Saturday, 28 February 2026

Stress-Free Assessment Techniques: A New Dimension in Assessment

 Stress-Free Assessment Techniques: A New Dimension in Assessment

Shreya, a student of Class 9, was standing in front of me during an oral examination. She had always been one of the most enthusiastic and interactive students in my class. Naturally, I expected a confident and lively performance from her. However, to my surprise, the moment I called out her roll number, she froze. Her face turned pale; she looked frightened and almost started shivering. Sensing her anxiety, I tried to ease the situation by allowing her to choose the question she wished to begin with. Yet, she stood silent and requested some time to prepare. She returned after ten minutes but still appeared nervous and unsure.


This incident left a deep impression on me. I knew Shreya had prepared well—the examination date had been announced a month in advance and reminded several times. Yet, despite adequate preparation, she could not perform because of fear. This made me reflect seriously on our examination patterns. I also observed that many teachers tend to appreciate only those students who speak confidently during examinations. But is that truly a fair measure of learning? Are we genuinely assessing a student’s understanding, or merely completing a formal duty without questioning its usefulness? What should matter more—a student’s momentary performance or the student’s actual learning? Are we assessing learning, memory, or performance? These questions pushed me to explore alternative, stress-free ways of assessing students.

For a long time, assessment has been synonymous with stress. The traditional belief was that pressure motivates students to study harder. However, with changing times—and especially after the National Education Policy (NEP) 2020—this belief no longer holds true. Today, assessment is viewed as a process that should support learning rather than intimidate learners. The inclusion of stress-free assessment is not only timely but essential for nurturing confident and joyful learners.


The need for stress-free assessment arises from the understanding that excessive stress hampers learning. Under pressure, students often lose confidence and fail to demonstrate their true abilities. NEP 2020 emphasizes “assessment for learning” rather than “assessment of learning.” This shift encourages schools to use evaluation as a tool for improvement instead of judgment.

In the Maharashtra SSC Board, recent reforms aim at continuous and comprehensive evaluation through projects, oral tests, and practical work—aligning closely with the goal of reducing examination pressure. Education today aims not merely to test memory, but to evaluate understanding, creativity, and application of knowledge.


Educational psychologists have long studied the effects of stress on learning. While a small amount of stress can motivate students, excessive stress leads to fear, anxiety, and poor performance. During examination periods, students often experience sleeplessness, anxiety, and even physical illness. Many capable learners fail to perform not due to lack of preparation, but due to nervousness—just like Shreya. Particularly among adolescents in Grades 9 to 12, exam anxiety often results in reduced concentration and low self-esteem. Hence, assessment systems must be restructured to minimize fear and foster confidence.


The Role and Impact of Stress-Free Techniques

Stress-free assessment techniques aim to make evaluation a natural and integral part of the learning process. When students are assessed regularly through varied and engaging activities, they do not perceive tests as threats. Instead, assessments become opportunities for growth and improvement. Such techniques promote curiosity, critical thinking, and creativity—key goals highlighted in NEP 2020.

As teachers, we realize that not every student performs equally well in every form of assessment. Some students express themselves better through writing, others through speaking, drawing, or performing. This understanding led me to consider offering multiple assessment options by combining oral, written, and project-based tasks.

Traditional summative assessments create immense pressure because they depend on a single performance. In contrast, formative assessment occurs throughout the learning process and includes classroom discussions, short quizzes, group projects, and oral reflections. Since these assessments are informal and continuous, students remain engaged without the fear of a single high-stakes examination. Additionally, students tend to take regular attendance and classroom participation more seriously when assessment is continuous and holistic.


Various Stress-Free Assessment Techniques


1. Portfolio Assessment

Students maintain a portfolio containing their work throughout the term—essays, drawings, assignments, projects, and reflections. This provides a comprehensive picture of progress over time.


2. Peer and Self-Assessment

When students assess their own work or that of their peers using simple rubrics, they develop self-awareness, responsibility, and reflective thinking. It also builds trust and reduces fear of judgment.


3. Project-Based Learning (PBL)

Projects connect classroom learning to real-life situations. Students learn collaboratively, and assessment occurs naturally during the learning process.


4. Choice-Based Evaluation

Allowing students some choice in assessment methods reduces anxiety and makes evaluation student-friendly. This approach recognizes that learners have diverse strengths and learning styles.


5. Best-of System

Inspired by classroom experiences like Shreya’s, I also considered introducing a best-of system. For example, instead of conducting one 40-mark written test every fortnight, a teacher could conduct seven tests of 10 marks each, with the best four scores counted toward the final total. This approach keeps students consistently engaged and ensures that one bad day does not adversely affect overall performance. Such flexibility makes assessment fairer and more humane.


6. Digital and Gamified Assessments

Tools such as Quizizz and Google Forms make assessments interactive and engaging. Instant feedback and a game-like format replace fear with enjoyment.


7. Observation and Anecdotal Records

Teachers can maintain brief notes on students’ participation, curiosity, and improvement. This provides a holistic view of a learner’s growth beyond numerical marks.


Alignment with NEP 2020

All these approaches reflect the vision of NEP 2020, which advocates competency-based, multidimensional, and continuous assessment. The policy encourages educators to move away from rote memorization and toward understanding, application, and creativity. Stress-free techniques support this vision by providing every learner an opportunity to shine—not just those who perform well in traditional written examinations.

NEP 2020 also recommends flexible assessment patterns focusing on conceptual understanding and problem-solving rather than recall of facts. The policy proposes a 360-degree holistic progress card that records skills, attitudes, values, and participation in addition to academic achievement. The Maharashtra SSC Board, in alignment with this vision, has already introduced internal assessments, oral evaluations, and activity-based tests, encouraging more learner-centered approaches.


Challenges

The shift toward stress-free assessment is not without challenges. Teachers require adequate training to design effective rubrics and manage assessment records efficiently. Schools must also sensitize parents, many of whom still equate examinations with discipline and seriousness. The initial phase may appear time-consuming, especially for teachers handling large classes. However, once systematized, the benefits far outweigh the difficulties. With collective effort from administrators, teachers, parents, and students, stress-free assessment can become a practical reality across urban and rural schools alike.

My experience with Shreya taught me that assessment should not be a test of courage, but a reflection of understanding.

As Rabindranath Tagore rightly said, “The highest education is that which does not merely give us information but makes our life in harmony with all existence.” In this spirit, stress-free assessment is not merely a technique—it is a humane approach to education. When students learn joyfully and express themselves without fear, assessment becomes a celebration of growth rather than a judgment of worth.

To move toward this goal, teachers must reimagine their roles. Instead of being mere examiners, we must become facilitators who nurture confidence and curiosity. A science experiment, a storytelling session, a role-play, or a reflective journal—each can serve as a meaningful assessment when designed with clear intent.


The future of assessment lies in trust rather than terror. When students trust that teachers understand their abilities and provide fair opportunities, learning becomes joyful. The classroom atmosphere turns lively, interactive, and positive. Stress-free assessment benefits not only students but also makes teaching more fulfilling and satisfying.

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, guided by NEP 2020, is already embracing this transformation. As educators, it is our moral and professional responsibility to ensure that no child learns in fear. Assessments should open doors to imagination, not close minds with anxiety.

At the same time, these techniques are not meant to replace the existing system entirely. What is required is a balanced integration of traditional summative assessments with stress-free formative methods. While summative assessments ensure accountability and standardization, formative assessments help identify learning gaps and support continuous growth. Together, they create a more comprehensive and equitable assessment system.


Moreover, while implementing stress-free techniques, students must not perceive them as an excuse to neglect their studies. They should understand that all assessments—summative or formative—are opportunities to learn and demonstrate their best efforts. A stress-free system should cultivate responsibility and self-motivation, not carelessness.

In the end, every teacher must remember: behind every trembling hand like Shreya’s lies immense potential waiting to be recognized. It is our responsibility to create systems that allow that potential to shine. When stress is replaced with support and fear with freedom, assessment becomes what it truly should be—a mirror of growth, a guide for improvement, and a celebration of learning. This is the new dimension toward which education in India must confidently move.

- Aniruddha Killedar

Saraswati Vidyamandir, Talegaon Dabhade, Pune 

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)



Saturday, 21 February 2026

समग्र प्रगतिपत्रक : मूल्यांकनाचा एक व्यापक दृष्टिकोन

 समग्र प्रगतिपत्रक : मूल्यांकनाचा एक व्यापक दृष्टिकोन

प्रस्तावना :

भारतीय शिक्षण व्यवस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नवसंजीवनी देण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 करत आहे. बालकाच्या क्षमता वृद्धीसाठी आणि बालकाने आजीवन शिकत राहावे यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनेक वैशिष्ट्यांमधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मूल्यमापनातील परिवर्तन! बालकांचा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकनासाठी 'परख' या केंद्रस्तरीय संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘परख’तर्फे बालकाच्या प्रगतीच्या मूल्यांकनासाठी एक बहुआयामी ३६० अंशातील प्रगतिपुस्तक तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक बालकाची बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रातील प्रगती सविस्तरपणे दर्शविली जाईल.

हे समग्र प्रगतिपत्रक घर आणि शाळा यांमधील दुवा असणार आहे. विद्यार्थ्यांचा ३६०°तून समग्र विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांकनाची जबाबदारी केवळ शिक्षकांवर देऊन चालणार नाही, तर सहाध्यायी, पालक, मुख्याध्यापक अशा विविध घटकांवर देणे गरजेचे आहे. म्हणूनच समग्र प्रगतिपत्रकाच्या अहवालात सर्वांना सामावून घेण्यात आलेले आहे.

समग्र प्रगतिपत्रक भरताना वेगवेगळे स्रोत, पुरावे गोळा करावे लागणार आहेत. उदा. विद्यार्थी संचिका, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही इ. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा, संसाधने यांचा विचार करून उपक्रमांची आखणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

समग्र प्रगतिपत्रक हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे. यात बालकांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांचा सामाजिक, भावनिक विकास, सर्जनशीलता आणि व्यावसायिक प्रावीण्यता यांचादेखील समावेश आहे. पारंपरिक प्रगतिपत्रकाची जागा या वर्षीपासून समग्र प्रगतिपत्रक घेत आहे. बालवाटिका-१,२,३ आणि इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक वि‌द्यार्थ्यासाठी समग्र प्रगतिपत्रक भरणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मधील अनेक उपक्रमांची अंमलबजावणी मोठ्या जोमाने सुरू आहे. उदा. निपुण भारत, विद्याप्रवेश, शाळापूर्व तयारी अभियान (पहिले पाऊल)! ‘निपुण भारत’सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यात प्रगती करत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच काळ उलटला आहे आणि शिक्षकांनी आता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांबरोबरच समग्र प्रगतिपत्रक भरण्याचे मोठे आव्हान या वर्षी पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसमोर आहे. समग्र प्रगतिपत्रकामध्ये जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन क्षमतांमध्ये वि‌द्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

समग्र प्रगतिपत्रकाची गरज व महत्त्व :

१) व्यापक मूल्यांकन

२) वैयक्तिकृत शिक्षण

३) पालकांचा सहभाग

४) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास

५) शाळा व कुटुंब दुवा

६) स्तरनिहाय प्रगती

७) प्रभावी सर्वंकष मूल्यांकन

८) बालकांच्या प्रगतीचा प्राथमिक स्रोत

९) विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी, ध्येये, सामर्थ्यस्थळे, आदर्श, सवयी, वेळेचे व्यवस्थापन, भविष्यकालीन नियोजन यांबाबत नोंदी करण्यात मदत होईल.

पारंपरिक प्रगतिपत्रक आणि समग्र प्रगतिपत्रक यांमधील फरक :

पारंपरिक प्रगतिपत्रकात पूर्वी गुण नोंद केले जायचे. सद्य:स्थितीत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनानुसार श्रेणी व वर्णनात्मक नोंदी करून आकारिक व संकलित मूल्यांकन केले जाते. या पद्धतीने मूल्यांकन करणे शिक्षकांच्या अंगवळणी पडले आहे, परंतु समग्र प्रगतिपत्रकात 360 अंशातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. शिक्षण क्षेत्रातील या बदलाला सर्व घटकांना सामोरे जावे लागणार आहे. शिक्षकांच्या लेखी कामात भर पडल्याची भावना शिक्षकांमध्ये दिसून येत आहे. परंतु सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की, यासाठी खूप जास्त व अवांतर वेळ देण्याची गरज नाही. वेळेचे, अध्ययन-अध्यापनाचे व उपक्रमांचे योग्य नियोजन केले पाहिजे.

समग्र प्रगतिपत्रकाचे हेतू/उ‌द्दिष्टे :

१) बालकांची अध्ययन संपादणूक प्रभावीपणे समजून घेणे.

२) बालकांच्या गरजेनुसार नेमकेपणाने उपचारात्मक अध्यापन कृतिकार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

३) विकासात्मक क्षेत्रे, संपादणुकीचे स्तर निश्चितीकरण करणे.

४) शैक्षणिक संपादणुकीची माहिती बालकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे.

५) बालके शैक्षणिक संपादणुकीच्या नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत हे पाहणे.

६) सहाध्यायींच्या प्रतिक्रिया घेणे.

७) शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष देणे.

८) सर्व पैलूंकडे ठरावीक कालावधीत वाढ करण्याकडे समान लक्ष देणे.

९) बालकास स्वतःचे सामर्थ्य, आवडीचे क्षेत्र, भविष्यातील संधी, स्वतःमध्ये करावयाच्या सुधारणांबाबत जागरूक करणे.

१०) गुण किंवा श्रेणीऐवजी संपादणुकीचे वर्णनात्मक चित्र बालक, पालक व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणांना स्पष्ट करणे.

समग्र प्रगतिपत्रक रचना :

समग्र प्रगतिपत्रकाची रचना थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

भाग अ-१ : बालकाची सर्वसाधारण माहिती

भाग अ-२ : मी व माझा परिसर

भाग ब : बालकाच्या प्रगतीचा सारांश चार टप्प्यांमध्ये विभागला आहे.

कृतिविभाग

शिक्षकांचा अभिप्राय

स्वमूल्यांकन/ सहाध्यायी मूल्यांकन

पालक निरीक्षण विभाग

भाग क : जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता क्षमता, क्षेत्र ध्येय यांचा वर्णनात्मक तक्ता

अशा पद्धतीने समग्र प्रगतिपत्रक तयार करण्यात आले आहे.

समग्र प्रगतिपत्रकाची वैशिष्टये -

१) सर्वांगीण प्रगतीवर भर

२) सर्वसमावेशक

३) ३६०° प्रगती

४) शाळा व कुटुंब यांमधील दुवा

५) ध्येयनिश्चिती

६) बालकांऐवजी क्षमतांचे मूल्यांकन

७) अध्यापन शास्त्रीय साधने

८) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतिपत्रक

९) स्तरनिहाय समग्र प्रगतिपत्रक

सन 2025-26मध्ये मीदेखील स्वतः इयत्ता पहिलीचा वर्ग घेतला आहे. भविष्यवेधी शिक्षणाच्या अनुषंगाने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू तर आहे, परंतु मुख्य प्रश्न आला तो समग्र प्रगतिपत्रक भरण्याचा! समग्र प्रगतिपत्रकातील भाग १मधील बालकांची सर्वसाधारण माहिती भरण्यासाठी पालकांची मदत घ्यावी लागते. सर्व पालकांना एकत्र बोलवून समग्र प्रगतिपत्रकाची माहिती देणे मला गरजेचे वाटले. म्हणून काही उपाय मी अवलंबले.

समग्र प्रगतिपत्रक कृती क्र.१- पालक सहभाग

समग्र प्रगतिपत्रक भरण्याकामी पालकांचा सहभाग आवश्यक होता, कारण पहिलीचे विद्यार्थी हे लहान असतात. सर्व पालक एकाच वेळी भेटले पाहिजेत, यासाठी आम्ही सर्वप्रथम आमच्या इयत्ता पहिलीच्या पालकांची सभा घेतली. त्यामध्ये समग्र प्रगतिपत्रक म्हणजे काय? त्यामध्ये पालकांनी काय केले पाहिजे? पालकांचा सहभाग कुठे आणि कसा आवश्यक आहे? हे समजावून सांगितले. याविषयी सविस्तर माहिती दिली. जे पालक साक्षर, सुशिक्षित होते त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जे पालक अशिक्षित होते त्यांना इतर पालकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या मोठ्या भाऊ-बहिणींनीदेखील मदत करण्याचे आश्वासन दिले.

कृती क्र.२ : तंत्रज्ञानाचा वापर- Survey Heart Appचा वापर

बालकांची सर्वसाधारण माहिती भरण्यासाठी मी Survey Heart App या अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने माहिती गोळा केली. ज्यामध्ये प्रश्नावलीच्या साहाय्याने माहिती मागवली. वर्गातील ६०% पालकांनी ऑनलाइन लिंक भरून प्रतिसाद नोंदवला. ज्या पालकांना ऑनलाइन माहिती भरता आली नाही त्यांच्यासाठी प्रश्नावलीच्या फॉर्मच्या प्रिंट काढून त्या भरून घेतल्या. ह्या दोन्ही कृती मला अतिशय फायद्याच्या ठरल्या. या दोन पर्यायांमुळे मला समग्र प्रगतिपत्रकातील बालकांची सर्वसाधारण माहिती भरणे सोपे झाले.

कृती क्र.३ : विद्यार्थी मुलाखत – ‘आजचे पाहुणे’

भाग-अ(२)मधील माहिती भरण्यासाठी मी ‘आजचे पाहुणे’ हा विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा उपक्रम घेतला. त्यासाठी एक छोटी प्रश्नावली तयार केली. दप्तरमुक्त आनंददायी शनिवार अंतर्गत दर आठवड्याला वर्गातील पाच वि‌द्यार्थिनींच्या मुलाखती घेतल्या. या उपक्रमाचा फायदा असा झाला की, मुली बोलत्या झाल्या. स्वतःविषयी माहिती सांगताना आपण कुणीतरी सेलिब्रिटी आहोत, असे वाटू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. बुजरेपणा कमी झाला.

हे सर्व करत असताना एक लक्षात आले की, आपले काम नेमक्या दिशेने चालू आहे. कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मधील तत्त्वांनुसार बालकांचा ३६०° तून विकास करण्यासाठी पावले टाकत आहोत.

यानंतर सर्वात महत्त्वाचे काम कृती विभागातील नोंदी करणे. समग्र प्रगतिपत्रकात कृती विभागामध्ये विकास क्षेत्र, कृती व मूल्यांकन रुब्रिक हे तीन प्रमुख भाग आहेत. प्रत्येक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमाची ध्येये व क्षमता देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पुढील कृती केली.

कृती क्र.४ : विकासक्षेत्र, ध्येय निश्चिती

हे मूल्यांकन करण्यासाठी मी सर्वप्रथम विकासक्षेत्र, ध्येय निश्चित केले. त्यानुसार मूल्यांकनासाठी कोणत्या कृती घेता येतील त्यांची यादी तयार केली. कृतींची यादी तयार करत असताना पाठ्यक्रमाशी संबंधित व अभ्यासेतर कृती ठरवल्या.

अध्यापन करत असताना व अधूनमधून छोट्या छोट्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. उदा. स्वच्छतेचा संस्कार रुजवण्यासाठी जेवणाआधी व जेवणानंतर हात स्वच्छ धुण्याचे गाण्यासह प्रात्यक्षिक करून घेतले. शौचालयाचा योग्य वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.

CG-1 पोषक आहाराबाबत रुची व समज दर्शवितो, अन्न वाया घालवत नाही, या ध्येयासाठी मधल्या सुट्टीत मुलांनी आणलेल्या डब्यातील पदार्थाचे नाव, रंग, चव, पदार्थ कशापासून बनवला आहे याविषयी चर्चा केली. फास्ट फूड न खाण्याविषयी सांगितले. ताटातील सर्व अन्न संपवण्याविषयी सूचना देऊन निरीक्षण केले.

अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्रश्नातून सहजगत्या मूल्यांकन करता येणे शक्य आहे.

या पद्धतीने मूल्यांकन करत असताना अगदी हसतखेळत व तणावमुक्त वातावरण निर्माण केले. त्यामुळे मुलांनी मोकळेपणाने व उत्स्फूर्तपणे उत्तरे दिलीत, मत व्यक्त केले, भावना व्यक्त केल्या.

मूल्यांकनाचे निकष संच म्हणजेच रुब्रिक हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होय. त्यावरूनच विद्यार्थी त्या-त्या कृतीच्या संदर्भात नेमक्या कोणत्या क्षमतेत कोणत्या स्तरावर आहे हे लक्षात येते.

उदा. जर वि‌द्यार्थी जाणीवजागृती क्षमतेत पर्वत स्तरावर असेल तर तो आकाश स्तरावर जाण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे लक्षात येते. जर विद्यार्थी निर्झर स्तरावर असेल तर जास्त प्रयत्नांची आवश्यकता आहे, हे लक्षात येते.

कृती क्र. ५ : निकष संच (रुब्रिक) तयार करणे

मुलांसाठी निवडलेल्या कृती, मूल्यांकनाचे प्रश्न व रुब्रिक तयार करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे, कारण हे करताना शिक्षकांच्याही क्षमतेचा कस लागतो.

परंतु नीट विचारपूर्वक अभ्यास केला तर हे काम खूप सोपे आणि आवडीने करू शकतो.

यासाठी मी निवडलेल्या कृती, मूल्यांकनाचे प्रश्न व रुब्रिक तयार करून घेतले.

उदा. CG-1 : बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात.

मूल्यांकनासाठी घेतलेली कृती/उपक्रम :

इंधनविरहित पाककृती - भेळ बनवणे.

अध्ययन निष्पत्ती : पाककृतींचा आधार घेऊन पौष्टिक न्याहरी/नाश्ता स्वतंत्रपणे बनवतो.

अध्ययन अनुभव : भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणून भेळ बनवतात. उदा. कुरमुरे, मटकी, कांदा, टोमॅटो, शेव, चाट मसाला, कोथिंबीर इ.

मूल्यांकन निकष संच :

 

क्षमतास्तर
निर्झरपर्वतआकाश
जाणीवजागृतीपोषिक घटकांचा समावेश नाही.काही पोषिक घटकांचा समावेश केला.सर्व पोषिक घटकांचा समावेश केला व इतरांनाही मदत केली.
संवेदनशीलतास्वच्छतेकडे दुर्लक्षआणलेले साहित्य वाया घालवले नाही.सर्व साहित्याचा योग्य व पुरेपूर वापर केला व इतरांनाही प्रवृत्त केले.
सर्जनशीलताअनुकरणाने भेळ बनवली.सर्व साहित्य योग्य प्रमाणात वापरले.भेळ आकर्षक पद्धतीने सजवली व इतरांनाही प्रोत्साहित केले.


या पद्धतीने मी स्वतः सर्व रुब्रिक बनवून घेतले. त्यामुळे मूल्यांकन करणे सुलभ झाले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कमी वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच कृती न निवडता विद्यार्थ्यांचे गट केले व त्या गटासाठी एक कृती या पद्धतीने मूल्यांकन केले.

गटासाठी एक कृती घेतल्यामुळे मूल्यांकनात सुटसुटीतपणा आला. कोणता विद्यार्थी नेमका कोणत्या कामगिरी स्तरावर आहे, हे लक्षात आले. त्यामुळे पुढील सत्रातील अध्ययन-अध्यापनाची दिशा ठरवणे सोपे झाले. उपचारात्मक, सुधारणात्मक अध्ययन अध्यापनाला दिशादर्शक ठरले.

कृती क्र. ६ : स्वयंमूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकन

आपण केलेल्या कृतीचे स्वमूल्यांकन करणे आणि आपल्या मित्राचे/मैत्रिणीचे मूल्यांकन करणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मानाने तसे अवघड काम आहे. परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणार नाही तो शिक्षक कसला? कठिणाकडून सोप्याकडे नेतो तोच खरा यशस्वी शिक्षक!

स्वयंमूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकनासाठी दिलेल्या स्माईलींच्या प्रिंट काढून त्या कृती झाल्यानंतर भरून घेतल्या. मुलांनी आनंदाने हसतखेळत भरल्या. कुठेही मुलांना जाणवले नाही की हे एक प्रकारे मूल्यांकन करत आहोत.

स्वयंमूल्यांकनामुळे मुले स्वतःच्या शिकण्याबद्दल जागरूक झाले. स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेऊन शिकण्यात गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न करतात. स्वयंमूल्यांकनामुळे शिकण्याची प्रेरणा मिळते. स्वतःच्या शिकण्याची प्रगती कितपत झाली हे पडताळून पाहू शकतात. सहाध्यायी मूल्यांकनामुळे विद्यार्थी मित्राला/मैत्रिणीला शिकण्यास मदत करतात. त्यांच्या अडचणी सोडवतात. तसे एकमेकांच्या मदतीने पुढे जातात. कारण समवयस्कांकडून मुले लवकर शिकतात.

या सर्व विवेचनावरून एकच लक्षात येते की, समग्र प्रगतिपत्रक हे एक असे साधन तंत्र आहे की ज्यामुळे मूल काय करू शकते किंवा काय करू शकत नाही हे मुलाला स्वतःला, सहाध्यायींना, पालकांना व शिक्षकांना समजण्यास मदत करते.

भविष्यवेधी शिक्षणासाठी विद्यार्थीकेंद्रित या मूल्यांकनाला कोणाचाच विरोध असू नये, असे मला वाटते. माझे सर्व शिक्षक बांधव या मूल्यांकन साधन तंत्राचा वापर आनंदाने, योग्य पद्धतीने करतील व बालकांच्या शिक्षणात एक नवीन आयाम निर्माण करतील, अशी आशा आहे.

- अंजली रमेश तांबे 

महानगरपालिका शाळा क्रमांक 86 पाथर्डी गाव, नाशिक 

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातून तृतीय क्रमांक प्राप्त निबंध)

Saturday, 14 February 2026

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : पुस्तकासह चाचणी

 मूल्यांकनाच्या नव्या दिशा : पुस्तकासह चाचणी

अध्ययन-अध्यापनातील प्रगती आजमावून प्रगतीमधील अडचणी, त्रुटी, चुका दूर करणे हे मूल्यांकनाचे खरे कार्य असते. परंतु सद्य:स्थितीमध्ये मूल्यांकन हे काही काळानंतर केले जाते, आणि अध्ययनातील प्रगती ही गुणांच्या स्वरूपात नोंदवली जाते. या प्रकारच्या मूल्यांकनात चुका, त्रुटी, उणिवा शोधून आणि दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक सुधारण्यास वाव उरत नाही. अशा मूल्यांकनात काही प्रमाणात तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपांच्या कृतींचा समावेश असला तरी प्रमुख भर हा लेखी स्वरूपाच्या चाचण्यांवर असतो. आधी त्या पद्धतीची काही प्रमाणात अंमलबजावणी होत असली तरी दैनंदिन अध्यापनातील उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार मूल्यांकन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. आणि दैनंदिन अध्ययन- अध्यापनाचा एक भाग म्हणून नियमितपणे आणि सर्वसमावेशकपणे मूल्यांकन व्हावे यासाठी अनेक तंत्रे सुचविण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतांश तंत्रे ही जशी मूल्यांकनासाठी वापरता येतात तशीच ती अध्ययनासाठी, सरावासाठीही वापरता येतात. या तंत्रांपैकी एक अतिशय उपयुक्त तंत्र म्हणजे पुस्तकासह चाचणी. पुस्तकासह चाचणी या तंत्राच्या अंतर्गत प्रश्न, कृती इ. साधने वापरता येतात.

पुस्तकासह चाचणीचे स्वरूप :

पुस्तकासह चाचणी हे तंत्र 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयातही समाविष्ट केलेले आहे. परंतु या तंत्राबद्दल समाजामध्ये काही समज-गैरसमज आहेत. पुस्तकासह चाचणी म्हणजे प्रश्नांची उत्तरे पुस्तकात पाहून लिहिणे, थोडक्यात कॉपी करून उत्तरे लिहिणे, असा एक मोठा गैरसमज आढळून येतो. केवळ माहितीवर आधारित चाचण्या अथवा परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असावा. तसेच शालांत परीक्षेच्या अथवा इयत्ता बारावीच्या मराठी, इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेल्या परिच्छेदाखालील प्रश्नांची उत्तरे बऱ्याचदा परिच्छेदामध्ये दिसून येतात, त्यामुळेदेखील असा गैरसमज होण्यास वाव मिळतो.

वस्तुतः पुस्तकासह चाचणी या तंत्रामधील साधनांद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अपेक्षित असणाऱ्या चिकित्सक, सर्जनशीलतेचा विचार, स्वतः शिकण्याची सवय लागणे यांसारख्या क्षमता वा कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने पुस्तकासह चाचणी हे तंत्र उपयुक्त ठरते. पुस्तकासह चाचणी या तंत्रामधील प्रश्न, कृती यांची उत्तरे अथवा प्रतिसाद प्रत्यक्ष पाठ्यांशामध्ये आढळून येत नाहीत.

पाठ्यांशामधील मजकुराचा आधार घेऊन तर्कशुद्ध विचार करून चिकित्सकपणे त्या उत्तरापर्यंत पोहोचावे लागते. उदा. वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे परिच्छेद देऊन त्यावर आधारित प्रश्न तयार करण्याची कृती दिली तर विद्यार्थ्यांना स्वतः विचार करावा लागतो, आणि ज्या वाक्यांवर प्रश्न तयार करता येतात अशी वाक्ये विचारात घेऊन प्रश्ननिर्मिती करावी लागते. अशा कृतींमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करून प्रश्ननिर्मिती करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारशक्तीला चालना मिळते, तसेच पाठातील सुविचारवजा वाक्ये निवडून वेगवेगळ्या वाक्यांचे स्पष्टीकरण करणे यामुळे सर्जनशील विचारांचा पाया घातला जातो.

इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन करत अस‌ताना काही इंग्रजी शब्दांचे अर्थ संभ्रमित करतात, असे मला जाणवले. एकाच इंग्रजी शब्दाचे दोन-तीन अर्थ निघत असतील अथवा एकाच समान उच्चाराचे पण स्पेलिंग वेग‌वेगळे असणारे असे काही शब्द पाठ्यांशामध्ये असतील तर त्यांचा योग्य प्रकारे व पाठाला अनुसरून उचित अर्थ लावत असताना माझे विद्यार्थी गोंधळून जात होते. यावर उपाय म्हणून मी इंग्रजी शब्दकोश (कृ. भा. वीरकर) विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. त्याचा वापर कसा करावा, शब्द कसे शोधावेत, याबाबत थोडी माहिती दिल्यानंतर विद्यार्थी कुतूहलाने शब्दकोश हाताळू लागले. त्यांना शब्द शोधताना आनंद मिळत आहे असे जाणवले.

‘My English Book–Seven’ पाठ्यपुस्तकातील ‘In a Class of Their Own’ या पाठातील विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या शब्दांचे अर्थ इंग्रजी शब्दकोशातून शोधण्यास सांगितले. प्रत्येकाला कठीण वाटणारे काही शब्द सारखे होते तर काही शब्द वेगवेगळे होते. Shabby, tell tales, camps, facing others अशा काही शब्दांचे अर्थ शोधत असताना विद्यार्थ्यांना गंमत येत होती. यातच विद्यार्थ्यांना मी ‘Tell me a tale of tail’ या वाक्यातील ‘टेल’ या उच्चाराच्या तीन वेगवेगळ्या स्पेलिंगबाबत माहिती दिली व त्यांना त्यांचा अर्थ समजून घेण्यास सांगितले. शब्दकोशाचा वापर करून मुलांनी tell, tale व tail या शब्दांचे अनुक्रमे सांग, कथा, शेपूट असे अर्थ शोधले. त्याद्वारे पूर्ण वाक्याचा अर्थ ‘मला शेपूटची (शेपटाची) गोष्ट सांग’ असा मिळाला व त्या दिवशी हेच वाक्य विद्यार्थी एकमेकांना म्हणताना मी पाहिले. काही मुलांनी तर घरी आपल्या पालकांना, मोठ्या भावंडांना हे वाक्य सांगून याचा अर्थ विचारला. पाठातील नवख्या शब्दांचे अर्थ मुलांनीच शब्दकोशातून शोधले. शब्दांचे अर्थ मिळाल्यामुळे पाठाची तयारी, शब्दांचा पाठाच्या संदर्भात अपेक्षित अर्थ व काही वेळा तो न समजल्यामुळे त्यांच्या अर्थाबाबत दुरुस्ती करून घेऊन काही शब्दांचे दोन अथवा अधिक अर्थ निघत असल्यास संदर्भानुसार आवश्यक तो अर्थ घ्यावा, हे मुलांना समजले. सातवीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 07.17.29 व 07.17.43 या Learning outcomeच्या सरावासाठी आणि मूल्यमापनासाठी ही कृती मला खूप उपयुक्त वाटली. 

इयत्ता सहावीच्या ‘My English Book–Six’ या पाठ्यपुस्तकातील पान 32 वरील दहावी कृती ही singular - plural बाबत‌च्या सरावाची आहे. s आणि es हे प्रत्यय वापरून दिलेल्या एकवचनी शब्दांची अनेकवचनी रूपे येथे बनवायची आहेत. जसे की dream-dreams, branch- branches याप्रमाणे 's' आणि 'es' या प्रत्ययांचा वापर करून शब्दांच्या जोड्या बनवायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी ही कृती करत असताना मी त्यांची समज दृढ करण्यावर भर दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना plural formची ओळख करून दिली. पाठ्यपुस्तकातील कोणतीही 5 पृष्ठे निवडून त्या पृष्ठावरील पाठ्यांशात आलेले plural formचे शब्द शोधण्यास सांगितले. विदयार्थ्यांनीदेखील पाठ्यपुस्तकातील असे plural form असणारे ‘s’ व ‘es’ प्रत्ययद‌र्शक शब्द शोधण्याचा प्रयत्न केला व असे शब्द शोधून वहीत लिहिले.

पाठ्यपुस्तकातील 06.17.33 व 06.17.34 या Learning outcomeच्या सराव व दृढीकरणासाठी ही कृती मला उपयुक्त वाटली. हे करत असताना विदयार्थ्यांच्या होणाऱ्या चुका मी लिहून ठेवल्या, त्या वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिल्या व त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. तसेच यामध्ये कृती पूर्ण झाल्यानंतर वर्गातील मुलांना एकमेकांचे प्रतिसाद तपासण्यास देऊन त्यावर चर्चा घडवून आणली. यातून मुलांना त्यांच्या कोणत्या चुका होतात, ते लक्षात आले. त्यामुळे साहजिकपणे सहाध्यायी मूल्यमापन तंत्राचाही उपयोग करता आला.

पुस्तकासह चाचणी हे तंत्र म्हणजे अशी परीक्षा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याची परवानगी असते किंवा तसे अपेक्षित असते. आणि अशा परीक्षेत विद्यार्थ्यांवरील पाठांतराचा अतिरिक्त ताण निश्चितपणे कमी होतो, असे मला जाणवले. शिवाय पुस्तकासह चाचणी तंत्रामध्ये वर्गातील विद्यार्थी हे पुस्तकाचा वापर करून परीक्षेला सामोरे जात असल्याने ते अधिक आरामशीरपणे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देऊ शकतात. याबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 मध्ये, MSCERT पुणे द्वारे निर्मित शिक्षक हस्तपुस्तिकांमध्ये तसेच ‘My English Book – Six’मध्ये पान नं. 52 व 53 वर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. पाठ्यपुस्तकासह चाचणीकरता काही नमुना उपक्रम आणि कृतीदेखील यात देण्यात आलेल्या आहेत.

पाठ्यपुस्तकासह चाचणीचा भाषेच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास तो 'माहिती विषय' नसून येथे मुख्य भर हा गोष्टी, कविता, किंवा उताऱ्यात वर्णन केलेल्या घटनांच्या स्मरण-पाठांतरापेक्षा भाषेचा वापर करून त्या-त्या पाठातील घटना, व्यक्ती, स्थळे, प्रक्रिया इत्यादी बाबी कशा प्रकारे मांडल्या आहेत यावर असतो.

प्रामुख्याने पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक दैनंदिन अध्यापन करत असताना जो आशय समजावतात तो आशय, त्यातील तथ्ये व वर्णने विद्यार्थी लक्षात ठेवू शकतात आणि परीक्षेच्या वेळी ती पुन्हा लिहू शकतात. पण येथे तेवढेच पुरेसे नाही. पुस्तकासह चाचणीचा उद्देशच असा आहे की, विद्यार्थ्यांनी स्वतःहून तशाच किंवा अगदी नवीन वर्णनांची निर्मिती करावी आणि पुस्तकासह चाचणी या तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना त्यासाठी उत्तम प्रकारे संधी मिळू शकते, असे माझे मत आहे.

पाठ्यपुस्तकासह चाच‌णी या तंत्राचा वापर करताना पाठ्यपुस्तकातील धडे हे मॉडेल, नमुने किंवा साधने म्हणून वापरले जावेत आणि ही साधने विद्यार्थ्यांनी कितपत प्रभावीपणे वापर‌ली आहेत हे तपासले जाणे येथे अपेक्षित आहे. तसेच या तंत्राचा वापर करताना घेतले जाणारे उपक्रम, कृती अथवा खेळ याद्वारे विद्यार्थ्यांना भाषा स्वतः शिकण्यासाठी, मित्रांसोबत शिकण्यासाठी आणि शिक्षकांसोबत शिकण्यासाठी वापरता यावी हे समजले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील मजकूर वा आशय आणि त्यासाठीचे उपक्रम यांचा दुहेरी हेतू असतो. या आशय व उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना नवीन शब्दसंपत्ती आणि शिकण्याच्या नव्या पद्धती समजतात, असे मला वाटते. त्याद्वारे विद्यार्थी भाषिक खेळांमध्ये पारंगत होण्यास मदत होते, जसे की विदयार्थी वेगवेगळ्या प्रकारे वाक्यरचना करतात, नवीन वाक्ये तयार करतात किंवा विशिष्ट संदर्भामध्ये भाषा कशी वापरायची याबाबतची समज जोपासतात.

पुस्तकासह चाचणी या तंत्राचा अवलंब करताना मला प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे आपण वर्गात व शालेय वेळेव्यतिरिक्तदेखील विद्यार्थ्यांना वारंवार पाठ्यपुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. कारण त्यांच्याशी संबंधित विषयांच्या पाठपुस्तकाशी विद्यार्थी जितके अधिक परिचित असतील तितकी त्यांना परीक्षा देणे सोपे जाईल. पाठ्यपुस्तकांशी विद्यार्थी सुपरिचित नसतील तर त्यांचा बराचसा वेळ हा योग्य ते संदर्भ शोधण्यातच जातो, हे माझे स्वतःचे निरीक्षण आहे.

या अनुषंगाने इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील काही आशयाचे अध्ययन करताना विद्यार्थी नाम व नामांचे प्रकार, सर्वनामांचे प्रकार इत्यादी व्याकरण घटकांची माहिती घेऊन त्यांचा लेखनात योग्य पद्धतीने वापर करतील अशा प्रकारे पाठ्यांश समजावून देण्याचा प्रयत्न केला. पाठ्यपुस्तकातील 06.01.28 या कृतीचा मला अध्ययन निष्पत्तीसाठी छान उपयोग झाला. याद्वारे विद्यार्थ्याचे स्वतः अध्ययन करण्याचे कौशल्य वाढल्याचे दिसून आले.

पुस्तकासह चाचणी हे तंत्र अध्ययन-अध्यापनादरम्यान वापरता येते. त्यामुळे ते विविध स्वरूपात कसे वापरायचे हे विद्यार्थ्यांना उमगते. विद्यार्थ्यांचा अध्यापनामधील सहभाग वाढतो.

पाठांमधील काही स्वाध्यायांची उत्तरे पाठात असतात परंतु काही स्वाध्याय हे विचारप्रवर्तक, सर्जनशील स्वरूपाचे असतात. पाठाचा आधार घेऊन ते स्वाध्याय वर्गात सोडवणे ही पाठ्यपुस्तकासह चाचणी होते. उदा. इयत्ता सातवी मराठी बालभारती पाठ 8- ‘गचक अंधारी’ याचे संदर्भ स्पष्टीकरण दिल्यानंतर, आशय समजावल्यानंतर पान नं. 37 वरील ‘विचार करा व सांगा’ अंतर्गत 'गचक अंधारी' हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा - या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना पाठाचा आधार घेऊनच स्वमत लिहावे लागणार आहे आणि येथेच त्यांच्या आकलन शक्तीचेही मूल्यमापन होणार आहे .

पुस्तकासह चाचणी हे एक असे तंत्र आहे की विद्यार्थ्यांना वर्गात चाचणी देण्यासाठी शिक्षकांना काही वेगवेगळे परिच्छेद, वेगवेगळ्या शब्दांचे तक्ते (अर्थ शोधण्यासाठी), काही कल्पक स्वाध्याय तयार करून ठेवावे लागतात. काही कृतीही देता येतील. जसे की -

  •  खालील वर्णन वाचा. त्याचा पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक शोधा आणि त्या वर्णनात एक वाक्य अधिक जोडा.
  •  पान क्र .....वरील उतारा वाचा आणि त्यावर आधारित फ्लोचार्ट/वृक्ष आकृती / चित्र तयार करा.
  • उतारा वाचा आणि पान क्र ...... वरील चित्राला योग्य शीर्षक द्या. (येथे पुस्तकातील चित्राला शीर्षक दिलेले नसावे.)
  •  पुढील ओळी वाचा आणि पुस्तकात ती कविता शोधा. त्याच्या पुढील ओळी लिहा.
  • खालील उतारा वाचा. तुमच्या पाठ्यपुस्तकात यासारखा उतारा शोधा आणि दोन्ही उताऱ्यांमधील फरक लिहा.
  •  पान क्र..... वरील संवाद वाचा आणि त्याला योग्य पण वेगळा प्रतिसाद नोंदवा.

व्याकरणदृष्ट्यादेखील काही कृती देता येतील. जसे की -

  • योग्य विशेषण
  • विशेषणांसाठी योग्य नाम
  • योग्य क्रियापदे
  • योग्य क्रियाविशेषणे

हे सर्व करत असताना वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करावे, असे मला वाटते. तसेच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याची मुभा देण्यात यावी आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शब्द आणि वाक्ये आधीच निवडण्याची परवानगीदेखील द्यायला हवी. याप्रकारे जर पुस्तकासह चाचणी या तंत्राचा उपयोग केला तर विद्यार्थी त्या कामात मग्न राहतात आणि शिक्षकांना शालेय स्वरूपाची कामे करण्यासाठी थोडासा वेळ मिळू शकतो. चाचणीचे प्रतिसाद तपासण्याचे काम विद्यार्थ्यांना समजावून देऊन त्यांच्याकडून तपासून घेता येते आणि त्यावर चर्चा घडवून आणता येते. विद्यार्थ्यांच्या त्रुटी दूर करता येतात. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित, कृतींवर आधारित करता येते. अशा कामात विद्यार्थ्यांना आनंद मिळतो, असा माझा अनुभव आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थी स्वतःचे स्वतः शिकण्यास तयार होतात. 

प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी पुस्तकांसह चाचणी हे तंत्र वापरायचे असल्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे अध्ययन-अध्यापनानंतर आढावा घेण्याच्या दृष्टीने अथवा उपयोजन करण्याच्या हेतूने तसेच चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि स्वतः शिकण्याची सवय विकसित करणे यासाठी हे तंत्र अतिशय उपयुक्त ठरू शकते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अपेक्षेनुसार अध्ययन-अध्यापनादरम्यानच्या काळात, सरावाच्या काळात मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनातील प्रगती लक्षात येणे, अडचणी-चुका समजणे आणि त्या दूर करण्यासाठी वेळीच मार्गदर्शन मिळणे या दृष्टीने पुस्तकासह चाचणी हे तंत्र अतिशय उपयुक्त आहे.

- वैभव विठ्ठल पोरे

जि. प. प्राथमिक शाळा, सिद्राममळा, हवेली, पुणे

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातून द्वितीय क्रमांक प्राप्त निबंध)


Saturday, 7 February 2026

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : वर्गप्रकल्प तंत्र

 मूल्यांकनाच्या नव्या दिशा : वर्गप्रकल्प तंत्र 

गट - उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता सहावी ते आठवी)

वापरलेले तंत्र - वर्गप्रकल्प तंत्र

निबंधाची मांडणी पुढील मुद्द्यांच्या आधारे आहे - 

प्रस्तावना 

खुलासा 

विषयप्रवेश 

पावसासंबंधित वर्गप्रकल्पाचे स्वरूप – ब्लूम्स प्रणालीशी घातलेली सांगड 

मुलांच्या वर्गप्रकल्पातील लेखनाविषयी 

विद्यार्थी मूल्यांकन 

‘वर्गप्रकल्प’ - एक तंत्र

समारोप


प्रस्तावना - 

चिकित्सक विचारकौशल्ये, कल्पकता/सर्जनशीलता, उच्चबोधात्मक क्षमता (विश्लेषण, मूल्यमापन, नवनिर्मिती), अभिव्यक्ती विकसित करण्यासाठीचे शिक्षण, समस्या परिहार, सजग अध्ययन, कृतिआधारित/अनुभवाधारित शिक्षण, ब्लूम्स प्रणाली, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन, इ. इ. - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधल्या या सगळ्या शब्द-संकल्पनांनी शिक्षणविश्वात एकीकडे चैतन्य पसरलं आहे तर दुसरीकडे प्रत्यक्ष वर्गात अध्ययन करताना या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत कशा करायच्या, हे लक्षात येत नसल्याने काहीशी गोंधळाचीही परिस्थिती आहे. 

या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातून ‘वर्गप्रकल्प’ हे तंत्र मला व्यक्तिशः विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर नेणारं, वेगवेगळ्या उच्चबोधात्मक क्षमता वापरण्याची संधी उपलब्ध करून देणारं, अनुभवातून शिकवणारं आणि परीक्षा तंत्राच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांमधल्या क्षमता हेरणारं मूल्यांकनाचं तंत्र आहे, असं वाटतं. एवढंच नाही तर या ‘वर्गप्रकल्प तंत्रा’द्वारे शिक्षकालाही त्याची अध्यापन दिशा योग्य आहे ना, हे तपासण्यासाठीची संधी मिळते. याच ‘वर्गप्रकल्प तंत्रा’ची ओळख या निबंधाद्वारे करून घेऊ या.  


खुलासा - 

‘प्रकल्प पद्धत’ हे एक स्वयं-अध्ययनाचं (स्वतःचे स्वतः शिकण्याचं) तंत्र आहे. या प्रकल्प पद्धतीत विद्यार्थ्याला स्वतःला प्रश्न पडणं, त्यानुसार मार्गदर्शकांच्या मदतीने त्या प्रश्नाचा पद्धतशीर अभ्यास करून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणं, तो अभ्यास इतरांसमोर मांडणं इ. गोष्टी असतात. पण इथे प्रकल्पाची सुरुवात विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नातून नाही तर मलाच पडलेल्या काही प्रश्नांतून किंवा मलाच सुचलेल्या काही गोष्टींतून झाली आहे. हे वेगळेपण दर्शवण्यासाठी या निबंधात ‘प्रकल्प’ ऐवजी जाणीवपूर्वक ‘वर्गप्रकल्प’ हा शब्दप्रयोग वापरला आहे. 

‘विशिष्ट भाषिक/शैक्षणिक उद्दिष्टं (Project Objectives) डोळ्यांसमोर ठेवून शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी डोळसपणे केलेली काही कृतींची रचना म्हणजे वर्गप्रकल्प’, असं म्हणता येईल. 

मी घेतलेल्या काही वर्गप्रकल्पांपैकी इयत्ता सातवीसाठी घेतलेल्या ‘पावसासंबंधित वर्गप्रकल्पा’च्या माध्यमातून ह्या तंत्राचा सविस्तर परिचय ह्या निबंधातून करून दिला आहे.


विषयप्रवेश – 

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातली ‘श्रावणमासी’ ही बालकवींची कविता! ही कविता शिकवत-शिकत असताना कविता, त्यातले शब्द-आशय, वैशिष्ट्यं, सौंदर्य हे सगळं उलगडून सांगताना आशयाच्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्चबोधात्मक क्षमता विकसित करण्यासाठी काही कृतींची रचना करता येईल का, याचा विचार सुरू होताच! या विचारातून ‘पाऊस’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांची भाषिक समज, भाषेची जाण वाढेल अशा ७-८ कृतींची रचना केली. शिवाय विद्यार्थ्यांना आव्हानात्मकही वाटेल आणि त्या कृती करताना त्यांना मजाही येईल, असाही विचार ह्या कृतींची रचना करण्यामागे होता. ‘पावसासंबंधित वर्गप्रकल्पा’तल्या या कृती आणि त्या विशिष्ट कृतींसाठी शिक्षकांनी करायच्या गोष्टी पुढील तक्त्यातील आडव्या मांडणीतून समजून घेऊ या - 


वर्गप्रकल्पात मुलांनी करायच्या गोष्टीवर्गप्रकल्पासाठी शिक्षकांनी करायच्या गोष्टी
पावसासंबंधित १००–१५० शब्द शोधून त्या शब्दांचं वर्गीकरण करून लिहिणेपावसाचे निरीक्षण करायला सांगणे, वर्गीकरणाचे निकष काय असू शकतील हे चर्चेच्या माध्यमातून सुचवणे
पावसाशी संबंधित ५ कविता शोधून त्यांपैकी आवडलेली कविता का आवडली हे सकारण लिहिणेकवितासंग्रह उपलब्ध करून देणे व कविता आवडण्याच्या कारणांवर चर्चा करणे
पावसासंबंधित उपमा लिहिणेउपमा म्हणजे काय, त्या कशा द्यायच्या यावर उदाहरणांसह मार्गदर्शन करणे
पावसावर स्वरचित कविता करणेस्वरचित कविता लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणे
पावसाला पत्र, पावसाचं आत्मवृत्त, पाऊस आणि इतर घटक यांच्यातला संवाद, छोटीशी कथा इ. पैकी एक लेखन अभिव्यक्ती करणेलेखन अभिव्यक्तीबद्दल संवाद साधणे, काही मजकूर वाचून दाखवणे
हस्तलिखित स्वरूपात प्रकल्प-अहवाल सादर करणेहस्तलिखिताचे मूल्यांकन करणे


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार क्षमताधारित शिक्षण (Competencybased Learning) या तत्त्वाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पुढील तक्त्यावरून या वर्गप्रकल्पातून साध्य होऊ शकणाऱ्या क्षमता (विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून रचलेल्या कृती - Competencies), अपेक्षित अध्ययन निष्पत्ती (Expected Learning Outcomes) कळू शकतील. शेवटच्या रकान्यात अध्ययन निष्पत्तींची / क्षमतांची सांगड ब्लूम्स प्रणालीशीही घातली आहे. ब्लूम्स प्रणालीनुसार कोणकोणत्या टप्प्यांवरील क्षमता वापरण्याची संधी विद्यार्थ्यांना या वर्गप्रकल्पातून मिळाली, तेही कळू शकेल. 

पावसावर आधारित ह्या वर्गप्रकल्पाची उद्दिष्टे (Project Objectives) – 

विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या उच्चबोधात्मक भाषिक क्षमता (मूल्यांकन, विश्लेषण, नवनिर्मिती) विकसित करणे. 

प्रकल्पातून विद्यार्थ्यांची भाषिक समज, भाषेची जाण आणि भाषेबद्दलची प्रगल्भता वाढणे.


तक्ता १

 

प्रकल्पातून साध्य होऊ शकणाऱ्या क्षमता (Competencies)अपेक्षित अध्ययन निष्पत्ती (Expected Learning Outcomes)ब्लूम्स प्रणालीनुसार टप्पे
विद्यार्थ्यांना पावसाशी संबंधित १००–१५० शब्द शोधता येणे.पावसाचे निरीक्षण केल्यामुळे वेगवेगळे शब्द सुचतात व विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो.स्मरण, आकलन
विद्यार्थ्यांना या शब्दांचं वर्गीकरण करता येणे.विद्यार्थी स्वतःचे निकष ठरवून शब्दांचे वर्गीकरण करतात.विश्लेषण
विद्यार्थ्यांना पावसाशी संबंधित कविता शोधता येणे.विद्यार्थी संदर्भशोधन करतात.आकलन, मूल्यांकन
विद्यार्थ्यांना आवडलेली पावसाशी संबंधित कविता सकारण लिहिता येणे.कवितेचा अर्थ, वैशिष्ट्ये व सौंदर्य नेमक्या शब्दांत मांडता येते.विश्लेषण, मूल्यांकन
विद्यार्थ्यांना पावसावर स्वरचित कविता करता येणे.शब्द व उपमांचा वापर करून स्वरचित कविता करतात.नवनिर्मिती
विद्यार्थ्यांना पावसासंबंधित उपमा लिहिता येणे.साम्य दिसलेल्या गोष्टींचे उपयोजन करतात.उपयोजन
विद्यार्थ्यांना पावसाला पत्र / आत्मवृत्त / संवाद / कथा लिहिता येणे.कल्पक व नावीन्यपूर्ण लेखन अभिव्यक्ती करतात.नवनिर्मिती


पावसासंबंधित या वर्गप्रकल्पात पावसासंबंधित १००-१५० शब्द शोधता येणं, ही क्षमता ब्लूम्स प्रणालीप्रमाणे केवळ ‘स्मरण-आकलन’ याच टप्प्यांशी जोडलेली आहे. पण याच ‘शब्दांचं वर्गीकरण करता येणं’ ह्या क्षमतेची जोड वर्गप्रकल्पात असल्यामुळे ‘विश्लेषण’ या उच्च स्तरावरील क्षमता वापरायची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली. आणि हे वर्गीकरणाचे निकष (मी ठरवून न देता) ‘तुमचे तुम्हीच ठरवा,’ असं विद्यार्थ्यांना सांगितल्यामुळे तिथेही ‘विश्लेषण’ ह्या क्षमतेची काठिण्यपातळी वाढवली. 

मुलांच्या वर्गप्रकल्पातील लेखनाविषयी – 

शब्दांचे वर्गीकरण – सामान्य नाम, विशेषण, क्रियापद अशाप्रकारे शब्दांचे वर्गीकरण अनेकांनी केले आहे. पण त्याचबरोबर एका प्रकल्पात वर्गीकरणासाठी अन्नपदार्थ, पावसापासून सुरक्षा, पावसाचे परिणाम, पावसातल्या नकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी, उपाययोजना असे सात-आठ निकषही लावले आहेत. शिवाय 'जास्त पावसाची ठिकाणे', 'आकर्षक स्थळे', 'पावसाळ्यातले सण', 'ध्वनिदर्शक शब्द', 'पाण्याचे स्रोत', 'तांत्रिक पैलू', 'अमूर्तसंज्ञा' असे वेगवेगळे निकषही काही विद्यार्थ्यांनी शब्दांच्या वर्गीकरणासाठी वापरले आहेत.

पावसातील वेगवेगळ्या घटकांना उपमा देणे - उपमा देण्याचा आम्ही वर्गात सराव केला. त्यामुळे मुलांनी कल्पक, वैविध्यपूर्ण उपमा दिल्या आहेत. 

उदाहरणार्थ, आईएवढा आवश्यक, गंगेसारखा शुद्ध, उंदरापेक्षा चपळ, कर्णाएवढा दानशूर, राक्षसाएवढा भयानक, आभाळ फाटल्यासारखा पाऊस इ. इ. शिवाय पावसाच्या सरी म्हणजे कुणाला चांदीच्या राशी तर कुणाला तो बाणांचा वर्षावही वाटतो आहे तर ढगांची गर्दी कुणाला बाजारातल्या माणसांच्या गर्दीप्रमाणे वाटते आहे! 

कविता आवडण्याचे कारण – एखादी कविता आपल्याला का आवडते आहे, ते कारण लिहिण्याचा प्रयत्नही काहींनी नेमकेपणाने केला होता. 

उदाहरणार्थ, “... आम्हाला कोणती कविता आवडली याबद्दल विचार करताना आम्ही मोठ्या, अवघड शब्दांच्या कविता शोधल्या. 'अगदी छोट्या मुलांच्या कशाला?' असा विचार केला. पण 'अग्गोबाई ढग्गोबाई' कविता आठवली आणि आम्हाला माहीत होते की हीच आमची आवडती कविता ! ही कविता अगदी सोप्या व सरळ शब्दात लिहिली आहे. अगदी कोणालाही ते समजेल. आकाशात काय चालू असेल याची कवीने एकदम भन्नाट कल्पना केली आहे. यमकही सुंदर जुळवले आहे. चाल लावली की म्हणताना उत्साह निर्माण होतो. सगळा ताण विसरला जातो आणि मनात फक्त उरतो तो म्हणजे आनंद आणि उत्साह. म्हणूनच आम्हाला ही कविता आवडली.”

विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता - विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजूबाजूला बघितलेला, अनुभवलेला पाऊस कवितेतमध्ये उतरवला आहे. उदाहरणार्थ, 

पाऊस आला पाऊस आला 

सुटला सोसाट्याचा वारा 

पडल्या खूप साऱ्या गारा 

मुलांचा खेळ सुरू झाला (...) 

बघून मुलांचा खेळ सारा 

आईचा चढला पारा 

मनविण्यास मग आईला 

मांडला अभ्यासाचा पसारा.

लेखन अभिव्यक्ती

पाऊस आणि इतर घटकांतला संवाद – काही मुलांनी लिहिलेल्या संवादात कल्पकता दिसून येते. आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती याचा विचार करून ते आपल्या लेखनात उतरवण्यात काही विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 

उदाहरण म्हणून एका संवादाचा विषय -

वेगवेगळ्या शहरातले पूल, कोणत्या शहरात जास्त पाऊस पडतो, याविषयी वाद घालत आहेत. त्यात पुण्याचा भिडे पूलही आहे. (जो नदीपात्रातच आहे.) मी पाण्याखाली लवकर जातो म्हणून पुण्यात जास्त पाऊस पडतो, असा तो दावा करतो. पण त्याची लबाडी नंतर सगळ्यांच्या लक्षात येते.

विद्यार्थी मूल्यांकन - 

मूल्यांकन करताना केवळ गुणात्मक नोंद करण्यापेक्षा शिक्षक म्हणून स्वत:चं मत विद्यार्थ्यांच्या वर्गप्रकल्प अहवालावर–हस्तलिखितावर नोंदवल्याचाही उपयोग होतो. या नोंदी करण्यासाठी शिक्षक म्हणून जास्तीचा वेळ द्यावा लागतो; पण विद्यार्थ्यांसाठी तो कायमस्वरूपी राहणारा संवाद असतो. ‘मी केलेल्या बारीक-सारीक गोष्टी शिक्षकापर्यंत पोचल्या आहेत, त्याची दखल घेतली गेली आहे,’ याचं समाधान विद्यार्थ्यांना मिळतं. पुढच्यावेळी अधिक मनापासून, अभ्यास करून, कष्ट घेऊन वर्गप्रकल्प करण्यासाठीची प्रेरणाही या वैयक्तिक मूल्यांकन नोंदीतून विद्यार्थ्यांना मिळते. सुरुवातीला अर्थातच वर्गप्रकल्पातल्या आवडलेल्या, चांगल्या वाटलेल्या/सकारात्मक गोष्टी असाव्यात. काही त्रुटी असतील, एखादी कृती केली नसेल तर त्याची नोंद अर्थातच शेवटी असावी. उपक्रमातल्या प्रत्येक कृतीविषयी एखाद्या ओळीत, ४-६ शब्दांत टिपण्णी जरूर असावी. 

उदाहरणार्थ, मी विद्यार्थ्यांच्या दोन वेगवेगळ्या वर्गप्रकल्पांवर केलेल्या नोंदी -

१)

  • प्रस्तावना सविस्तर, शाबास!
  • शब्द भरपूर शोधलेस, शाबास! वर्गीकरण व्यवस्थित. 
  • उपमा असलेली वाक्य लिहायचा प्रयत्न चांगला.
  • निवडलेली कविता छान, निवडीमागचे कारण नेमके लिहिले आहेस. 
  • तू तयार केलेली कविता आवडली, शाब्बास ! 
  • अनुभवलेखन, संवाद विचारपूर्वक. 
  • प्रकल्पाची मांडणी, सादरीकरण, अक्षरवळण यासाठीही शाबासकी.

२)

  • मुखपृष्ठ सुंदर !
  • पानाची मांडणी, सादरीकरण, टापटीप, अक्षरवळण यासाठीही खूमोशा! (खूप मोठी शाबासकी)
  • प्रस्तावना व्यवस्थित, तपशीलवार. 
  • निवडलेली कविता चांगली. निवडीमागचे कारण लिहायला विसरलीस का?
  • तू केलेली कविता मस्त !
  • पावसाला लिहिलेले पत्र सविस्तर, बोलके. शाबास!

या प्रकल्पाचे मूल्यांकन गुणांमध्ये खालीलप्रमाणे केले - 

कृती                                                         पैकी गुण

प्रस्तावना                                                          २

शब्द, त्यांचं वर्गीकरण                                          ४

कविता निवडणे, लिहिणे, कारण लिहिणे                ४

उपमा देणे                                                         ४

नवीन कविता करणे                                             ४

लेखनातून अभिव्यक्त होणे                                    ४ 

मांडणी, मुखपृष्ठ, एकंदर परिणाम.                          ३

एकूण गुण                                                        २५


वर्गप्रकल्प’ - एक तंत्र - 

‘वर्गप्रकल्प’ हे तंत्र म्हणून विकसित करताना या प्रकारे केलेलं मूल्यमापन पुरेसे नाही, याची मला कल्पना आहे. परंतु, या ‘वर्गप्रकल्प’ तंत्रातून अधिक शास्त्रशुद्ध आणि काटेकोर मूल्यांकन करता येऊ शकते. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन या ‘वर्गप्रकल्प’ तंत्रातून अधिक नेमके कसे करता येईल याचा आलेख डोळ्यांसमोर यावा म्हणून त्याची तक्ता स्वरूपात मांडणी करते आहे. 

या तक्त्यावरून प्रकल्पातून साध्य होऊ शकणाऱ्या क्षमता (Competencies), प्रत्यक्षात झालेली अध्ययन निष्पत्ती (Actual Learning Outcome) लक्षात येऊ शकतील. प्रत्येक मुलाने किती प्रमाणात अध्ययन निष्पत्ती साध्य केल्या आहेत, ते आपण प्रत्येक प्रकल्पाचे मूल्यांकन करून रिकाम्या जागेत (------) नोंदवू शकू. तर शेवटच्या रकान्यातील रिकाम्या जागेत विद्यार्थ्याने मिळवलेल्या क्षमतेचा स्तरही आपल्याला लिहिता येईल. उदाहरणार्थ, पावसासंबंधित वर्गप्रकल्पात १००-१५० शब्दांपैकी कमीतकमी किती शब्द शोधता आले म्हणजे विद्यार्थ्याने ‘ठीक’, ‘चांगला’, ‘उत्तम’ स्तर मिळवला आहे, ते शिक्षक म्हणून आपल्यासमोरच्या विद्यार्थ्यांचा गट बघून आपल्यालाच ठरवायला लागेल. प्रत्येक शाळेनुसार/वर्गानुसार हा स्तर कमी-जास्त प्रमाणात बदलू शकतो. 

 

प्रकल्पातून साध्य होऊ शकणाऱ्या क्षमता (Competencies)प्रत्यक्षातील अध्ययन निष्पत्ती (Actual Learning Outcomes)क्षमता स्तर
उत्तम / चांगला / ठीक
विद्यार्थ्यांना पावसाशी संबंधित १००-१५० शब्द शोधता येणे.विद्यार्थ्यांनी पावसासंबंधित किमान __________ शब्द शोधले.
विद्यार्थ्यांना या शब्दांचं वर्गीकरण करता येणे.विद्यार्थ्यांनी स्वतःचे निकष लावून शब्दांचे __________ प्रकारात वर्गीकरण केले.
विद्यार्थ्यांना पावसाशी संबंधित कविता शोधता येणे.ग्रंथालयाचा, संकेतस्थळांचा उपयोग करून, संदर्भशोधन करून विद्यार्थ्यांनी पावसाशी संबंधित __________ कविता शोधल्या.
विद्यार्थ्यांना आवडलेली पावसाशी संबंधित कविता का आवडली ते सकारण लिहिता येणे.पावसासंबंधित आवडलेली एक कविता निवडून ती का आवडली याचे नेमक्या शब्दांत विश्लेषण करता आले. कवितेचा अर्थ, वैशिष्ट्यंही योग्य शब्दांत लिहिता आली.
विद्यार्थ्यांना पावसावर स्वरचित कविता करता येणे.पावसावर स्वतंत्रपणे/दोघात मिळून कविता करता आली.
विद्यार्थ्यांना पावसासंबंधित उपमा लिहिता येणे.पावसासंबंधित किमान __________ गोष्टींना व्यवस्थित उपमा देता आल्या. उपमा देण्यासाठी सारखा, त्यापेक्षा, प्रमाणे, इतका इ. शब्दांचा वापर करता आला.
विद्यार्थ्यांना पावसाला पत्र, पावसाचं आत्मवृत्त, पाऊस आणि इतर घटक यांच्यातला संवाद, छोटीशी कथा इ. पैकी एक लेखनप्रकार लिहिता येणे.विद्यार्थ्याने दिलेल्या पर्यायांपैकी __________ लिहिले. मनातल्या विचारांची अभिव्यक्ती केली. लेखनात नावीन्य, कल्पकता, संवेदनशीलता होती.


प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्गप्रकल्पाचे मूल्यांकन करून वरील तक्त्यानुसार आपण नोंदी करू शकलो; तर वर्गप्रकल्प हे मूल्यांकनाचे नवीन तंत्र म्हणून विकसित होऊ शकेल. 

समारोप -

‘वर्गप्रकल्प’ हे जसं विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी उपयुक्त तंत्र आहे, त्याचप्रमाणे ते शिक्षकांसाठीसुद्धा स्वयं-मूल्यांकनाचंही एक तंत्र होऊ शकतं, याबद्दल विश्वास आहे. शिवाय वर्गप्रकल्पांची कागदावर आखणी करताना, वर्गप्रकल्प वर्गात घेताना, त्यासंबंधीच्या सूचना देताना किंवा वर्गप्रकल्पाचे मूल्यांकन करताना शिक्षक म्हणून आपणही घडत असतो, अधिकाधिक प्रगल्भ होत असतो, आपल्यालाही अभ्यास करायची, मोठ्ठं व्हायची संधी मिळत असते, हा माझा स्वानुभव आहे. ‘वर्गप्रकल्प’ हे तंत्र म्हणून अजून विकसित करण्याची गरज आहे, त्याबद्दल अभ्यास सुरूच आहे. पण ‘वर्गप्रकल्प’ हे तंत्र म्हणून विकसित होऊ शकतं या निष्कर्षापर्यंत मात्र मी आले आहे. 

-जयश्री काटीकर 

अध्यापक, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे.

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...