मार्गदर्शन केलेच पण, आम्हाला मार्गदर्शन करताना इतके हसवले की काय सांगू. ते म्हणाले, कोणत्याही मैत्रिणीला डोळा मारायचा नाही आणि मैत्रिणीने आपल्या मित्राच्या पाकिटावर डोळा ठेवायचा नाही. आपल्या मैत्रिणीच्या डोळ्यातले कुसळ पाहायचे नाही. मित्राच्या डोळ्यात मुळीच अंजन घालायचे नाही. मैत्रिणीच्या बोलण्याकडे काना डोळा करायचा नाही आणि आपल्या मैत्रिणीवर तर मुळीच डोळे वटारायचे नाहीत, नाहीतर डोळ्यांवर फार वाईट परिणाम होऊ शकतात. अशा विविध डोळ्यांच्या म्हणींचा वापर करत त्यांनी आम्हाला खो-खो हसवले सुद्धा."

          इतक्यात चुलबुलचे बाबा आले. बाबा म्हणाले, "नयन हे बोलके असतात. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही कधी कधी गरज वाटत नाही. ते डोळे व्यक्त करतात. मनातील भाव डोळ्यांमध्ये वाचता येतात. पण चुलबुल, तुला माहिती आहे का? अनेक लोक डोळे असून आंधळे असतात. तुला बिरबलाची गोष्ट माहिती आहे का?” गोष्ट म्हणताच चुलबुलचे डोळे चमकले! ती म्हणाली, “सांगा ना बाबा, मला नाही माहिती!” बाबांनी बिरबल अकबराची गोष्ट सांगितली ती अशी: अकबराने बिरबलाला विचारले की त्यांच्या राज्यात आंधळे किती असतील? बिरबलाने उत्तरासाठी आठ दिवस मागितले आणि दुसऱ्या दिवशी तो दरबाराच्या बाहेरच्या दरवाजावर बाज (खाट)विणू लागला. दरबारात येणारा प्रत्येक सरदार- दरकदार त्याला विचारू लागला, “बिरबल, तू हे काय करतो आहेस?” अकबर राजानेही तोच प्रश्न केला. , बिरबलाने हा प्रश्न विचारणाऱ्यांची नावे एका कागदावर लिहिली. त्या कागदावर शीर्षक लिहिले, आंधळ्यांची यादी! पहिले नाव अकबर राजाचे होते! राजाने आश्चर्याने विचारले, “मला तर डोळे आहेत, मग मी आंधळा कसा?” बिरबल उद्गारला, “महाराज, मी बाज(खाट) विणतो हे पाहूनही तुम्ही विचारले की, बिरबल, तू हे काय करतोस?, मग तुमच्या डोळ्यांचा काय उपयोग?”

राजाला चूक समजली!

“चुलबुल, बिरबलाची आंधळ्यांची यादी संपलेली नाही!” सर्व जण हसू लागले. चुलबुलला बाबांचे म्हणणे पटले, आणि डोळ्यांचा योग्य वापर करण्याचा निश्चय तिने केला. तसा आपणही करूया!

- सायली घाग 

आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा, गोरेगाव (पूर्व), मुंबई.

Sayalig2710@gmail.com

( पूर्वप्रसिद्धी:  विज्ञानधारा मासिक सप्टेंबर 2023 )


Saturday, 16 September 2023

"गुरूने दिला ज्ञानरुपी वसा...."

 "गुरूने दिला ज्ञानरुपी वसा...."


      'बालपणीचा आणि काळ सुखाचा...'असं म्हणतात ते किती बरोबर आहे हे आज वयाच्या पन्नाशीत प्रकर्षाने पटतंय. किती प्रकारचे खेळ, थट्टा, मस्करी, मारामाऱ्या, कट्टी- बट्टी,आरडा -ओरडा,आणि काय काय....... लहानपणी आईची साडी कोठेही पडली असेल तर ती गुपचूप अंगावर जमेल तशी लपेटायची. हातात वह्या पुस्तके घेऊन शिक्षकांची नक्कल करणारी मी..काही एकटी नाही... मग त्यात शिक्षक कसं बोलतात.. त्यांची चालण्याची विशिष्ट पद्धत,... त्यांची राहण्याची स्टाईल... शिकवताना पुन्हा पुन्हा येणारे शब्द ...या गोष्टी हमखास असायच्याच. लहानपणी प्रत्येक वयात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीं आकर्षित करत असतात आणि आपण त्याप्रमाणे त्यावर व्यक्त होत असतो.प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी वेगळंच आपलं आदर्श असतं हे मात्र सर्वानुमान्य . मला मात्र लहानपणापासून "शिक्षकच" व्हायचं होतं. याला कारण देखील तसंच होतं, माझे वडील सुद्धा एक "शिक्षक" होते आणि त्यांचाच आदर्श माझ्यासमोर होता. घरात,शाळेत आणि समाजात त्यांच्याकडे पाहत, अनुभवत, निरीक्षण करत आम्ही भावंडं लहानाचे मोठे झालो. "ज्ञानदान" हे सर्वात मोठे आणि यथोचित दान आहे शिवाय ते एकमेव असे दान आहे की, ते दुसऱ्याला दिल्याने त्यात वृद्धी होते हे लक्षात येत होते .शिवाय समाजासाठी-देशासाठी तुम्हांला काम करण्याची संधी शिक्षकी पेशामुळे मिळते. त्यामुळेच दहावीमध्ये चांगले गुण असताना देखील मी डी. एड. हे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांचा अध्यापनाचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालू ठेवला.

        "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद " असे घोषवाक्य असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून वडील कार्यरत होते.त्यांचा अध्यापनाचा विषय होता इंग्रजी. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे आम्हां बहीणभावंडांचे शिक्षण महाराष्ट्रातील खूप वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. त्यामुळे प्रत्येक भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच व्यावहारिक जीवनमान अनुभवता येत होते. चौथीपर्यंतच्या शाळा किंवा तेथील शिक्षक खूप पुसटसे आठवतात तो वयाचा दोष म्हणावा लागेल. मात्र पाचवी ते दहावी हा शिक्षणाचा कालावधी आयुष्यात अगदी ठळक अक्षरांनी कोरला गेला आहे. रयत शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणारी संस्था आणि त्यांच्या शाळांत असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग हा सर्वगुणसंपन्न असाच असतो हे देखील तितकेच खरे..संस्कारक्षम वयात चांगल्या शाळांप्रमाणे चांगले शिक्षक देखील आयुष्यात आले. या सगळ्यांत माझ्या आयुष्यात घरी भरपूर लाड करणारे आप्पा आणि शाळेत कडक शिस्तीत आणि तितक्याच प्रेमाने मुलांना समजून घेऊन इंग्रजी शिकवणारे माझे वडील श्री. बी. जी. जाधव सर याचं, आदराचं आणि प्रेरणेचं स्थान आहे. मुळात इंग्रजी विषय हा पाचवीपासून अभ्यासक्रमात समाविष्ट होता.सन १९८२ते १९८७ या काळात माझा पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. या काळात व्याकरण सर्वच भाषांचे अधिक भारांश देऊन शिकवले जायचे.पर्यायाने इंग्रजीचे व्याकरण देखील जाधव सर आम्हांला खूप छान रीतीने, सोप्या भाषेत समजून घेऊन शिकवायचे. त्यामुळे परकीय भाषा असली तरी इंग्रजी विषयाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्यांचा एक शिरस्ता होता की, शिकवलेला भाग सर्वांना समजला पाहिजे त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जमेल तितक्या सोप्या पद्धतीने ते शिकवायचे. माझ्यातदेखील सरांची ही सवय शिक्षिका झाल्यावर आपोआप अंगवळणी पडली.त्यात सरांचे हस्ताक्षर अगदी मोत्याप्रमाणे आखीव, रेखीव आणि टपोरे. त्यांनी पाचवीपासून दहावीपर्यंतच्या मुलांच्या हस्ताक्षरासाठी खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आजही मला आठवतात. एकदा हस्ताक्षर स्पर्धेत मी खूप उत्कृष्ट अक्षर काढले आणि अक्षरांवर शीर्षरेषाच दिल्या नाहीत. त्यावर सर मला म्हणाले, "तू एका सुंदर आणि आकर्षक स्त्रीचे चित्र हुबेहूब काढलंस.. मात्र तिला जर नाकच नाही काढलंस तर कसे वाटेल?.." त्यांचे ते बोलणे माझ्या अंतर्मनाला स्पर्शून गेलं.त्यामुळे मला सुंदर, वळणदार आणि टापटीपीत अक्षर काढण्याची दृष्टी मिळाली ."सुंदर हस्ताक्षर हाच मौल्यवान दागिना आहे" आणि ती तुमची ओळख देखील आहे हे देखील मनोमन पटले.कितीही घाईत लिहिलं तरी मी माझ्या अक्षराकडे जाणीवपूर्वक लक्ष देते.त्याचा उपयोग मला आजही माझ्या अध्ययन आणि अध्यापनात जाणीवपूर्वक होतो.

         इंग्रजी व्याकरण, हस्ताक्षर, वक्तशीरपणा, समाजाभिमुखता,सुलभ अध्यपनाची दृष्टी मी जाधव सरांच्या सहवासात राहून शिकले खरं, परंतु सगळ्यात जास्त त्यांच्यामधील मला आवडलेला गुण म्हणजे आयुष्यातील "सकारात्मकता ". आयुष्यात किती मोठी संकटं आली, कितीतरी वाईट प्रसंगांना सोमोरे जावे लागले, तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक गोष्ट अतिशय सकारात्मक मार्गाने सोडवण्यावर भर दिला. अर्धा पेला सरला आहे म्हणायचं की,अर्धा पेला भरला आहे म्हणायचं ते तर स्वतःच ठरवायचं असतं. स्वयंशिस्त,स्वतः च्या विषयाची तयारी, वेळेचे नियोजन, खिलाडूवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड हे इतरही महत्वाचे गुण सरांमध्ये होते.शिक्षक -विद्यार्थी -पालक आणि समाज यांचा समतोल चौरस सांधण्यात ते यशस्वी झाले.त्यांच्यामधील सर्वच गुण आज शिक्षक म्हणून मला माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडतात.शिक्षक असण्याबरोबर सर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळात त्यांना विशेष नैपुण्य प्राप्त आहे. खेळामुळे आणि नियमित व्यायामामुळे आज वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी सर अतिशय निकोप आणि तंदुरुस्त आयुष्य नातवंडांच्या सहवासात घालवत आहेत.सेवानिवृत्ती नंतर स्वतः ला सामाजिक कार्यात गुंतवून घेऊन जमेल तसे इतरांना मदत करण्यात जास्तीत जास्त ते लक्ष घालत आहेत."मानवतावादी, संस्कृतिनिष्ठ आणि चारित्र्यसंपन्न नागरिक व समाज घडवण्याचे व्रत हातात घेणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय ". माझे प्रेमळ वडील, कर्तव्यदक्ष शिक्षक, समाजशील व्यक्तिमत्व असणारे श्री. बी. जी. जाधव सर यांच्या हातून घडलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात खूप उंचीवर कार्यरत आहेत.प्रत्येक शिक्षकाची खरी संपत्ती ही त्यांनी घडवलेले विद्यार्थी हीच असते. त्या दृष्टीने सर खूप श्रीमंत आहेत, असेच म्हणावे लागेल.अशा व्यक्तिमत्वाचा सहवास जितका जास्त मिळेल तितकं समृद्ध व्हायला होतं. त्यांचाच वारसा चालवत आज जवळजवळ तीन दशकांहून अधिक मी सुद्धा अध्यापन करत आहे, माझी मुलगी याच क्षेत्रात पदार्पण करून पाय रोवत आहे.आमचा वारसा पुढे यशस्वीपणे नेत असताना काही तत्व किंवा मूल्य स्वतः मध्ये अवलंबत आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे त्यामुळेच म्हणावेसे वाटते,

"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 

            आम्ही चालवू हा पुढे वारसा......"


डॉ. मनीषा दिलीप वारे.

(एम. ए, बी. एड.,एम. फिल, नेट, सेट,पीएच. डी.)

पदवीधर शिक्षिका, पुणे मनपा.विद्यानिकेतन नं.१७,विश्रांतवाडी, पुणे ४११०१५.

इ मेल -manishaware5605@gmail. com

Saturday, 9 September 2023

चला, बालहक्क समजून घेऊया...

 चला, बालहक्क समजून घेऊया...

(संयुक्त राष्ट्र बालहक्क करार - UNCRC ची ३० वर्षे)

बालहक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध देशांनी एकत्र येऊन 'युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ दी चाईल्ड' अर्थात UNCRC किंवा CRC हा महत्वपूर्ण करार मान्य केला. मूल कुणाला म्हणावे, त्यांना नेमके कोणते हक्क असतात, आणि सहभागी देशांमधील संबंधित सरकारांनी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याबाबत स्पष्टीकरण UNCRC मध्ये देण्यात आलेले आहे. हे सर्व हक्क एकमेकांशी संबंधित असून, यापैकी प्रत्येक हक्काचे समान महत्व आहे आणि मुलांना या हक्कांपासून कुणीही वंचित ठेऊ शकत नाही, अशी या कराराची संकल्पना आहे.

बरोबर ३० वर्षांपूर्वी, २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जागतिक स्तरावरील नेत्यांनी एकत्र येऊन जगभरातील मुलांना एक ऐतिहासिक वचन दिले - एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर आराखड्याच्या, म्हणजेच UNCRC च्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या हक्कांचे संरक्षण आणि पूर्तता करण्याचे वचन.

या UNCRC चे नेमके म्हणणे काय आहे? तर मुले ही आपल्या पालकांच्या मालकीच्या वस्तू नव्हेत की ज्यांच्यासाठी सर्व निर्णय मोठ्यांनीच घ्यावेत. तसेच, मुले म्हणजे फक्त मोठे होण्याची वाट बघणाऱ्या आणि मोठेपणी कसे वागावे याची तयारी करणाऱ्या व्यक्ती नव्हेत. त्यांनाही आपले स्वतंत्र अस्तित्व आणि हक्क असतात. वयाच्या १८व्या वर्षापर्यंतच्या बालपणाला प्रौढ अवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळे समजले जावे, असे या करारात म्हटले आहे. बालपणीचा काळ विशेष आणि सुरक्षित असावा, ज्यामध्ये मुलांना सन्मानाने वाढू द्यावे, शिकू द्यावे, खेळू द्यावे, खुलू द्यावे आणि फुलू द्यावे.

UNCRC मधील कलमेः

१. मूल म्हणजे नक्की कोण: १८ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती.

२. भेदभावास मनाई: ओळख, ठिकाण, भाषा, धर्म, विचार, रंगरूप, अपंगत्व, आर्थिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबाच्या श्रद्धा आणि कौटुंबिक व्यवसाय यावरून भेदभावास मनाई. कोणत्याही कारणाने कोणत्याही बालकास अन्यायकारक पद्धतीने वागविले जाऊ नये.

३. मुलांच्या सर्वोच्च हिताचा विचार: प्रौढांनी आणि शासनाने आपण घेत असलेल्या निर्णयांचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार कोणताही निर्णय घेताना करावा.

४. बालहक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणीः आपल्या देशातील प्रत्येक बालकास या करारातील सर्व हक्कांचा लाभ घेता यावा याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

५. मुलांच्या विकासात कुटुंबाचे मार्गदर्शन: आपले हक्क उत्तम रीतीने कसे वापरावे याबाबत आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम शासनाने मुलांच्या कुटुंबांना व लोकसमूहांना करु द्यावे.

६. जिवंत राहणे आणि विकसित होणे: प्रत्येक बालकास जिवंत राहण्याचा हक्क आहे. उत्तम रीतीने मुलांचे अस्तित्व टिकवण्याची व त्यांचा विकास घडवण्याची काळजी शासनाने घ्यावी.

७. नाव आणि राष्ट्रीयत्वः मुलांची जन्मानंतर नोंदणी करण्यात यावी व शासनाची अधिकृत मान्यता असणारे एक नाव ठेवण्यात यावे. मुलांना स्वतःचे राष्ट्रीयत्व असावे (म्हणजेच कोणत्यातरी देशाचे नागरिक म्हणून त्यांना ओळख मिळावी). 

८. ओळख: मुलांना स्वतःची स्वतंत्र ओळख प्राप्त करण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांचे नाव, राष्ट्रीयत्व आणि कौटुंबिक नातेसंबंधांची अधिकृत नोंद केलेली असावी.

९. कुटुंब एकत्र राखणे: मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नसेल अशा परिस्थितीव्यतिरिक्त केव्हाही मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करू नये.

१०. भिन्न देशांमधील पालकांशी संपर्क: वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व एकमेकांसोबत राहण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी संबंधित देशांच्या शासनांकडून देण्यात यावी.

११. अपहरणापासून संरक्षणः कायद्याचे उल्लंघन करून मुलांना देशाबाहेर घेऊन जाण्याचे प्रकार संबंधित देशांच्या शासनांनी घडू देऊ नयेत.

१२. मुलांच्या मतांचा आदर: मुलांवर परिणाम करणाऱ्या मुद्यांवर मोकळेपणाने मत प्रदर्शित करण्याचा हक्क प्रत्येक बालकास आहे. मोठ्या माणसांनी मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि मुलांच्या मतांचा गांभीर्याने विचार करावा.

१३. मोकळेपणाने विचार मांडणे: आपण शिकलेल्या गोष्टी, आपले विचार आणि आपल्या भावना इतरांजवळ मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क मुलांना आहे.

१४. वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य: मुले आपले स्वतःचे विचार, मते आणि धर्म निवडू शकतात.

१५. समूह निर्मिती अथवा सहभागः मुले कोणत्याही समूहात अथवा संस्थेत सहभागी होऊ शकतात किंवा नवीन संस्था अथवा समूह निर्माण करून इतरांशी भेटीगाठी करू शकतात.

१६. खाजगीपणाचे संरक्षण: प्रत्येक बालकास आपले खाजगीपण जपण्याचा हक्क आहे.

१७. माहिती प्राप्त करणे: इंटरनेट, रेडीयो, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, पुस्तके आणि इतर स्रोतांद्वारे माहिती मिळवण्याचा हक्क मुलांना आहे.

१८. पालकांची जबाबदारी: पालकांनी आणि सांभाळ करणाऱ्यांनी नेहमी मुलांसाठी काय सर्वोत्तम राहील याचा विचार करावा. यासाठी संबंधित शासनाने त्यांना मदत करावी.

१९. हिंसेपासून संरक्षणः संबंधित शासनाने मुलांचे हिंसेपासून व अत्याचारापासून रक्षण करावे, तसेच मुलांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मुले दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२०. कुटुंबाचा आधार नसलेली मुले: आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडून ज्यांची काळजी घेतली जाऊ शकत नाही अशा मुलांना इतर लोकांनी व्यवस्थित आणि आदराने सांभाळावे, अशा प्रत्येक बालकाचा तो हक्क आहे.

२१. दत्तक गेलेली मुलेः दत्तक गेलेल्या मुलांसाठी जे काही सर्वोत्तम असेल ते केले जाणे महत्त्वाचे आहे.

२२. निर्वासित मुले: निर्वासित म्हणून दुसऱ्या देशात आश्रयाला आलेल्या मुलांना मदत आणि संरक्षण दिले जावे. त्या देशात जन्माला आलेल्या मुलांप्रमाणेच सर्व हक्क या मुलांनाही मिळावेत.

२३. दिव्यांग मुलेः अशा मुलांना स्वावलंबी बनता यावे आणि समाजात सक्रिय सहभाग घेता यावा, यासाठी कोणतेही अडथळे राहू नयेत याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

२४. आरोग्य, पाणी, अन्न, पर्यावरण: सर्वोत्तम आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, पौष्टिक अन्न आणि स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२५. मुलांना ठेवलेल्या ठिकाणाची तपासणीः संगोपन, संरक्षण किंवा आरोग्याच्या कारणावरून घरापासून दूर कुठेतरी ठेवण्यात आलेल्या मुलांच्या परिस्थितीची नियमितपणे तपासणी केली जावी आणि संबंधित मुलास ठेवण्यासाठी अजूनही तीच सर्वोत्तम जागा आहे का, याची खात्री केली जावी.

२६. सामाजिक व आर्थिक मदतः संबंधित शासनाने गरीब कुटुंबातील मुलांना पैसे किंवा इतर मदत पुरवावी.

२७. अन्न, वस्त्र, सुरक्षित निवाराः अन्न, वस्त्र आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२८. शिक्षण प्राप्त करणे: प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण मोफत दिले जावे. माध्यमिक आणि उच्च शिक्षण प्रत्येक बालकास उपलब्ध करून दिले जावे.

२९. शिक्षणाची उद्दीष्टे: मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व, कौशल्य आणि क्षमतांचा पूर्ण विकास घडवण्यासाठी मदत मिळावी.

३०. अल्पसंख्य संस्कृती, भाषा आणि धर्म: अल्पसंख्य असूनही आपली स्वतःची भाषा, संस्कृती आणि धर्माचे आचरण करण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३१. आराम, खेळ, संस्कृती, कला: प्रत्येक बालकास विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा, खेळण्याचा, तसेच सांस्कृतिक आणि सृजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा हक्क आहे.

३२. धोकादायक कामापासून संरक्षण: मुलांच्या शिक्षण, आरोग्य किंवा विकासासाठी धोकादायक किंवा वाईट असलेले काम करण्याविरुद्ध संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३३. धोकादायक औषधांपासून संरक्षणः शासनाने धोकादायक औषधांचे सेवन, निर्मिती, वाहतूक किंवा विक्री करण्यापासून मुलांचे संरक्षण करावे.

३४. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण: शासनाने लैंगिक पिळवणूक व लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करावे.

३५. मानवी विक्री आणि तस्करीस प्रतिबंध: मुलांचे अपहरण आणि विक्री होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी.

३६. पिळवणुकीपासून संरक्षणः सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

३७. अटक करण्यात आलेली मुलेः कायदा तोडल्याच्या आरोपाखालील मुलांना ठार मारले जाऊ नये, त्यांचा छळ केला जाऊ नये, त्यांना कायमचे तुरूंगात डांबू नये, किंवा प्रौढ व्यक्तींसोबत तुरुंगात ठेवू नये.

३८. युध्दकाळातील संरक्षण: युध्दकाळामध्ये संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३९. बरे होऊन पूर्वस्थितीला येणे: जखमी झालेल्या, दुर्लक्षित केल्या गेलेल्या, वाईट पद्धतीने वागवल्या गेलेल्या किंवा युध्दग्रस्त मुलांना आपले आरोग्य आणि आत्मसन्मान पूर्वस्थितीला आणण्यासाठी मदत मिळवण्याचा हक्क आहे.

४०. कायदा तोडणारी मुले: कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखालील मुलांना कायदेशीर सहाय्य आणि न्यायपूर्ण वागणूक मिळवण्याचा हक्क आहे.

४१. मुलांसाठी सर्वोत्तम कायद्यांची अंमलबजावणीः जर एखाद्या देशातील कायदे या करारापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बाल हक्कांचे संरक्षण करत असतील, तर त्याच कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.

४२. प्रत्येक व्यक्तीस बालहक्क माहिती व्हावेत: या कराराबद्दल आणि बालहक्कांबद्दल माहिती प्रत्येक शासनाने मुले आणि मोठ्या माणसांपर्यंत स्वतःहून पोहोचवावी.

४३. या कराराची कार्यपद्धती (४३ ते ५४): सर्व मुलांना आपल्या सर्व हक्कांचा लाभ घेता यावा यासाठी संबंधित शासनव्यवस्था, बालहक्क समिती आणि युनिसेफ यांच्यासहीत संयुक्त राष्ट्रसंघ, तसेच इतर संस्था कशाप्रकारे काम करतात याची माहिती या कलमामध्ये देण्यात आलेली आहे.

मागील ३० वर्षांमधील वाटचालः

UNCRC हा आतापर्यंत सर्वात जास्त मान्यता प्राप्त झालेला मानवी हक्क संबंधी करार आहे. या कराराने संबंधित शासनव्यवस्थेला कायदे आणि धोरणे बदलण्यासाठी, तसेच प्रत्येक बालकास सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि पोषण पुरविण्यावर गुंतवणूक करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. या करारामुळे मुलांचे हिंसेपासून व पिळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करणे भाग पडले आहे. तसेच या करारामुळे मोठ्या प्रमाणावर मुलांना आपले म्हणणे मांडता आले असून, आपल्या समाजातील त्यांचा सहभाग वाढला आहे.

काही बाबतीत अशी प्रगती झालेली असली तरी, अजूनही UNCRC ची संपूर्ण अंमलबजावणी अथवा सर्वत्र प्रचार आणि प्रसार झालेला नाही. पुरेशा आरोग्य सेवा, पोषण, शिक्षण आणि संरक्षण न मिळाल्याने लाखो मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होतच आहे. शाळा सोडणे, धोकादायक काम करणे, लग्न करणे, युद्धामध्ये लढणे भाग पाडले गेल्याने, तसेच प्रौढांसाठीच्या तुरुंगांमध्ये डांबून टाकल्याने मुलांचे बालपण अर्ध्यातूनच कुजून जात आहे.

यासोबतच, डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय, पर्यावरणीय बदल, दीर्घकाळ चालणारे संघर्ष आणि समूह स्थलांतर, अशा जागतिक बदलांमुळे बालपणाचे संदर्भ पूर्णपणे बदलून जात आहेत. आजच्या मुलांसमोर त्यांच्या हक्कांच्या आड येणारे नवे धोके उभे ठाकले आहेत, परंतु त्याचवेळी आपले हक्क प्रत्यक्षात उतरवण्याच्या नवीन संधीदेखील त्यांच्या समोर आहेत.

गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत, जागतिक स्तरावर मुलांच्या आयुष्यामध्ये पुढीलप्रमाणे परिवर्तन घडून आले आहे:

- १९९० पासून ५ वर्षांखालील मुलांच्या मृत्युंमध्ये ५०% पेक्षा जास्त घट;

- १९९० पासून कुपोषित मुलांच्या प्रमाणात जवळजवळ ५०% घट;

- १९९० च्या तुलनेत कितीतरी जास्त लोकांना आज शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध.

परंतु असे असले तरी, जगभरातील बालकांवर पुढील धोक्यांचे सावट अजूनही दिसत आहेः

- २६.२ कोटी मुले आणि युवक शालेय शिक्षणापासून वंचित;

- ६५ कोटी मुली आणि महिलांचे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न;

- २०४० सालापर्यंत, जवळपास २५% मुले अत्यंत मर्यादित पाणीसाठा असलेल्या क्षेत्रामध्ये राहत असतील.

UNCRC आणि भारत:

भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी UNCRC चा स्वीकार केला, ज्यामध्ये बालमजुरीसंदर्भातील काही मुद्यांवरील विशिष्ट मतभेद वगळता सर्व कलमांना तत्वत: मंजुरी देण्यात आली.

भारतामध्ये १८ वर्षे वयाखालील मुलांना काम करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे, परंतु बालमजुरीवर सरसकट बंदी मात्र नाही. 'धोकादायक' मानल्या गेलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर जवळपास सर्व उद्योगांमध्ये १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास सर्वसाधारणपणे मान्यता आहे. ऑक्टोबर २००६ मध्ये आलेल्या एका कायद्यानुसार, हॉटेल, उपहारगृहे, आणि घरगुती कामासाठी नोकर म्हणून बालमजूर ठेवण्यास बंदी घालण्यात आली असली तरी, घरकामात मदत करण्यासाठी मुलांना अजूनही मोठया प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. अगदी शासकीय आकडेवारीवर विश्वास ठेवला तरीदेखील, देशातील सध्याच्या १४ वर्षांखालील बालमजुरांची संख्या ४० लाखांपर्यंत असल्याचे समजते.

२०१६ सालच्या बालमजुरी प्रतिबंधक कायद्यामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना नोकरीवर ठेवण्यास मनाई करण्यात आली, तसेच किशोरवयीन (१४ ते १७ वयोगटातील) मुलांच्या धोकादायक व्यवसायातील कामावर बंदी घालण्यात आली. १४ वर्षांखालील मुलांनी काम करण्याच्या बाबतीत काही अपवाद नोंदवण्यात आले, जसे की कुटुंबाच्या व्यवसायात मदत करणे, आणि त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये अडथळा न आणता व संध्याकाळी ७ ते सकाळी ८ ही वेळ सोडून इतर वेळेत मनोरंजनाच्या उद्योगात काम करणे.

बालमजुरीच्या मुद्यावर भारताचे UNCRC सोबत मतभेद आहेतच, परंतु याशिवाय भेदभावास प्रतिबंध, जीवनावश्यक वातावरणाची निश्चिती, विकासाच्या समान व पुरेशा संधी, मुलांच्या मतांचा आदर, वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य, खाजगी आयुष्याची जपणूक, शिक्षण व माहिती मिळवण्याचा अधिकार, हिंसा, धोकादायक काम, लैंगिक छळ आणि पिळवणुकीपासून संरक्षण अशा हक्कांचा लाभ देशातील सर्व मुलांना मिळवून देण्यातही गेल्या ३० वर्षांत शासनाला यश आलेले नाही.

UNCRC ने जागतिक स्तरावर मान्य केलेले हक्क आपल्या देशातील मुलांना मिळत नसल्याच्या मुद्यावर पालक, मुलांचे सांभाळकर्ते, तसेच समाजातील सजग नागरिकांनी मुलांच्या वतीने शासनाला जाब विचारण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. तसेच, या बालहक्कांबद्दल मुलांना आणि एकूणच समाजाला माहिती मिळावी यासाठी शासनाने आणि माध्यमांनी स्वतःहून विशेष प्रयत्न करायची गरज आहे.

मंदार शिंदे

२०/११/२०१९

E-mail: shindemandar@yahoo.com


Saturday, 2 September 2023

गुण गाईन आवडी

 गुण गाईन आवडी

शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्यांनी आपल्याला शिकवले आहे असे अनेक शिक्षक असतात. त्यांच्यापैकी काहीजण उत्कृष्ट शिकवणारेसुद्धा असतात. पण “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” या उक्तीप्रमाणे जे प्रत्यक्ष आपल्या सोबत नसले तरी सोबत असल्याप्रमाणेच कायम वाट दाखवत असतात असे आयुष्याला कलाटणी देणारे, त्याची दिशाच बदलवून टाकणारे, ज्यांना गुरू म्हणता येईल असे शिक्षक दुर्मीळ असतात. सुदैवाने मला असे अनेक गुरू लाभले. विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या, त्यांना कान आणि वेळ दोन्ही देणाऱ्या, परंतु प्रयत्न मात्र विद्यार्थ्यांचेच असतील अशा वृत्तीने काम करणाऱ्या माझ्या शालेय जीवनातील काही गुरुंबद्दलच्या काही आठवणी या लेखात देत आहे.   

परीक्षेची भीती घालवणारी शाळा  

१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. चौथीपर्यंत मी बुलढाणा जिल्हयातील खामगाव नगरपरिषदेच्या सहा नंबरच्या शाळेत शिकलो. या शाळेत गोष्टी, गाणी, खेळ, कोडी, चित्रे काढणे, मातीच्या आणि ज्वारीच्या धांड्यांच्या प्रतिकृती तयार करणे, अवांतर वाचन, पाढे आणि कविता यांचे पाठांतर यांवर भर असायचा. चौथीला शिकवणाऱ्या भारंबे सरांचा सुलेखनावर भर असायचा. आठवडी, तिमाही, सहामाही, वार्षिक अशा परीक्षा असायच्या. तिसरीला भालेराव बाई तर रोजच छोट्या छोट्या चाचण्या घ्यायच्या. एका विद्यार्थ्याने लिहिलेली उत्तरे दुसऱ्या विद्यार्थ्याला तपासायला द्यायच्या. गैरहजर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते शाळेत येतील तेव्हा घेतल्या जायच्या. घडयाळ पाहून वेळ सांगणे, दिशा सांगणे, नकाशा वाचन हे प्रत्यक्ष अनुभवांतूनच तपासले जायचे. भाषा आणि गणित यांची तोंडी परीक्षासुद्धा असायची. विद्यार्थी शाळेत जे काही करायचे त्या सर्व गोष्टींना गुण असायचे. विद्यार्थ्यांचा पोशाख, स्वच्छता, शाळेतील त्यांची वागणूक या गोष्टीसुद्धा पाहिल्या जायच्या. परीक्षा आणि अध्ययन-अध्यापन यांच्यातील फरक लक्षातच यायचा नाही. आज ज्याला आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, 360 अंश मूल्यमापन म्हणतो त्यात यापेक्षा वेगळे काय असते? 

 लेखनाची आवड निर्माण करणाऱ्या डांगे बाई 

इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मी अमरावतीच्या सायन्सकोअरमध्ये शिकलो. आठवीत कमलताई देशपांडे वर्गशिक्षिका होत्या, तर कमलताई डांगे मराठी शिकवायच्या. 1963 मध्ये शुद्धलेखनाचे नवीन नियम लागू झाले. त्यांचा सराव व्हावा म्हणून डांगे बाई आम्हाला रोज एक सुविचार किंवा कवितेचे कडवे यांचे श्रुतलेखन द्यायच्या. त्याच्या अर्थाबद्दल, उतारा ज्यातून घेतला तो मूळ लेख, कविता किंवा पुस्तक यांच्याबद्दल चर्चा घडवून आणायच्या. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत लिहावे याबद्दल त्या आग्रही असायच्या. निबंधांत वापरलेल्या नवीन कल्पनांचे कौतुक करायच्या. देशपांडे आणि डांगे बाईंनी शाळेच्या वार्षिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. साहित्याची निवड, नियतकालिकाचे मुखपृष्ठ, शीर्षकपृष्ठ, अनुक्रमणिका, मजकुराचे शुद्धलेखन, व्याकरण, अचूकता, सजावट अशा विविध अंगांनी संपादन कसे करायचे हे आठवीत असतानाच मला शिकायला मिळाले. 

27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांचे जाणे देशासाठी फार मोठा धक्का होता. त्यावेळी मला एक कविता लिहावीशी वाटली. ही कविता लिहून सुमारे साठ वर्षे झाली. मला ती जशी आठवते तशी पुढे देत आहे:

कोणी म्हणती नेहरू गेले

म्हणती ते दळभद्री सगळे

नेहरू म्हणजे काय तयांना 

कधीच नाही मनी उमगले

 

देहाचे ते स्थान संकुचित 

सोडुनि गेला आत्मा त्यांचा 

एकरूप तद्देह नि आत्मा 

कण नि कणाने भारतभूच्या

ही कविता कोणाला तरी दाखवावी असे मला सारखे वाटत होते. त्यावेळी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. तरीही ही कविता मी डांगे बाईंना त्यांच्या घरी जाऊन दाखवली. त्यांना ही कविता खूपच आवडली. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचेही त्या कौतुक करायच्या. या कवितेबद्दलही तसेच काही झाले असावे असे मला वाटले. मी त्याच वर्षी शाळा बदलली होती. (पूर्वीच्या) शाळेच्या स्नेहसंमेलनात डांगे बाईंनी ही कविता वाचून दाखवली होती. त्यावेळी मी त्या शाळेत शिकत नसलो तरी मला खास बोलावून घेतले होते. त्यानंतर मी कधीही कविता लिहिली नसली तरी आपण लिहू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. 

कौशल्यशिक्षण देणारी शाळा 

इयत्ता नववी ते अकरावीपर्यंत मी प्रशस्त आणि सुंदर इमारत, सुसज्ज कार्यशाळा आणि प्रयोगशाळा आणि समृद्ध ग्रंथालय असलेल्या अमरावतीच्या कलानिकेतन या तंत्रशिक्षण देणाऱ्या सरकारी शाळेत शिकलो. लोहारकाम, सुतारकाम, वायरिंग, फिटिंग, टर्निंग, पॅटर्न मेकिंग, मोल्डिंग, वेल्डिंग अशा प्रत्येक ट्रेडसाठी एक स्वतंत्र निदेशक असायचे. वर्कशॉप सुपरिंटेंडेन्ट हेडाऊ सर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकवणारे जे. के. पाटील सर यांनी या क्षेत्रात कंटाळा न करता सराव करणे किती महत्त्वाचे असते हे बिंबवले. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकताना सुरुवातीलाच (टी-स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर्स वापरूनही) एक साधी ‘चांगली’ सरळ रेषा काढण्यासाठी मला किमान सत्तर वेळा प्रयत्न करावे लागल्याचे आठवते. एवढ्या सरावानंतर मी काढलेल्या रेषेच्या मीच प्रेमात पडलो. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या प्रयोगांसाठी उपकरणे सज्ज करणे ही कामे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यानीच करणे अपेक्षित असायचे. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत वायुवाहक नळ्या कापणे, वाकवणे, बुचांना छिद्रे पाडणे, त्यांत वायुवाहक नळ्या घालणे, बुचे आणि परीक्षा नळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसने हवाबंद करणे, सांगितलेल्या तीव्रतेची द्रावणे तयार करणे ही कामे मला खूप आवडायची. ग्रंथालयातील पुस्तकांप्रमाणेच प्रयोगशाळेतील चुंबक, ताणकाटा, काचेच्या चिपा, भिंगे, आरसे आणि इतर अनेक गोष्टी घरी नेण्याची मुभा असायची. प्रयोग केवळ प्रयोगशाळेतच नाही तर घरीसुद्धा करता येतात ही दृष्टी त्यामुळे मिळाली. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक बाजू घाटोळ सर आणि सरदेशमुख सर यांनी खूपच समर्थपणे सांभाळल्या. गणित हा विषय अगदी सुरुवातीपासून मुळातच माझ्या आवडीचा विषय होता. फारसा न आवडणारा विज्ञान हा विषय मला या दोघांमुळे आवडायला लागला. ‘कारागिरी’च्या क्षेत्रांत अतिशय महत्त्वाची असलेलेली अचूकता, वेग, नीटनेटकेपणा आणि सुबकता ही हार्ड स्किल्स आणि वक्तशीरपणा, चिकाटी, कामातील आणि वागण्यातील सहजता आणि टीमवर्क ही सॉफ्ट स्किल्स जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत आयुष्यभर तेवढीच महत्त्वाची असतात. या गुणांची मौल्यवान देणगी कलानिकेतनने आम्हांला दिली. 

स्वत:च्या भाषाशैलीचा शोध  

लिहिताना मला आवडणाऱ्या लेखकांच्या लेखनशैलीचे मी बरेचदा अनुकरण करत असे. कलानिकेतनमध्ये राम दारव्हेकर सर आम्हांला मराठी शिकवायचे. सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ते भाऊ. एकदा त्यांनी आम्हांला ‘उन्हाळ्याची सुट्टी’ या विषयावर विनोदी निबंध लिहायला सांगितला होता. माझा निबंध वाचल्यानंतर ते म्हणाले होते, “ निबंध छान झाला; पण आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाही; वसंत काळपांडे आहोत हे लक्षात ठेवावं.” दारव्हेकर सरांचा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या शैलीत लिहिण्यावर भर असायचा. 

मला माझ्या भाषाशैलीचा शोध लागला तो प्रामुख्याने भौतिकशास्त्राच्या सरदेशमुख सरांमुळे. साध्या, थेट, कमीतकमी शब्दांचा वापर असणाऱ्या, ओघवत्या, अनलंकृत आणि आपल्याला जे काही सांगायचे त्याचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या भाषाशैलीवर त्यांचा भर होता. पुस्तकातला मजकूर पाठ करून जसाच्या तसा लिहिण्याऐवजी तो स्वत:च्या भाषेत लिहावा आणि भाषेच्या आणि अचूकतेच्या दृष्टीने नऊ वेळा तरी तपासावा अशी त्यांची शिकवण होती. एखादा विद्यार्थी पुस्तकातील बोजड वाक्ये जशीच्या तशी वापरू लागला तर ते म्हणायचे, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” सरदेशमुख सर आणि दारव्हेकर सर यांच्यामुळे माझी भाषा घडली. Elements of Electrical and Mechanical Engineering, Statics, Dynamics, Probability, Permutations and combinations, Solid Geometry अशा विषयांसाठी इंग्रजी पुस्तकांचा आधार घ्यावा लागायचा. जे. के. पाटील सर आणि गणिताचे काळवीट आणि खिरे सर त्यासाठी इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देत. गणित आणि विज्ञान या विषयांवर इंग्रजीतील इतरही अनेक पुस्तके त्या काळात मी वाचली. माझ्या शाळेत मला द्वैभाषिक अध्ययनपद्धती अनुभवायला मिळाली. 

कलानिकेतनमध्ये भैयासाहेब निंबेकर आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवायचे. त्यांच्याकडे शाळेच्या ग्रंथालयाचाही कार्यभार होता. त्यांनी मला कोणतीही पुस्तके घरी न्यायची परवानगी दिली होती. या काळात मी एका लेखकाची पुस्तके वाचायला सुरवात केली की, त्यांची सर्व पुस्तके वाचून काढत असे. त्यामुळे त्या लेखकाची लेखनशैली चांगली कळायची. मुन्शी प्रेमचंद, रामधारी सिंह ‘दिनकर’, मैथिली शरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुभद्रा कुमारी चौहान हे हिंदीतील माझे आवडते लेखक आणि कवी होते. रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांचा माझ्या पिढीची वाचनाची आवड घडवण्यात मोठा वाटा होता. अर्थात बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या शाळेच्या ग्रंथालयात मिळायच्या नाहीत. त्या दुसरीकडून मिळवाव्या लागायच्या. याच काळात शाळेच्या ग्रंथालयात असलेली विज्ञान आणि गणितावरची अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके मी वाचून काढली. अनेक शास्त्रज्ञ आणि गणिततज्ज्ञ यांच्या जीवनावरील पुस्तके मी याच काळात वाचली. आकाशनिरीक्षणावरील पुस्तके, वेगवेगळ्या नक्षत्रांवरील भारतीय आणि ग्रीक पुराणकथा वाचल्या. भास्कराचार्यांच्या “लीलावती” या ग्रंथाचा मराठी अनुवाद आमच्या शाळेच्या ग्रंथालयात होता. त्यातील प्रश्न सोडवताना खूप मजा वाटायची. “लीलावती”वरून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची बऱ्यापैकी कल्पना यायची. मी कोणती पुस्तके वाचावी यावर शाळेत किंवा घरी कोणतेही बंधन नव्हते. चांगले संस्कार व्हावेत यासाठी दर्जेदार पुस्तकेच वाच, असा आग्रह नव्हता. चांगल्या साहित्याबरोबरच सुमार दर्जाचेही साहित्य मी वाचले. तरीही चांगल्या आणि वाईट साहित्यांतील फरक कळण्यात मला कोणतीच अडचण आली नाही. इंग्रजीत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी लिहिलेले विज्ञानावरचे काही लेख ‘अमृत’ आणि ‘श्रीयुत’ या मराठी डायजेस्टमध्ये छापून यायला लागले होते. पुढे महाविद्यालयाच्या वार्षिकात मी पुंज सिद्धांता(Quantum Theory)वर, तसेच मॅक्स प्लँक आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या जीवनांवर मराठीत लेखही लिहिले होते. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मार्पण

 नववी ते अकरावीपर्यंत मराठी शिकवणारे राम दारव्हेकर सर उत्कृष्ट शिक्षक तर होतेच, परंतु सावरकरांचे अनुयायीसुद्धा होते. मराठीला पुरवणी वाचनासाठी नववी ते अकरावीपर्यंत अनुक्रमे 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी', 'ती धन्य बंदिशाला' आणि 'उमाजी नाईक' ही पुस्तके आम्हाला पुरवणी वाचनासाठी होती. 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी' ही कादंबरी तात्या टोपे यांच्या जीवनावर आधारलेली होती. 1857च्या लढ्याला पूर्वी 'शिपायांचे बंड' म्हणत. त्याला 'पहिले स्वातंत्र्यसमर किंवा स्वातंत्र्ययुद्ध' हे नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच दिले हे दारव्हेकर सरांमुळेच कळले. सर सावरकरांच्या पद्धतीप्रमाणे सर्व स्वर ‘अ’च्या बाराखडीत लिहीत. मीसुद्धा अनेक वर्षे तसेच लिहीत होतो. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. परंतु त्यांच्या 'स्वतंत्रते भगवती', 'सागरा प्राण तळमळला', 'माझे मृत्युपत्र' अशा कवितांतून भेटणारे भावनोत्कटता आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांचा संगम असलेले प्रतिभाशाली कवी; तर त्यांच्या लेखांतून "गाय हा एक उपयुक्त पशु आहे, देव नाही.' , "एखाद्या वेळी थोडी गोहत्या झाली तरी चालेल, परंतु राष्ट्राची बुद्धिहत्या होऊन चालणार नाही." अशा जळजळीत शब्दांत विचार मांडणारे, पोथीनिष्ठेतून बाहेर पडण्याचे आवाहन करणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत अशी दोन टोकांची त्यांची रूपे त्यांच्या साहित्यातून अनुभवली होती.

 स्वातंत्र्यवीर सावरकर गेले त्यावेळी मी दहावीत होतो. 1966मध्ये सावरकरांनी प्रायोपवेशन (आत्मार्पण) करण्याचा निर्णय घेतला. एवढ्या शूरवीर व्यक्तीने अशी आत्महत्या का करावी? आम्ही आपापसांत चर्चा करत होतो. दारव्हेकर सरांनाच आपण विचारू, असा आम्ही विचार केला. सरांना राग येईल काय? पण आम्ही धाडस करून सरांना विचारलेच. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे आम्हाला समजावून सांगितले.

“सर्वसामान्य माणसाला आपला जीव खूप प्रिय असतो. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली, तिला तोंड द्यायची त्याच्याकडे हिंमत नसेल, तर वैफल्यग्रस्त होऊन तो आत्महत्या करतो. हे चूकच आहे. म्हणूनच अशा रीतीने आपले जीवन संपवणे कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. परंतु आपले जीवनच समाजासाठी आहे अशा भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपले या जगातील कार्य संपले असे ज्यावेळी वाटते अशावेळी ते जीवन संपवतात. त्याला समाधी म्हणतात. सावरकरांचे प्रायोपवेशन हा समाधीचाच प्रकार आहे.” 

त्यानंतर सावरकरांचा मृत्यू झाल्यानंतर दारव्हेकर सर तीन चार दिवस तरी येणार नाहीत असा आमचा समज होता. पण सर आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिकवायला सुरुवात केली. "सर, तुम्ही नाही गेलात मुंबईला?" आम्ही विचारले. "मी? नाही." सर म्हणाले. "का, सर?" आम्ही विचारले. "सावरकरांकडून मी हेच तर शिकलो." ते म्हणाले. त्यांनी पुन्हा शिकवायला सुरवात केली. मात्र ते उदास वाटले. संध्याकाळी आम्ही काहीजण सरांच्या घरी गेलो. ते खूप मनमोकळेपणाने आमच्याशी बोलले. मनातल्या ज्या गोष्टी शाळेत बोलता येत नाहीत अशा. आम्हाला आणखी समृद्ध झाल्यासारखे वाटले.

व्यावसायिक नीतिमत्ता 

1964मध्ये नववीला आम्हांला माणिकचंद नेमासा कानेड यांनी इंग्रजी शिकवले. इतर शिक्षक active voice to passive voice, change into past/present/future tense, substitution tables अशा पद्धतीने शिकवायचे. परीक्षेत गुण मिळवायला हे पुरेसे असायचे. पण ही पद्धत खूप कंटाळवाणी वाटायची. कानेड सरांची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी होती. ते कोणताही पाठ शिकवताना वर्गात जिवंतपणा आणायचे. बहुतेकदा मुलांकडून नाट्यीकरण करवून घ्यायचे. ते स्वत: नाट्यशास्त्राचे अभ्यासक होते. ॲबसर्ड थिएटर, जागतिक रंगभूमी (पूर्वरंग) आणि जागतिक रंगभूमी (पश्चिमरंग) ही पुस्तके त्यांनी लिहिली होती. इंग्रजीबरोबर मराठीचा वापर केला तरी कानेड सरांची हरकत नसायची. Uncle Podger Hangs a Picture हा पाठ त्यांनी आम्हांला शिकवला होता. त्याचे नाट्यीकरण करताना खूप गंमत यायची. नववीनंतर दहावीतसुद्धा कानेड सरच इंग्रजी शिकवायला असतील, अशी आमची खात्री होती. पण दुसरेच शिक्षक आले. पुन्हा तीच कंटाळवाणी पद्धत सुरू झाली. कानेड सरांची विदर्भ महाविद्यालयात लेक्चरर म्हणून निवड झाली होती. दोन-एक महिन्यांत ते काही औपचारिक बाबी पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जाणार होते. अधून मधून ऑफ पिरियड्सना ते यायचे. दहावीत All About a Dog हा पाठ होता. हा पाठ कानेड सरांनी शिकवला असता तर किती छान झाले असते, असे आम्हांला वाटले.

एका ऑफ पिरियडला कानेड सर आले, त्यावेळी आम्ही त्यांना विचारले. ते म्हणाले, "मलाही हा पाठ शिकवायला आवडलं असतं. पण इंग्रजी शिकवायला तुम्हांला चापोरकर सर असल्यामुळे मी तसं करणं व्यावसायिक नीतिमत्तेला धरून नाही." आम्हांला व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय, हे माहीत नव्हते. सर आपल्या पेशाकडे धंदा म्हणून पाहतात? असा विचार आमच्या मनात आला. पण तो मनातच ठेवला. असेच काही दिवस गेले. कानेड सरांचा शाळा सोडून जाण्याचा दिवस आला. तो शनिवार होता. त्या दिवशी शेवटचा तास घेणारे शिक्षक आले नव्हते, म्हणून योगायोगाने कानेड सर वर्गावर आले होते. यानंतर ते पुन्हा दिसणार नाहीत, म्हणून वर्गातील वातावरण उदास होते. 

"तुम्ही पूर्वी मला All About a Dog हा पाठ शिकवण्याबद्दल विचारलं होतं ना?" त्यांनी आम्हाला विचारले. "हो, सर. पण ते व्यावसायिक नीतिमत्तेला सोडून होईल, असं तुम्ही सांगितलं होतं. व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय?" आम्ही विचारलं. प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय, हे समजावून सांगितले. ते म्हणाले "तुमचा व्यवसाय कोणताही असो; त्याच्याशी Professional ethics - व्यावसायिक नीतिमत्ता निगडीत असतेच. विद्यार्थी म्हणून तुम्हांलासुद्धा काही नैतिक मूल्यं पाळावी लागतात. तुमच्यासाठी ही मूल्यं पाळणं म्हणजेच व्यावसायिक नीतिमत्ता." या विषयावर बरीच चर्चा झाली. 

"आज तुमची इच्छा असेल, तर मी तुम्हांला 'ऑल अबाउट अ डॉग' शिकवेन." सर म्हणाले. 

"नको, सर. आज आमचा मूड नाही आणि तुम्ही हा धडा शिकवणं आजसुद्धा व्यावसायिक नीतिमत्तेला सोडून होईल." आम्ही त्यांना सांगितले. पिरियड संपल्यानंतर सरांना निरोप द्यायची वेळ आली. सर वर्गाच्या बाहेर पडले. आम्हीसुद्धा त्यांच्या मागे बाहेर पडलो. पण त्यांची आणि आमची पावले बराच वेळ वर्गाजवळच घुटमळत राहिली.

अनंताचा साक्षात्कार घडवणारे गुरू 

कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या साहित्यिक कुसुमावती देशपांडे यांची शिक्षकांवरील “अनंताचा साक्षात्कार” ही एक सुंदर कविता मला कविता वाचायला मिळाली. (पूर्वीच्या काळी शिक्षकांसाठी मास्तर हा शब्द सर्रास वापरला जायचा. त्यामागे अनादराची भावना मुळीच नसायची. श्री. म. माटे आणि प्रा. ग. प्र. प्रधान हे माटे मास्तर आणि प्रधान मास्तर म्हणूनच प्रसिद्ध आहेत.)

एखादा मास्तर असा भेटतो - 

शाळेची जाम भीती घालतो  

उठता बसता मारतो छडी 

थरथर कापतात चिमणे गडी 

विद्यार्थी? छे, गोगलगाय 

जीवनभर पोटात पाय! 

सदा न् कदा छडी हाती 

शाळेची, जीवनाची भीतीच भीती

एखादा मास्तर असा भेटतो - 

उस्ताद नसला तरी वस्ताद असतो 

प्रत्येक चोरवाटेची चावी 

या पठ्ठ्याला अचूक ठावी 

कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी 

पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी 

सार्‍या विद्यांचे शिक्षण 

सदा देतो सोदाहरण

एखादा मास्तर असा भेटतो - 

जो ज्ञानाचे पंख देतो 

सात स्वर्गांचे दार उघडतो 

घरटं बांधायला तोच शिकवतो 

घरटं उबदार पिलं शानदार 

आभाळातून सारं सांभाळते घार 

आभाळाचं मन काही 

पिलांना ती देत नाही 

नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य 

भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य !

एखादाच मास्तर असा भेटतो - 

डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो, 

भव्य स्वप्नाचा दिव्य बाण ! 

अंतर्वेधी दृष्टी त्याची 

पंखात घालते पंचप्राण ! 

पंख देतो, देतो शक्ती 

नाही देत थिजली शांती 

आकाशातून हिंडत असता 

भूमीवर खिळवी दृष्टी 

नजर नेहमी असतेच त्याची 

खुरडणार्‍या पायांवर 

दिगंतातून हिंडता हिंडता 

दाखवीत असता विश्वाकार 

एखादाच गुरू घडवी 

अनंताचा साक्षात्कार

आपल्या विद्यार्थ्यांना अनंताचा साक्षात्कार घडवणाऱ्या गुरूंना विनम्र अभिवादन आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

- डॉ. वसंत काळपांडे 

(पूर्वप्रसिद्धी- जीवन शिक्षण मासिक सप्टेंबर २०२३) 


*****

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...