पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व
दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे कमी होत जाणारा पाऊस, त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ, वाढत जाणारी लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, मानवाचे कमी होत चाललेले आयुर्मान, सजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची विविध कारणे जाणून घेण्यासाठी पर्यावरणीय शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. ती एक काळाची गरज बनली आहे.
पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे, संभाव्य उपाय शोधणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण आणि तर्कशुद्ध वापर करण्यासाठी, व्यक्तीच्या पूर्ण माहितीसाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पाया घालणे हे पर्यावरणीय शिक्षणाचे
महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच पर्यावरण अभ्यासात मनुष्याला आणि त्याच्या परिसराला उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबवण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे हे सुद्धा पर्यावरणीय शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
पर्यावरण शिक्षणात सध्याच्या काळात कोणत्या समस्यांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे तर ते म्हणजे हवामान बदल. आज जगाला तापमान वाढीचा धोका सतावत आहे. बेसुमार जंगलतोड, लोकसंख्या वाढीमुळे वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, पर्यायाने होणारे प्रदूषण पृथ्वीच्या ओझोनच्या संरक्षक थराच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येऊन पोहोचत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात भारतात असणारे ४०-४२ अंश सेल्सिअस तापमान आज ४५ अशांच्या पुढे जाऊन पोहोचले आहे. उत्तर ध्रुवावरील बहुतांश हिमनग पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे वितळत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतांश देशांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली आहे. हवामान बदलामुळे बऱ्याचशा प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हजारो वर्षांपूर्वी जसे बदलत्या हवामानाशी जुळवून न घेता आल्याने डायनासोरसारख्या प्रजाती जशा नष्ट झाल्या तसेच काही वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सन २०१७ साली कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात सुमारे ७००० हेक्टर जंगलांमध्ये वणवा पेटला होता. त्यामध्ये वन्यजीव व वनस्पतींचा नाश झाला होता. हवामान बदलाची ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. बदलत्या हवामानानुसार शेतातील पिकांचे उत्पादन ही घटत आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी, कमी पाण्यात जास्त उत्पादन देऊ शकतील अशा बियाण्यांच्या जातींचा शास्त्रज्ञ शोध लावत आहेत. अशी बियाणेही बाजारात उपलब्ध आहेत.
पर्यावरणाची दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे जलप्रदूषण. पृथ्वीचा २९ टक्के भाग पाण्याने व्यापला असला तरी फक्त ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. पृथ्वीवर महासागर जरी असले तरी त्यांचे खारे पाणी पिण्यायोग्य नाही. मनुष्य शेतीच्या अधिक उत्पादनाच्या लालसेपोटी विविध खते, रासायनिक पदार्थ शेतांमध्ये वापरतो ही खते पाण्याबरोबर मिसळली जातात, तसेच शहरामध्ये कारखान्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक विषारी द्रव्ये मिसळलेली असतात, त्यावर प्रक्रिया केली तरी त्यातील काही घटक तसेच राहतात आणि हे पाणी नदीत मिसळल्याने जलप्रदूषण होते. काही समुद्र किनाऱ्यांवरच्या शहरातला घनकचरा हा समुद्रात टाकला जातो, गणेशोत्सवाच्या काळात मोठमोठ्या मूर्ती समुद्राच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात. मोठमोठी तेलवाहू जहाजे कधी कधी वादळात सापडल्याने अपघातग्रस्त होतात. पर्यायाने समुद्राच्या पाण्याचेही जलप्रदूषण होते. जलप्रदूषणामुळे समुद्री जीवांना धोका पोहोचत आहे. त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन समुद्री जीवांची संख्या कमी होत चाललेली आहे. त्यामुळे कोणत्या कारणांनी पाण्याचे प्रदूषण होते? पाण्याचे प्रदूषण होऊ नये, त्याची कारणे कोणती व त्यावर कोणते उपाय योजता येतील यासाठी पर्यावरणीय शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
जागतिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत अनेक देश पर्यावरणाची हानी करत आहेत. रशिया, उत्तर कोरिया, अमेरिका यांसारख्या देशांनी मानवाच्या प्रजातिला हानिकारक असे अणुबॉम्ब बनवले आहेत. तिसऱ्या महायुद्धांमध्ये अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे तिथली हजारो एकर जमीन नापीक बनली होती तसेच मानवाच्या आनुवंशिकतेवरही त्याचा परिणाम झाला होता.
पृथ्वीवरील खनिज तेलाचे साठे, वाढती लोकसंख्या व वाढते औद्योगिकीकरण यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. पेट्रोल, डिझेल, खनिज तेल यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल तसेच कारखान्यातून निघणाऱ्या रसायनांच्या धुरांमुळे वायुप्रदूषण होत आहे. याला पर्याय म्हणून सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, तसेच विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढवणे, इथेनॉल सारख्या प्रदूषण कमी उत्सर्जित करणाऱ्या वाहनांचा वापर करणे गरजेचे ठरणार आहे. आज हवेतील रासायनिक घटक वाढल्याने तसेच मोबाईलच्या टॉवरमुळे पशुपक्ष्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत चालला आहे. वायु प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत.
प्लॅस्टिकचा सर्रास वापर हे पर्यावरणाच्या हानीचे एक मुख्य कारण आहे. आज शहरांमधून लाखों टन कचरा गोळा केला जातो. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. तो जाळला जात नाही किंवा नष्टही होत नाही. जमिनीवर जिथे पडेल तिथेच तो राहतो. नद्यानाल्यांच्या प्रवाहात प्लॅस्टिक अडकल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. प्लॅस्टिक बंदीचे कायदे नियम जरी असले तरी पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी केल्याशिवाय समस्या सोडवली जाणार नाही. त्यासाठी पर्यावरण शिक्षणात प्लॅस्टिकला पर्यायी पदार्थांचा वापर कसा करता येईल? प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याविषयी विचार केला जातो. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याच्याबाबत बरीचशी जनजागृती झाली आहे. शहरांमध्ये या कचऱ्यावर प्रक्रिया करून विविध वस्तू बनवणे, सेंद्रिय खत बनवून त्याचा शेतीसाठी वापर करणे असे विविध प्रयोग केले जात आहेत. उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यांमुळे रोगराई पसरण्याचा जास्त धोका संभवतो. उघड्यावर पडणारा कचरा सडतो, त्यातून दुर्गंधी येते. पर्यायाने डास,माशा तसेच साथीचे आजार बळावतात. यासाठी पर्यावरण शिक्षणात कचऱ्याचे व्यवस्थापन हा घटक महत्वाचा ठरतो.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. पर्यावरण शिक्षणात नैसर्गिक आपत्तींना कसे सामोरे जावे, हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात याचा अभ्यास केला जातो. आज विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाचे आयुर्मान कमी होत आहे. मनुष्याला त्वचेचे, श्वसनाचे आजार होत आहेत. काही देशांत भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. यासाठी जगातील सर्व देश एकत्र येऊन बदलते हवामान व जागतिक तापमानवाढ यासाठी ठोस पावले उचलत आहेत.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध कायदे अमलात आणत आहेत. भारत सरकारने सुद्धा जैवविविधतेच्या नियंत्रणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि परदेशी व्यापार (विकास आणि नियमन ) कायदा १९९२ पारित केला. १९८८ च्या राष्ट्रीय वन धोरणामध्ये संरक्षण हे त्याचे मूलभूत तत्व होते. भारतातील काही राज्यांनी प्लास्टीक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याविषयी कायदे केले आहेत. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनामार्फत विविध कार्यक्रम तसेच अभियान दरवर्षी राबवले जातात. यामध्ये वृक्षलागवड, वन्यजीव सप्ताह, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन याविषयी जनजागृती केली जाते. बदलत्या परिस्थितीनुसार पर्यावरण शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जाणारे आहे. त्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाविषयी आपणही सजग राहायला हवे.
- गीतांजली बाबासाहेब काशीद
शाळा – जिल्हा परिषद शाळा पाचघर, ता. मोखाडा, जि. पालघर
ईमेल – geetanjalikashid.26 @gmail.com
विस्तृत विवेचन केले आहे.. पर्यावरण शिक्षण व रक्षण ही काळाची गरज आहे..
ReplyDelete